श्री चोळप्पा महाराज | Shri Cholappa Maharaj

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये आले त्यावेळी प्रथम अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरातच ते तीन दिवस राहिले होते.ज्या खंडोबा मंदिरात महाराज प्रथम आले होते तेथे मोहम्मद रसुलदार नावाच्या माणसाने स्वामींची चेष्टा केली होती. नंतर चोळपांच्या (Shri Cholappa Maharaj ) घरी येऊन माझे आणि तुझे सात जन्माचे नाते आहे म्हणून मी तुझ्या घरी आलो आहे असे ते म्हणाले आणि तेथे त्यांनी जेवणही केले.

त्यामुळे चोळप्पा महाराजांना आपोआप श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती. हे त्यांचे सौभाग्यच मानले जाते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज चोळप्पाच्या घरी जास्त आणि मंदिरात कमी दिवस राहिले होते. त्यातूनच चोळप्पांची स्वामी भक्ती अधिक अधिक वाढत गेली होती. परंतु चोळप्पाच्या कुटुंबाची स्वामी भक्तीत चोळप्पाला पाहिजे तेवढी साथ मिळत नव्हती. तरीही चोळप्पाने स्वामींची एकनिष्ठेने भक्ती करून त्यांचे ते अंतरंग शिष्य झाले होते.

चोळपाच्या घरी राहात असताना स्वामी समर्थ महाराजांनी अनेक लीला केल्या होत्या. जसे की एक दिवस चोळपाला न सांगता स्वामी त्यांच्या हासापूर गावाला निघून गेले होते. नेहमीप्रमाणे चोळप्पा त्यांच्या मागे मागे चालू लागला. परंतु स्वामी रागावले आणि त्याला म्हणाले आम्ही वैरागी तुम्ही आमच्याबरोबर येऊ नये. तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळावा. चोळप्पा रडू लागला व स्वामींना म्हणाला मी प्रपंच सोडीन परंतु तुम्हाला सोडणार नाही. चोळप्पाची श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील पादुका चोळप्पाकडे फेकल्या. चोळपाने आनंदाश्रू गाळत त्या उचलल्या आणि घरी घेऊन आले. त्या पादुका आजही चोळप्पाच्या घरी समाधी मठात आहेत. त्यांचे दर्शन घेऊन कित्येकांचे व्याधी निवारण, संकट निवारण झाले आहे.

असाच एक प्रसंग म्हणजे चोळप्पाच्या बायकोला एक दिवस विंचू चावला होता. भयंकर वेदना होत असताना ती रडू लागली होती. अशातच स्वामींनी तिच्याकडे आपल्या चपला फेकल्या आणि तिला त्यामध्ये हात घालून बसण्यास सांगितले. तिने तसे केले असता तिच्या वेदना पूर्ण कमी झाल्या होत्या. परंतु हात बाहेर काढल्यानंतर परत वेदना सुरू व्हायच्या. शेवटी ती स्वामींच्या चपला मध्ये हात ठेवूनच झोपी गेली होती. अशा प्रकारे हळूहळू चोळप्पाच्या कुटुंबातील सर्वांची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा जडली होती. मात्र नंतर अक्कलकोटच्या राजांची स्वामींवर श्रद्धा बसली होती. तेही स्वामींचे भक्त झाले होते. म्हणून ते स्वामींना  रोज शिधा पाठवू लागले. आणि चोळपालाही पाच रुपये मंजूर झाले होते.त्यानंतर स्वामी महाराज क्वचित चोळप्पाकडे जेवण करत होते.

एकदा स्वामी महाराज चोळप्पा सोबत मनुरला गेले होते. नावेमधून भीमा नदीच्या पात्रातून जात असताना पुढे एक चितापूर नावाचे गाव लागले. काही क्षण थांबून स्वामी चोळप्पाला म्हणाले की, पुढे फार काटे कुटे आहेत. तू जनावरे घेऊन ये आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ चोळप्पाला काही कळला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा स्वामी त्याला जनावरे आणण्यास  सांगत होते. अंतर्ज्ञानी स्वामी महाराजांना त्याचे मरण कळाल्यामुळे स्वामींच्याही डोळ्यात अश्रू आले होते.

मग स्वामी महाराजांनी आपल्या हातातील कडे चोळप्पाकडे फेकून त्याला ते परिधान करण्यास सांगितले. अशातच जवळपास संध्याकाळच्या वेळी चोळप्पाचे हात पाय वळत नव्हते. तरीही स्वामी अक्कलकोटला निघून गेले होते. मग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर तिसऱ्या प्रहरी चोळप्पाचे निधन झाले. चोळप्पा मरण पावण्याच्या आधीच चोळप्पाने त्याच्या वाड्यातच स्वामींच्या समाधीची जागा ठरवून स्वामींची समाधी बांधून ठेवली होती. महाराज त्याला म्हणायचे  “ अरे चोळ्या अगोदर तुला यामध्ये मी गाडीन मगच मी जाईल ‘ आणि खरंच तसेच घडले. स्वामींच्या आधी सहा महिने चोळप्पाचे निधन झाले होते.शके १७९९ (इ. स. १८७७) मध्ये अश्विन शुद्ध नवमीस चोळप्पाचे निधन झाले होते.चोळप्पाच्या मृत्यूनंतर स्वामींच्या मनात चोळप्पा विषयी अधिक प्रेम वाढले होते. आणि स्वामींचे मन खूप दुःखी झाले होते.

