मांढरची काळुबाई | Mandhardevi Kalubai

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढर गावाजवळ महादेव डोंगररांगेत अखंड महाराष्ट्राची आदिमायाशक्ती, कुल माता, म्हणजे आई काळुबाई मांढरदेवीचा गड ( Mandhardevi Kalubai ) समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर गर्द करवंदीवनात आहे. हे ठिकाण वाई भोर आणि खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. परंतु या गडावरती आई काळुबाई कशी प्रकटली त्याची एक आख्यायिका आहे. पौष पौर्णिमेला लाखो भाविक या ठिकाणी येतात.

आई काळुबाईच्या पायाशी नतमस्तक होतात आणि त्यांच्या मनातील सर्व मनोकामना येथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. परंतु पौष पौर्णिमेलाच आईची यात्रा का भरते यामागेही काही कारणे आहेत. आई काळुबाई या ठिकाणी कशी प्रकट झाली हे सांगताना एका अख्यायिकानुसार असे सांगितले जाते की, हा काळ होता द्वापार युगाचा. द्वापार युगाचा हा शेवटचा टप्पा सांगितला जातो. त्यावेळी एके दिवशी या मंदार पर्वतावर पाची पांडव अज्ञातवासासाठी आले होते.

अज्ञात वास म्हणजे कोणालाही दिसायचं नाही. अशावेळी देवांना काळजी पडली तसेच महादेवांनाही काळजी पडली की जर पांडव कोणाला दिसले तर परत पाची पांडवांना बारा वर्षांचा वनवास भोगावा लागेल. म्हणजे परत अज्ञात वास म्हणून पांडव जर कोणाला दिसले तर फार अनिष्ट होईल. म्हणून त्याचवेळी महादेव आपले सैन्य घेऊन या मंदार पर्वतावर आले होते. त्याचवेळी मंदार पर्वतावर लाख्यासूर नावाचा एक महान बलाढ्य राक्षस भगवान शिव शंकराची घोर तपश्चर्या करत होता. या लाख्यासूर राक्षसाने एका पायावर उभे राहून शेकडो वर्ष भगवान शिव शंकराची तपश्चर्या केली होती आणि भगवान शिव शंकरांना प्रसन्न करून घेतले होते म्हणून या लाख्यासूर राक्षसाला भगवान शिव शंकरांकडून त्याच्या मागणीप्रमाणे अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले होते.

परंतु वरदान देताना शिवशंकरांनी त्याला असे सांगितले होते की पशुपक्षी,प्राणी,माणूस तुला कोणीच मारू शकणार नाही परंतु स्त्री हा शब्द त्यावेळेस देवांनी वापरला नाही. पुढे नंतर या वरदानामुळे लाख्यासूर गर्विष्ठ आणि उन्मत्त झाला होता. त्यामुळे तो पृथ्वीवर अनेक ठिकाणी हैदोष घालत होता. त्याने अनेक देवी-देवतांची मंदिरे पाडण्यास सुरुवात केली आणि सगळीकडे सांगू लागला की देवी देवतांची पूजा करायची नाही लाख्यासुराची पूजा करायची. एवढ्यावरच लाखासूर थांबला नाही तर त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि इंद्रदेवांना हरवले. इंद्रदेवाकडे खडकआश्र होते परंतु तरीही ते लाख्यासुरावर चालले नाही. कारण त्याला अमरत्वाचे वरदान होते.

याच मंदार पर्वतावर त्यावेळी मांडले नावाचे ऋषी होते. ते भगवान शिव शंकराची तपचर्या करत होते. त्याचवेळी लाख्यासूर येथे आला आणि मांडल्य ऋषींनी केलेला यज्ञ लाथांनी ढकलला आणि ऋषींना दम भरला की आज पासून तुम्ही यज्ञ करायचा नाही . देव देवतांची पूजा करायची नाही, तर लाख्या स्वराची पूजा करायची. तेव्हा मांडल्य ऋषी म्हणाले हे लाख्यासुरा तुझ्या पायावर फुले वाहण्यापेक्षा आम्ही आमचा मृत्यू पत्करू. परंतु तुझी पूजा करणार नाही पूजा करणार तर देवी देवतांचीच. त्यावेळी लाख्यासुराने यज्ञाचा नाश करत ऋषीमुनींना ढकलले आणि तेथून निघून गेला.

