संत कान्होबा महाराजांचा ( Sant Kanhoba Maharaj ) जन्म पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तुकाराम महाराजांच्या जन्मानंतर सांगितला जातो. पूर्वीपासूनच दोघांच्याही घराण्यामध्ये पारंपारिक भक्तीमार्ग होता. दोन्हीही घराणे पिढीजात वारकरी घराणे होती. अध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांच्या घरातील सर्वजण एकमेकांबद्दल अध्यात्मिक अनुकरण करत असायचे. संत कान्होबा महाराज तुकारामांचा सोबती म्हणून कायम त्यांच्या बरोबर असायचे.
तसेच तुकारामांचे धाकटे बंधू आणि तुकाराम महाराजांचे भक्त म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. संत कान्होबांच्या अभंगांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी ‘तुकियाबंधू ‘ असा त्यांचा उल्लेख केलेला आढळतो. त्यावरून त्यांनी स्वतःला तुकाराम महाराजांमध्ये समर्पित केल्याचे समजते.तुकाराम महाराजांच्या अभंगांचे वर्णन स्पष्टीकरण आणि अर्थबोध सांगणारे संत कान्होबा यांचे महत्त्व तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण सांगितले जाते.संत तुकाराम महाराजांचे समविचारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
दुष्काळात धान्यवाटप, इंद्रायणी मध्ये गाथा बुडवणे आशा तुकाराम महाराजांच्या सर्व गोष्टींचे कान्होबांनी नेहमी समर्थनच केले. कान्होबांची गणना तुकाराम महाराजांच्या शिष्य वर्गातच केली जाते आणि संत तुकाराम महाराज त्यांचे गुरु समजले जातात. असे वर्णन अनेक अभंगांमध्ये सापडते. तसेच त्यांची गणना त्यांच्या प्रमुख 14 टाळकऱ्यांमध्येही केली जाते. सुखी, श्रीमंत , संपन्न आणि समृद्ध कुटुंबात वाढलेले दोन्ही संत कान्होबा आणि संत तुकाराम यांची आध्यात्मिक ओढ असणाऱ्या कुटुंबात जडणघडण झाली. तसेच दोन्हीही संतांना त्यांच्या आयुष्यात जवळजवळ सारख्याच सुखदुःखांना सामोरे जावे लागले.
आई-वडिलांचे निधन, दुष्काळाचा सामना, तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे निधन अशा प्रकारची सर्व दुःखे तुकाराम महाराज बरोबर संत कान्होबांनीही भोगली. तुकाराम महाराजांची अध्यात्मिक ओढ वाढत चालल्यानंतर ते वैयक्तिक संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या संसारात परावृत्त झाले असताना त्यांची संसारिक जबाबदारी, तुकारामांच्या शेतीची कामे,सावकारी आणि इत्यादी कामाचा भार संत कान्होबा यांनी घेतला होता असे सांगितले जाते. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरून दोन दोन, तीन तीन दिवस घरी येत नसायचे त्यावेळी कान्होबांनी त्यांना घरी आणण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यांना जेवण घेऊन जाण्याचीही कामे केली.
पुढे तुकाराम महाराज गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ ही त्यांनी खूप प्रेमाने आणि मायेने केला. तसेच तुकाराम महाराजांचे बंधू नारायण बाबा वयाने मोठे होईपर्यंत कान्होबांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. आणि त्यांची वारकरी सांप्रदायातील कामेही केली. पुढे त्यांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा विस्तार केल्याचेही समजते. म्हणून संत तुकाराम महाराजांचे कान्होबा महाराज हे खरे अनुयायी सांगितले जातात. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर कान्होबांनी घेतलेला त्यांचा शोध दि.बा.मोकाशी यांनी आपल्या “आनंद ओवरी “ या कादंबरीध्ये फार छान आणि सविस्तर सांगितलेला आहे.