अक्कलकोटला एका  वटवृक्षाजवळच स्वामींचे समाधी मंदिर आहे. त्यांनी भक्त चोळप्प्पांच्या घरी राहून तेथेच स्वामी महाराजांनी चैत्र वैद्य 1878 मध्ये समाधी घेतली. त्या काळात चोळप्पा महाराजांचे घर म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा मठ होता.मठाचे बांधकाम करून चोळप्पा महाराजांच्या वाड्यात समाधीसह महाराजांची एक मोठी मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटो, आणि दत्त परंपरेतील अवतारी महात्म्यांचे  फोटो बसवण्यात आले आहेत. चोळप्पा महाराज व स्वामी समर्थांच्या पादुकाही तेथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.तसेच स्वामी समर्थ महाराजांनी केलेल्या काही लीला फोटोच्या स्वरूपात आपनाला मठात पहावयास मिळतात.

अक्कलकोट ला आलेले सर्व भाविक स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन चोळप्पा मठात दर्शन घेण्यासाठी येतात. सकाळी सहा वाजता स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ महाराजांचा दुग्धाभिषेक करून वस्त्र अलंकार पूजा केली जाते. समाधीला चंदनाचा लेप करुन चांदीचे आवरण व स्वामींचा चांदीचा मुखवटा बसवला जातो. नंतर वस्त्र अलंकार करून  बेल फुले वाहिली जातात.पूजा चालू असताना मंत्रोच्चाराने येथे उपस्थितांच्या मनात अतिरिक्त ऊर्जा संचारते. तेथे योगेंद्र गुरुजी हे स्वामी समर्थांचे परमभक्त  चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज आहेत. तेथे अनेक भक्त स्वामींची पूजा, अभिषेक, आणि अन्नदानासाठी देणगी देतात किंवा ऑनलाईन देणगी सुद्धा स्वीकारल्या जातात.

आजही या समाधीस्थानाचे पूजन हे फक्त चोळप्पांचे  वंशज करतात. एकेकाळी देह रुपाने चोळप्पा महाराज येथे वावरत होते. परंतु आता तेथे ते शक्ती रूपाने आहेत याची अनुभूती भक्तांना क्षणोक्षणी येते. श्री स्वामी समर्थांच्या समाधी स्थानाजवळ चोळप्पांचा जुना वाडा आहे. येथे भक्तांना महाराजांनी दिलेल्या पादुकांचे व रुद्राक्ष माळेचे दर्शन घेता येते. जवळच सुरुवातीला स्वामी समर्थ ज्या मंदिरात आले होते ते खंडोबा मंदिर आहे. या वाड्यात स्वामींनी हाताळलेल्या आणि त्यांच्या दिव्य चमत्काराची अनुभूती देणाऱ्या कित्येक वस्तू आहेत. येथे गणेश मूर्ती बसवलेली आहे या गणेश मूर्तीची अनोखी कथा म्हणजे येथेच मागे स्वामी समर्थांची विश्रांतीची जागा होती. स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यानंतर त्या जागेवर रुईचे झाड आले होते.

नंतर 21 वर्षानंतर 1966 मध्ये त्याच्या खोडामध्ये गणपती प्रकट झाले. या गणपतीला मंदार गणेश असे नाव आहे. तेथे एक राजदंड आहे तो स्वामींना बडोद्याच्या संस्थानाने सुपूर्द केला होता. तसेच चोळपाच्या वाड्यात स्वामी समर्थ महाराजांच्या अंघोळीचा हंडा, चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांच्या भंडार खाना आहे. भंडार खाण्याच्या बाजूला स्वामी समर्थांची अत्यंत प्रिय कपिला गाय समाधी आहे.तसेच बीड जिल्ह्यातील नानासाहेब देशपांडे यांची समाधी येथेच आहे. तेथे प्रसिद्ध कुशावर्त्य तीर्थ नावाची विहीर आहे. समाधी स्थळातील पूजा आर्च्या करण्यासाठी याच विहिरीचे पाणी  वापरतात.

या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर कधीच आटत नसून येथील पाणी खूप चविष्ट आणि स्वच्छ असते.स्वामी प्रत्येक गावात जात असताना त्यांचा प्रवास मेण्यातून होत असे. त्या मेण्यामध्ये स्वामींच्या रक्तचंदनाच्या पादुका आहेत. इंग्लंडच्या कोड्याग कंपनीने काढलेले स्वामींचे ओरिजनल फोटो सुद्धा येथे चोळप्पाच्या वाड्यात आहेत. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचे शेज घर आहे.

समाधी मंदिराच्या बाजूला औदुंबराच्या झाडाखाली स्वामींनी स्थापन केलेले दत्तपादुका मंदिर आणि काही छोटी मंदिरे आहेत असा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा. चोळप्पा महाराजांनंतर गंगाधर महाराज नंतर गजानन महाराज शिवपुरे अशी गुरु शिष्याची परंपरा पुढे चालतच राहिली म्हणून या मठाला गुरु मंदिर असे नाव दिलेले आहे. येथे भक्तांना मोफत महाप्रसादाची सोय केली जाते की जी प्रथा बाळप्पानी पूर्वीच सुरू केलेली होती.

Leave a Comment