अहिल्यानगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये नगर करमाळा हायवे वर अहिल्यानगर पासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मांदळी ( Tirth Kshetra Mandali ) हे देवस्थान आहे. हे देवस्थान म्हणजे फार प्राचीन साधू सद्गुरु श्री लालगीर स्वामी महाराज यांचे समाधी स्थान आणि साक्षात मानव रुपी बाल ब्रह्मचारी, महान तपचर्यी, लालगीर बुवा महाराजांचे शिष्य, ब्रह्मरूप विदेही, महान तपस्वी ओम चैतन्य श्री आत्माराम गिरी स्वामी महाराज हे सतपुरुष मंदिरात आजही पहुडण्याच्या अवस्थेत तपचर्या करत आहेत. तसेच येथे लालगीर स्वामी महाराजांची समाधी असून त्यांच्या 18 शिष्यांच्या आणि साधू महात्म्यांच्या समाधी येथे आहेत.
संतांची भूमी असलेल्या अहिल्यानगर मध्ये हजारो जीवांचा उद्धार झालेल्या या मांदळी गावात अनेक साधू महात्मे वास्तव्य करत होते. त्यांच्या तप सामर्थ्यामुळे येथील भूमी पावन झालेली असून रक्षित आहे. श्री क्षेत्र मांदळी हे छोटे गाव असून या गावाची महती फार पूर्वीपासून आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात या गावात एक महान तपस्वी, योगी, संन्याशी, गिरी पंतातील साधू श्री लालगीर स्वामी हे साधू काशीचे गिरी पंथाचे राजे शाही जोगी नागबाबा साधू होते. येथे एकांत जंगलात लालगीर बुवा डोंगरावर तपश्चर्या करीत होते.
तसेच याच काळात इतर साधुसंत मंडळी स्वामींच्या सहवासात वास्तव्य करीत होते. त्याचप्रमाणे येथील लालगिरी स्वामींच्या सहवासात अनेक संत मंडळी आली. येथील मोठ्या संत,साधू, साधवी आणि तपस्वी महात्म्यांच्या वास्तव्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात उल्लेख केल्यानुसार “ ईश्वर निष्ठांची मांदियाळी “ म्हणजे मांदळी गाव एका लहानशा ओढ्याच्या काठी वसलेले आहे. मांदळी गावाजवळ असलेल्या मांडवगण मध्ये मांडव्य ऋषी प्रमाणे लालगीर स्वामी महाराजांवर अनेक भक्त आणि संत मंडळी प्रेम करत होते. स्वामी महाराजांवर अनेक संत मंडळीने आपली भक्ती इतकी निष्ठापूर्वक केली की त्या भक्तीला जोडच नव्हती. लालगिर स्वामी महाराजांनी अनेक कडक तपचर्या केल्यानंतर मांदळी या गावी आपली संजीवन समाधी घेतली. महाराजांच्या याच संजीवन समाधी स्थळाला ईश्वरनिष्ठाची मांदियाळी असे संबोधले जात असे.
पुढे सण 1974 मध्ये ग्रामस्थांनी सद्गुरु श्री लालगीर स्वामी महाराज मठ या ट्रस्टी मठाची स्थापना करून त्याची रीतसर नोंदणी केली. श्री लालगीर स्वामी यांच्या संजीवन समाधीची पूजा अर्चा व सेवेसाठी या गादीवर संन्यासी व्रत घेणाऱ्या भक्ताची पूजा चालत असे. गृहस्थी माणसाला या मंदिरात स्वामींच्या समाधीला स्पर्श करण्यास बंदी आहे. त्यामुळे या मंदिरात लालगीर स्वामी महाराजांच्या सेवेसाठी अनेक ब्रह्मचारी साधू होऊन गेले. त्या सर्व साधू पुरुषांच्या समाधी स्वामींच्या संजीवन समाधी समोरच आहेत. येथे लालगिर स्वामींच्या समाधी बरोबरच एकूण 18 समाध्या आहेत. इतक्या समाध्या पाहून श्री क्षेत्र मांदळी गावाची महती किती पूर्वीपासून असावी हे सहज समजते. येथे लालगीर स्वामींच्या काळापासून ते आज पर्यंत गुरु शिष्यांची परंपरा पारंगत चालत आलेली आहे.

