विद्वत्ता आणि दैवी शक्ती यांचा संगम झाला तरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते! आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे “पांडुरंगशास्त्री” (Pandurang Shastri Athavale ) होय. आज-काल समाजसेवा करणे ही एक फॅशन बनली आहे परंतु “ आनंदाने सेवा करणे आणि आनंद मिळवण्यासाठी सेवा करणे हेच महत्त्वाचे “ हे ब्रीदवाक्य आहे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते,आध्यात्मिक गुरू आणि समाज सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच आपले दादा यांचे.
ते महाराष्ट्रात मोठे भाऊ म्हणजे “दादा” या नावाने प्रचलित आहेत. जगभरात त्यांच्या योगदानातून अमाप कीर्ती मिळवलेले पांडुरंग शास्त्री यांचा जन्मदिन भारतात “मनुष्य गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 मध्ये कोकणातील रोहे गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव वैजनाथ आठवले आणि आईचे नाव पार्वती आठवले असे होते. तसेच त्यांना चार भावंडे सुद्धा होते. पांडुरंग शास्त्री यांचा विवाह 1944 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी गावच्या निर्मला सिधये यांच्याशी झाला होता. त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या कामात पुढे भरपूर साथ दिली होती.
1950 च्या दशकात पांडुरंग शास्त्री आठवले यांनी आपल्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली होती.त्यांचे वडील वैजनाथ आठवले हे संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते. रोह्यातच त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा ही तपोवन पद्धतीने चालणारी पाठशाळा सुरू केली होती. पांडुरंग शास्त्रींचे शिक्षण तेथेच रोह्याच्या सरस्वती संस्कृत पाठशाळेमध्ये झाले होते. तीक्ष्णबुद्धी असलेल्या पांडुरंग शास्त्री यांनी सर्व शास्त्र, व्याकरण,वेद, उपनिषद, स्मृती, पुराने, न्याय आणि साहित्य या सगळ्या ग्रंथांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला होता आणि शास्त्री ही पदवी संपादन केली होती. त्यांनी शास्त्रीय होण्याच्या अभ्यासाबरोबरच इंग्रजी विषयाचा अभ्यासही चांगला केला होता.
जवळ जवळ बारा वर्ष मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटी सेंट्रल लायब्ररी येथे कादंबरी आणि ललित पुस्तके सोडून त्यांनी जवळपास सगळ्याच पुस्तक आणि ग्रंथांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. त्यांच्या घरात पारंपारिक संस्कृत भाषेचे खूप महत्त्व असल्यामुळे पांडुरंग शास्त्री यांनासुद्धा संस्कृत शिकायची बोलायची आवड लागली होती आणि या आवडीमुळे त्यांना भागवत गीता अभ्यासायला सुद्धा आवडू लागले. याच भगवद्गीतेवर आधारित आणि भगवद्गीतेत दिलेल्या शिकवणी वरून 1954 मध्ये त्यांनी “स्वाध्याय“ परिवाराची स्थापना केली होती. तसेच पांडुरंग शास्त्री यांनी 1942 सालापासून म्हणजे वयाच्या केवळ 22 व्या वर्षी मुंबईच्या श्रीमद् भगवत गीता पाठशाळा, माधवबाग येथे प्रवचन करायला सुरुवात केली होती.
रॉयल एशियाटिक सोसायटी मध्ये त्यांचा अभ्यास चालू असताना त्यांनी 1954 मध्ये जपान येथे होणाऱ्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व केले होते आणि तिथल्या लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले होते.तेव्हा अवतार वाद आणि श्रीकृष्णाचे असामान्य तत्त्वज्ञान त्यांनी विश्व मंचावर मांडले होते. त्यावेळी त्यांच्या प्रवचनात “भक्ती इज सोशियल कोर्स “ म्हणजे भक्ती एक सामाजिक शक्ती आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी येथील भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषक विजेते डॉ.ऑर्थर क्रॉम्प्टन त्यांच्या भाषणाने विशेष आकर्षित झाले होते आणि त्यांनी युनायटेड स्टेट्स मध्ये शास्त्रीजींना एक चांगली संधीही दिली होती.
परंतु तेथे एका व्यक्तीने त्यांना विचारले होते की तुम्ही गीतेच्या तत्वज्ञान बद्दल बोलता परंतु त्या विचारावर चालणारे एक तरी गाव आहे का तुमच्या देशात? यावर पांडुरंग शास्त्री आठवले काही वेळ स्तब्ध झाले होते. तेव्हापासून त्यांनी भारत देशात असे रचनात्मक कार्य उभे करून दाखवेल असा निश्चय केला होता. गीतेच्या विचारांवर आधारित आणि दैवी संबंधाने जोडलेला असा एक वैश्विक परिवार तयार करायचा त्यांनी निश्चय केला होता. तसे पांडुरंग शास्त्री सुरुवातीपासूनच माणसामाणसाला भेटायला आणि दैवी विचार प्रसार करायला अनेक गावात,शहरात हिंडत असायचे. पुढे 1954 ते 55 नंतर या कार्याला मुहूर्त स्वरूप येऊ लागले होते.
