अभंग | Abhang

 अभंग ( Abhang ) म्हणजे कधीही भंग न पावणारा काव्यसंग्रह अशी अभंगाची व्याख्या आपण अनेक ठिकाणी ऐकली किंवा वाचली असेल परंतु अभंग म्हणजे नेमके काय हे सविस्तर पाहायचे असल्यास त्याचा एक प्राचीन इतिहासच आहे.मानवाची पहिली अभिव्यक्ती ही काव्यात्मक होती. सर्वच वाड्मयामध्ये आणि जवळजवळ सर्वच भाषांमध्ये कविता या वाड्मयाला पुरातन परंपरा असल्याचे दिसते. आपण जर साहित्याच्या कालखंडाचा विचार केला तर प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ,शिवकाळ, आणि  आधुनिक काळ असे काळाचे प्रकार पडतात. आणि या वेगवेगळ्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या साहित्याचा अनुष्कार आपणास पहावयास मिळतो.

कवितेचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे छंद आणि दुसरा म्हणजे मुक्तछंद. छंदबद्ध कवितेमध्ये छंद, वृत्त,जाती यांचे नियम पाडून पद्यरचना केली जाते. त्यामध्ये चरणांची मात्रा, अक्षरांची संख्या, लयचे बंधन, वर्णनाद, आकृतीबंध या सर्वांचा विचार करून सुंदर सुलभ रचना छंदबद्ध कवितेमध्ये केल्या जातात. अनेक अभ्यासकांच्या आणि विचारवंतांच्या मते तीच खरी कवितेची निर्मिती आहे. परंतु या सगळ्या छंदबद्ध  कवितांच्यापलीकडे जाऊनही मुक्तछंदांच्या रचना अनेक कवींनी केलेल्या आपणास पाहावयास मिळतात. या मुक्तछंद कवितांच्या रचनेमध्ये आशा आणि अभिव्यक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. कारण त्यामध्ये लय, ताल,नाद,अक्षरसंख्या या कोणत्याही गोष्टींचा विचार केला जात नाही.

तर त्यामध्ये आशा आणि अभिव्वेद परंतु मुक्तछंद रचना हया खूप उशिरा आपल्याकडे लिहू जाऊ लागल्या. परंतु त्यापूर्वी प्राचीन काळापासून छंदबद्ध रचना करणाऱ्या कवींची संख्या खूप होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये जे संत होऊन गेले त्या सर्व संतांनी अभंग,ओव्या,आरत्या,भारुडे, श्लोक, गवळणी असे वेगवेगळे प्रकार आपापल्या काव्यरचनेमधून निर्माण केले. त्यानंतरच्या आधुनिक काळाच्या सुरुवातीला म्हणजे शिव काळामध्ये लावणी,पोवाडा असे वेगवेगळे काव्यप्रकार निर्माण झाले.

पुढे त्यानंतर साधारणता इ. स.1874 नंतर जेव्हा भारतात इंग्रजी सत्ता होती आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली त्या काळचे आधुनिक कवी केशवसुत यांनी अनेक कवितेची निर्मिती केली.ज्यांना आधुनिक कवितेचे जनक म्हटले जाते.मध्ययुगीन कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आणि मध्ययुगीन काळातील सर्व संतांनी भक्ती साहित्याची निर्मिती केली. आणि या भक्ती साहित्यामध्ये त्यांनी जो काव्यप्रकार अस्तित्वात आणला तो होता “ओवी “. मध्ययुगीन कालखंडामध्ये “ओवी” प्रकार अत्यंत महत्त्वाचा  मानला जात होता. तसेच मध्ययुगीन कविता वाड्मयामध्ये मराठीतील ओवी या छंदात बऱ्याच संतांनी त्यांचे साहित्य लिहिलेले आहे. ओवी म्हणजे ओवणे  किंवा गुंफणे अशा अर्थाने घेण्यात आलेला होता.