गुरुकृपा हे ध्यानाचे आणि मोक्षाचे मूळ असल्यामुळे सद्गुरु लालगीर स्वामींची सेवा पूजा करून त्यांच्या असंख्य शिष्यांना गुरुप्रसाद व मोक्ष मिळाला. लालगीर स्वामींच्या संजीवन समाधी समोर या मंदिरात सभामंडपात व्यापकानंद गिरी महाराजांची समाधी आहे. तसेच मंदिराच्या कडेला अन्नपूर्णा मातेची समाधी आहे. अन्नपूर्णा या येथील साध्वी होऊन गेल्या. “अन्न हे पूर्णब्रह्म आहे” म्हणून या साध्वी त्या काळात थोडेसे अन्न शिजवून संपूर्ण परिसराला अन्नदान करीत होत्या. म्हणून त्यांना अन्नपूर्णा देवी या नावाने येथे ओळखले जायचे. त्यामुळे तीच प्रथा पुढे चालू ठेवत येथे आजही मोफत अन्नदानाचा रोज लाभ मिळतो.
आजूबाजूच्या परिसरातून भक्तगण मोठ्या प्रमाणात साबुदाणा खिचडी साठी लागणारे साहित्य, लापशी साठी लागणारे साहित्य, चहा करण्यासाठी लागणारे साहित्य,आमटी भातासाठी लागणारे साहित्य इत्यादी किराणा वस्तू दान करतात. भक्तांच्या या दान कार्यातूनच येथे दररोज मोफत चहा, नाश्ता,उपवासाची खिचडी आणि महाप्रसाद मिळतो. तसेच अनेक शेतकरी फळांचेही दान येथे करतात. अशा अनेक प्रकारचा प्रसाद येथे येणाऱ्या भक्तांसाठी मोफत वाटला जातो. लालगिर स्वामी महाराजांच्या या समाधी मंदिराजवळ गणेश गिरी, आयतवार गिरी, सोमवार गिरी,सिताराम गिरी, मोती गिरी अशा इत्यादी साधूंच्या शिष्य परंपरेनुसार एकूण 18 समाध्या आहेत. येथे अशाच एक कल्याणगिरी नावाच्या साध्वी होऊन गेल्या.
याप्रमाणे या संत मंडळींनी या मांदळी गावात गुरु शिष्यांची संपूर्ण वस्तीच मांडली होती. या सर्व साधूंच्या समाधी स्थळाबरोबरच येथे लंबोदर, गजमुख, सिंदूर, पूर्वापुंज विद्यामाता, विघ्नविनाशक कर्ता, पार्वतीचा सगुणरूपी बालक, अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती आहेत. उजव्या सोंडेचा गणपती मनोकामना पूर्ण करतो असा भाविकांचा विश्वास आहे.त्यामुळे येथे येणारे भाविक गणेशाची मनोभावे पूजा करतात.त्याचप्रमाणे मंदिरात शनि मारुती मूर्ती असून येथे शनि अमावस्या दिवशी शनिशिंगणापूर सारखीच शनी दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भावीक गर्दी करतात. या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ असून गावातील मध्यवस्तीत भैरवनाथाचे मंदिर आहे. दरवर्षी येथे चैत्र वैद्य त्रयोदशीला भैरवनाथ महाराजांची मोठी यात्रा भरते.