त्यावेळी त्या परिसरामध्ये राहणारा मांडल्य ऋषींचा फार मोठा भक्तगण होता. त्यावेळेस सगळे लोक तेथे धावून आले आणि मांडल्य ऋषींकडे प्रार्थना करू लागले की, ऋषी महाराज तुम्ही काहीतरी करा आणि आम्हाला या लाख्यासुरापासून वाचवा. त्यावेळी मांडल्य ऋषी म्हणाले की, ही सृष्टी ज्यांनी बनवली, नटवली ते या सृष्टीचा नाश होऊ देणार नाहीत. देव आपल्याला नक्की मदत करतील. सत्याचा विजय हा नक्कीच होत असतो आणि आपल्याला शिवशंभुच वाचवतील असे ऋषींनी आपल्या भक्तांना सांगितले. तुम्ही सर्वांनी भगवान शिव शंकराची उपासना चालू करा. त्याच वेळी मांडल्य ऋषींनीही भगवान शिव शंकराची सामूहिक तपचर्या सुरू केली होती आणि परत फार मोठा यज्ञ तयार केला होता.

अशातच भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन पार्वती बरोबर शिवशंकर तेथे विराजमान झाले आणि मांडल्य ऋषींना विचारले की तुम्हाला काय वर हवा आहे. मांडल्य ऋषी म्हणाले की देवा, आम्हाला या लाख्यासुरापासून फार त्रास होत आहे. याच्यापासून तुम्ही आम्हाला वाचवा. त्यावेळी महादेवांनी सांगितले की आम्ही तुम्हाला असे कवच देतो की लाख्यासुर तुम्हाला काहीच करू शकणार नाही. परंतु मांडल्य ऋषी म्हणाले की असे कवच आम्हाला नको. सध्या अखंड सृष्टी लाख्यासुरामुळे भयभीत झाली आहे.

देवी देवतांची मंदिरे तो पाडू लागला आहे. याला तुम्ही मारून टाका. त्यावेळी महादेव म्हणाले की, मी स्वतः त्याला वरदान दिल्यामुळे मी त्याला मारू शकत नाही. अशावेळी पार्वती देवी म्हणाल्या हे देवराया जो या सृष्टीचा नाश करत असेल त्याला मारले पाहिजे. त्यावेळी महादेव म्हणाले की, हे देवी तू या पृथ्वीची आदीमायाशक्ती आहेस तूच त्याला मारु शकशील. त्यावेळी पार्वती मातेने काळेश्वरी चे भव्य असे रूप धारण केले. त्या अगोदर लाखा सुराचे भैरवनाथा बरोबर युद्ध सुरू होते. अशातच आदिमाया शक्ती काळुबाई भैरवनाथाच्या मदतीला धावून आली आणि असे भव्य रूप धारण केले की, अष्टभुजा, मुंडक्यांची माळ, जीभ बाहेर, सर्व हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आणि आई काळुबाईने आपला शंख वाजवला.

शंख वाजवल्याबरोबर महाभयंकर असे युद्ध सुरू झाले. तर हे युद्ध सलग सात दिवस चालू राहिले. सात दिवसानंतर आपल्या काळेश्वरीने लाख्यासुराचा वध केला. परंतु त्याचे जमिनीवर रक्त सांडले की त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन लाख्या सूर तयार व्हायचे आणि ते लाख्या सूर परत देवीची युद्ध करायचे. शेवटी देवी एका जंगलामध्ये निघून गेली आणि गुप्त झाली. त्यावेळी त्या ठिकाणी सटवाईमाता आली आणि काळेश्वरी ला म्हणाली की, तुला जर लाख्यासुराला मारायचे असेल तर,तू त्याला रात्रीचे मार आणि त्याचे रक्त पृथ्वीवर पडू देऊ नकोस.