तुकारामांच्या वैकुंठ गमनानंतर संत कान्होबांनी शोक मग्नतेत त्यावेळी काही अभंग रचले आहेत. ते ‘विलपिका’ म्हणून आजही प्रसिद्ध आहेत. ते अभंग वाचताना अक्षरशः अश्रू अनावर होतात.कुणी मेले तरी दुःख न मानणारे तसेच कुणी जन्मले तरी आनंद न मानणारे कान्होबा महाराज तुकारामांच्या जाण्याने फार कष्टी झाले होते. अशा ह्या संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा खरा साक्षीदार असलेल्या कन्होबा महाराज यांचे भरपूर अभंग लिहिले असून शंभर अभंगांच्या आसपास आजही त्यांचे अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या रचना अतिशय मार्मिक आणि भावुक आढळतात. जसे की, तुकाराम महाराजांच्या वैकुंगमनानंतर ते म्हणतात. दुःखे दुभागले हृदयसंपुष्ट । गहिवारे कंठ दाटत ऐसे काय केले सुमित्रा सखया। दिले टाकोनिया वनामाजी।। काय हे सामर्थ्य नव्हते तुजपाशी।संगे न्यावयासी अंगभूता।।
दुःखाने माझे हृदय दुभंगले आहे,फाटले आहे.आणि कंठ दाटून येत आहे तुझ्या आठवणीने. माझे अंतकरण भरून येत आहे. हे सुमित्रा,सखया म्हणजे माझ्या जिवलग मित्रा तू असे का केले. मला एकट्याला अरण्यात,वनात टाकून तू का निघून गेलास असे ते संत तुकाराम महाराजांना विचारतात. तुझ्याजवळ आम्हाला बरोबर घेऊन जाण्याइतके सामर्थ्य नव्हते का? तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही हे तुला माहीत असतानाही तू आम्हाला पोरकं करून गेलास. तू आम्हाला भेटण्यासाठी ये अशा भावनिक अभंगाशिवाय ज्ञान,तत्त्वज्ञान,आत्मज्ञान, तुकाराम विषयी, पांडुरंग भक्ति विषयी अनेक सलोख्याचे काव्य श्लोक त्यांच्या अभंग रचनेमध्ये आढळतात. शेवटी संत कान्होबा तुकारामांच्या जाण्यानंतर पांडुरंगाशी फार भांडतात ते एका अभंगात म्हणतात की,
आले मुळ भ्राता गेला त्याचे।. तो देव, तोच घरभेद्या आहे.
‘धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या। ऐसे काय वेड्या जाणीतले.’
आता मी कुठलीही चिंता करणार नाही, मला कुठलीही, कसलीही, कोणाच्याही संमतीची गरज उरली नाही. कारण माझा भाऊ गेला याचे कारण मला आता समजले आहे.कळले आहे. आता मी तुझे पाय धरतो आणि माझ्या भावाची भेट घालून दिल्याशिवाय मी आता तुझे चरण सोडणार नाही.बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा, विठ्ठला तू तर घर बुडवा भेटलासी, इतके कठोरपणे कान्होबा देवाशी भांडतात, देवा तुझा धिक्कार असो, असे बोलण्याचा अधिकार कान्होबांना त्यांच्या तुकारामांवरील श्रद्धेनेच प्राप्त करून दिला असावा. यावरून असे दिसते की संत तुकाराम महाराजांच्या जाण्यानंतर त्यांचा मित्र,सखया, भाऊ,शिष्य समजल्या जाणाऱ्या कान्होबांना हृदयव्यापी कष्ट झाले होते.पुढे त्यांचा एक अभंग तर अगदी कोणाचेही मन गहिवरून येईल असाच आहे. संत कान्होबा महाराज म्हणतात की,
‘मायबाप निमाल्यावरी। घातले भावाचे आभारी। तोही परि हरी। तुझ जाला असमाई।।’
माझ्या आई-वडिलांनी मेल्यावर एका भावाच्या पदरी सोडून मला ते गेले आणि विठ्ठला, पांडुरंगा तोही तुला सहन झाला नाही. त्यालाही तू घेऊन गेलास अशी हळहळ ते विठ्ठल चरणी अभंगामधून मांडतात. या सर्व अभंगांमध्ये संत कान्होबा तुकाराम महाराजांचे बंधू म्हणून बोलताना दिसतात. अशा संतांच्या अश्या अभंगामधून संतांचा भावपूर्ण विधायक विचार आणि सर्व सामान्य समाजाला समजेल असे ज्ञान दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांना आत्मज्ञान मिळाल्यानंतर ची आत्मस्थिती सांगितलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आत्मज्ञानाला फार मोठे महत्त्व असून प्राचीन काळातील ‘कठ ‘ समुदायाच्या कठोपनिषदामध्ये नचिकेत्याची गोष्ट आहे. याप्रमाणेच संत कान्होबा महाराजांनी त्यांच्या आत्मज्ञानाविषयीची स्थितीही एका अभंगामधून मांडलेली आहे.
साखरे महाराज आव्रतीत कान्होबाचे अभंग हिंदीत ही आहेत. आणखी किती संतांनी मराठी शिवाय इतर भाषांमधे अभंग आदि लिहीलेत?
बहुतेक मराठी संतांनी मराठीतच ग्रंथ रचना ,अभंग आणि गवळणी लिहिल्या आहेत. संत तुकडोजी महाराज यांनी काही साहित्य हिंदीतून लिहिले आहे .संत नामदेव हे उत्तर भारतात बरेच फिरले आहेत .मध्यप्रदेश ,पंजाब ,राजस्थान ,गुजरात मध्ये ते प्रसिद्ध होते. कदाचित या भाषातून त्यांनी काही लिखाण केले असावे .