शेकडो माणसे त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचाराने आकर्षित होऊ लागली आणि जोडली जाऊ लागली होती. हे सगळं कार्य स्वाध्याय परिवारा अंतर्गत पार पडत होते आणि आजही ते पार पडत आहे. स्वाध्याय परिवार म्हणजे नेमके काय? स्वाध्याय हा शब्द तसा आपल्याला अपरिचित नाही. परंतु त्याचा प्रत्यक्ष अर्थ सांगायचा झाला तर स्वाध्याय म्हणजे “आत्मपरीक्षण “ (Swadhyay literally means “Study of the self”) म्हणजेच स्वतःचा अभ्यास असा होतो.
या उपक्रमामुळे सामान्य माणसाच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. स्वाध्याय परिवार हा खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबासारखाच एक परिवार आहे. पांडुरंग शास्त्री यांनी परिवार हे नाव केवळ एक समूह म्हणून दिलेले नसून भगवंताच्या नात्याने एकत्र आलेला हा एक परिवार आहे असे म्हटले जाते. तसेच स्वतःतले ईश्वराचे अस्तित्व ओळखणे, माणसांमध्ये कृतज्ञतेची जाणीव आणि भावना निर्माण करणे, शिवाय आत्मगौरव आणि पर सन्मान म्हणजेच मनुष्य गौरवाचा अनोखा विचार हे या परिवाराचे मुख्य ध्येय आहेत.
पांडुरंग शास्त्री यांचे हे काम सर्व स्तराच्या,सर्व स्थितीच्या आणि सर्व जाती-धर्मांच्या माणसांसाठी असल्याने येथे सगळी लोकं जोडली जातात. येथे अपार वृद्ध तर असतातच परंतु तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त तरुणांचा सहभाग या स्वाध्याय परिवारामध्ये आणि या परिवारा मार्फत होणाऱ्या उपक्रमांमध्ये आजही असतो. आजच्या घडीला भारतात स्वाध्याय परिवाराची जवळपास 25 हजार युवा केंद्र चालू आहेत. म्हणजे अंदाजे पाच लाखापेक्षा जास्त तरुण पांडुरंग शास्त्री यांच्या या प्रयोगाशी जोडले गेले आहेत. भारतात जवळपास एक लाख गावांमध्ये स्वाध्याय परिवार पसरला आहे.
भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, केनिया, आघाती देश,ओमान, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, बहरीन, कतार यांसारख्या अनेक देशांमध्ये पांडुरंग शास्त्री यांचे विचार आणि कार्य रुजलेले आहे. तसेच त्यांचे कार्य किती मोठे आहे हे आपल्याला त्यांना मिळालेल्या रॅमन मॅगसेसे,टेम्पलटेन्ट पुरस्कार, पद्मविभूषण,महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार,आणि यासारख्या मिळालेल्या अनेक पुरस्कारावरूनही लक्षात येते.
अशा मानव हितवादी महापुरुषाचे 25 ऑक्टोबर 2003 मध्ये मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील ठाण्यामध्ये तत्त्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर लाखोंच्या संख्येने त्यांना आदरांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे हरिद्वार, कुरुक्षेत्र, गया, उज्जैन, पुष्कर आणि रामेश्वर अशा तीर्थक्षेत्री विसर्जित करण्यात आल्या होत्या.आपल्या वयाची एकूण 83 वर्षे त्यांनी समाजासाठीच व्यतीत केली होती.तसेच त्यांच्या या समाजकार्यात अखंड योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी 31 जानेवारी 2017 रोजी निधन झाले.
पांडुरंग शास्त्री यांनी आपल्या आयुष्याच्या अख्या प्रवासात धर्माला सोडून काही केलं नाही किंवा धर्माला पकडून बळच काहीही केलं नाही. त्यांनी मनुष्य गौरव हाच एक महत्त्वाचा धर्म मानला होता. आज पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या पश्चात त्यांच्या या सर्व कामाचा डोलारा त्यांची मुलगी धनश्री तळवळकर या समर्थपणे सांभाळत आहेत. त्या नेहमी असे म्हणतात की दादांनी बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या आणि माणसाला फोकस मध्ये ठेवून काम केले. त्यांनी लोकांना जात, धर्म, पंथ या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस शिकवला.
पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजे दादाजी यांच्या जीवनावर आणि प्रवचनावर तसेच वैदिक स्त्रोत्र, गीता आणि रामायण यावर आधारित वाल्मिकी रामायण, गीता अमृतम, संतांना श्रद्धांजली, प्रार्थना प्रीती, तुलसीदल, संस्कृती पूजन,विजिगीषु जीवनवाद अशी बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत .तसेच दादाजींनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,आणि संस्कृत अशा भाषांमध्ये अनेक प्रकारचे लिखाण केले होते.