तसेच अलीकडे लालगीर स्वामींच्या मंदिराची महती दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे आणि आजही येथे एक योगी आत्माराम बाबा वास्तव्याला असल्यामुळे जास्त मोठ्या श्रद्धेने भक्तगण येथे येत असतात. सध्या मांदळी गावामध्ये लालगीर स्वामी महाराजांचे शिष्य बालब्रह्मचारी आत्माराम गिरी महाराज पहुडण्याच्या स्थितीमध्ये तपचर्या करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या पहुडण्याच्या स्थितीमध्ये तपचर्या करत असून त्यापूर्वीही त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केलेल्या आहेत. ते स्वतःहून या स्थितीतून कधीही आपली जागा बदलत नाहीत तसेच याच स्थितीमध्ये ते भजन ही करतात. त्याचप्रमाणे मठातील सेवेकरी त्यांना लहान मुलाप्रमाणे घास भरवत असतात. तेही त्यांची इच्छा असेल तरच ते जेवण करतात नाहीतर अनेक दिवस ते आहारही वर्ज करतात.
बाबांची जशी स्थिती असते त्या स्थितीमध्ये कित्येक तास, कित्येक दिवस एकाच अवस्थेमध्ये ते राहतात. थोडक्यात पायाची बोटे वर धरने, पायाची आडी घालून तसेच राहणे, हात वर करणे,पाय वर करणे तसेच शक्यतो ते पायाची आडी घालून पहुडनेच्या स्थितीत असतात. आत्माराम गिरी स्वामी महाराजांची नखे फार वाढलेली असून त्यांच्या डोक्याचे केस पायाच्या ही खाली आले आहेत एवढे लांब केस आणि दाढी त्यांची वाढलेली आहे. आत्माराम गिरी महाराज असलेल्या खोली आतील बाजूस काचेच्या फर्निचर पासून बनवलेली असून महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे दर्शन रांग लागते. येथे महाराजांच्या जवळ जाऊन दर्शन घेता येते परंतु महाराजांचे पदस्पर्श करता येत नाहीत.
मांदळी गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेबरोबरच विजयादशमी, आषाढी एकादशी,महाशिवरात्री, अखंड हरिनाम सप्ताह,दिंडी सोहळा, दत्त जयंती असे लालगीर स्वामी महाराज काळापासून पूर्वापार चालत आलेले कार्यक्रम आणि सोहळे मोठ्या भक्ती भावाने साजरे केले जातात. येथे आता फार मोठे भक्तनिवासही बांधलेले आहे. तसेच मंदिराचे संगमरवरी दगडामध्ये प्रशस्त बांधकाम चालू आहे. मुबलक पाणी,पार्किंगची व्यवस्था, गोशाळा, मोफत अन्नप्रसाद, आणि जुन्या काळातील साधू बालब्रह्मचारी आत्माराम गिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे तसेच त्यांच्या आशीर्वादाच्या प्रचितीमुळे तीर्थक्षेत्र मांदळी हे जणू प्रति पंढरपूरच झाले आहे.मांदळी गावात प्रत्येक एकादशीला दूरवरून पायी दिंडी येतात.
तसेच मांदळी गावातून आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर आणि आळंदीला मोठमोठ्या लालगीर स्वामी महाराजांच्या पादुका पालखी सह दिंड्या जातात. अनेक भक्त येथे आत्माराम गिरी महाराजांना पाहण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात. त्यांचे भजन करताना युट्युब ला व्हिडिओ पाहणारांची संख्याही फार मोठी आहे. येथे महान योगी लालगीर स्वामी महाराज आणि बालब्रह्मचारी आत्माराम गिरी स्वामी महाराज यांच्या दर्शनाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्याची प्रचिती लोकांना येत असल्यामुळे अनेक भक्त येथे नवसही करतात. तसेच इच्छापूर्ती नंतर येथे पंगतीचे जेवण घालतात.
काही भक्त पंगतीच्या जेवणासाठी कोरडा शिधा येथे दान करतात तर काही भक्त मंदिराच्या बांधकामासाठी पैशाचे दान करतात. भक्तांनी दिलेल्या किराण्याचे येथील ट्रस्टी महाप्रसाद बनवून भक्तांसाठी महाप्रसाद देतात. आणि जमा झालेल्या पैशांपासून मंदिराचे प्रशस्त बांधकाम सुरू आहे.