त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी पौष पौर्णिमेला रात्री आई काळुबाईने आपला शंख वाजवला आणि लाख्या सुराशी पुन्हा युद्ध सुरू केले. महाभयंकर युद्ध परत चालू झाले आणि त्याच दिवशी मातेने लाख्या सुराचे मुंडके आकाशात उडवले आणि पडणारे रक्त स्वतः प्राशन केले. त्या अगोदर आई काळुबाई ने त्याची अखेरची इच्छा विचारली होती. तेव्हा लाख्या सुराने देवीला मी जर तुझ्या हातून मेलो तर तुझ्या पायापाशी मला जागा दे अशी इच्छा व्यक्त केली होती. देवीने त्याला दुसरी इच्छा विचारली असता त्याने मला माणसाचे रक्त प्राशन करण्यासाठी पाहिजे असे सांगितले होते. परंतु देवीने सांगितले होते की, इथून पुढे तुला माणसाचे रक्त मिळणार नाही परंतु पशुपक्ष्यांचे रक्त मिळेल. म्हणून पौष पौर्णिमेला काळुबाईच्या तिथे कोंबडी आणि बकरी लाख्या सुरासाठी कापले जातात.

मांढरच्या या गडाला मांडल्य ऋषीच्या नावावरून मांढर हे नाव पडल्याचे सांगितले जाते आणि त्याच ठिकाणी आदिमाया शक्ती काळुबाई गुप्त झाल्याचे सांगितले जाते. आत्ता मांढरला असणारी काळुबाईची वाघावर बसलेली मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. पुढे लोकांना हे सर्व समजले आणि तेथे लोक दर्शनासाठी जाऊ लागले आणि तेथे सुंदर असे मंदिर उभा केले. सध्या पौष पौर्णिमेला या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आईच्या दर्शनासाठी येत असतात.पौष पौर्णिमेला या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते आणि भक्त देवीच्या पायाशी नतमस्तक होतात, खणा नारळाने आईची ओटी भरतात, घरातील देव्हारे मातेपाशी आणतात

हजारो लोकांच्या अंगामध्ये आईचा संचार होतो असा भक्तांचा विश्वास आहे आणि भक्तांच्या सर्व इच्छा येथे पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. या ठिकाणी साताऱ्यातून वाईच्या मार्गे तसेच पुण्यावरून भोर मार्गे एसटी बसेस आणि खाजगी वाहनाने भाविकांना जाता येते. त्याचप्रमाणे शिरवळ वरून लोहम झगळवाडी मधून येथे पायी जाण्यासाठी रस्ता आहे. या वाटेने जाताना मध्येच एक कडक म्हसोबाचे ठिकाण लागते. याठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी जातात. येथे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आणि मांडल्य ऋषींची पत्नी मंडाबाईचे एक दगडी मंदिर आहे. समोरच एक गोमुख जलकुंड तीर्थ आहे.

येथील मंडाबाईच्या मंदिराची रचना हेमाडपंथी दिसते. साताऱ्यावरून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेवी मंदिरासमोर  एक मोठा सभामंडप आणि मंदिराला मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यावर सुंदर कळस असून सुंदर नक्षीकामाने सजवलेला आहे. देवळाच्या कळसावर गाय आणि सिंह यांच्या रेखीव मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिरासमोर सुंदर दीपमाळा आहेत. देवीच्या मंदिराजवळच देवीचे सेवक असलेले गोंजी बुवा आणि मांगीर बाबा यांची छोटी मंदिरे आहेत.

येथील संपूर्ण परिसर निसर्गरम्य असा नटलेला असून डोंगरदर्‍यामुळे येथे फार प्रसन्न वाटते. पौष पौर्णिमेला देवीला सोन्या नाण्याने मढवले जाते आणि हार फुलांनी मंदिराला सजवले जाते. या दिवशी देवीची पालखी निघते. आणि देवीच्या नावाचा जयघोष करत गावभर मिरवली जाते. येथील अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे लाखो भाविक पौष पौर्णिमेला या ठिकाणी यात्रेसाठी जातात. 

Leave a Comment