एकेक शब्दाची माळ गुंफून तयार करणे म्हणजे ओवी तयार होते. आणि या ओवीच्या निर्मिती मागे भक्ती ही मुख्य प्रेरणा होती. ज्या रचनांच्या गायनाने मन हलके होते, मन उल्हासित होते आणि चित्तवृत्ती उल्हासित होतात त्या रचनांना छंद नावाने ओळखले जायचे. ना.ग.जोशी यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये ओवी हा पुरातन छंद होता असे म्हटले आहे. ते म्हणतात ओवी हा प्राचीन आणि प्राथमिक छंद होता ओव्यादेखील संतांनी रचलेल्या आहेत.

तसेच अभंग आणि ओवी हे सारखे वाटू शकतात परंतु रचनात्मक दृष्ट्या अभंग आणि ओवी  यामध्ये खूप फरक आहे.ओवी मध्ये शेवटचे चरण चार किंवा आठ अक्षरी असते आणि पहिल्या तीन चरणांमध्ये यमक जुळवलेले असते. अभंगांमध्ये सुद्धा असेच असते.ओवी ही दोन,तीन,साडेतीन,चार अशा चरणांची दिसते. तसेच ओवी हे स्त्रियांनी बनवलेले वृत्त आहे असे म्हटले जाते म्हणून ओव्या आणि लोकगीते आपणाला स्त्रियांनी जास्त करून हस्तांतरित केलेली व गायलेली आढळतात उदा.

ऐसी याची फलश्रुतीl
श्रवणे चुके अधोगतीl
 मानस हेच विश्रांती l
    समाधान ll

वरील उदाहरणांमध्ये ती, ती,ती असे यमक जुळवलेले दिसते. आणि शेवटचे चरण चार अक्षरी दिसते. अभंगामध्ये थोडे वेगळ्या पद्धतीने लेखन केले जाते. परंतु अभंग हा कवितेचा दुसरा प्रकार आहे. म्हणून अभंग प्रकारात अभंगाची रचना कशी असते ते आपण पाहूया.

सुंदरते ध्यान l उभे विटेवरी l कर कटावरी l ठेवूनिया ll

हा अभंग साडेतीन चरणाचा असून वैशिष्ट्य म्हणजे त्याचे तीनही चरण सहा अक्षरी आहेत. म्हणजे त्याच्या  प्रत्येक ओळीत म्हणजे प्रत्येक चरणात सहा अक्षरे दिसतात. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये यमक साधलेले दिसते. तसेच 16 अक्षरांचा, दोन समचरणांचा, षडाक्षरांचा, अष्ट अक्षरी अशा रचनेतही अभंगांची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारच्या सर्व अभंगांची निर्मिती उत्तराधुनिक कवींनी मध्ययुगीन काळात केलेली आढळते.अशा या अभंगाचे वर्णन “भंग न पावणारे अभंग” असे केले जाते.

एका एका अभंगावर, मोठमोठे कीर्तने,प्रवचने, किंवा अर्थ वर्णन  केले जाऊ शकते. वरील सर्व गोष्टींवरून ओवी आणि अभंग एकच असून ओवी चे कलात्मक रूप म्हणजे अभंग होय असे सिद्ध होते. अशा या अभंगांची परंपरा बाराव्या शतकापासून आपणास पहावयास मिळते. ज्या कवितेचा भंग होत नाही तिला अभंग असे म्हणतात तर भंग काय होते असा प्रश्न पडतो. त्याचे सविस्तर वर्णन काही अभ्यासकांनी मांडलेले आहे. खालील विषयांना धरून जर संतांच्या ओव्यांची रचना असेल तरच तो अभंग सिद्ध होतो. असे अभ्यासक सांगतात. अस्तोभंग, असंधिप्तता, अल्पअक्षरत्व, विश्वत्वमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य अशी जर अभंगाची रचना असेल तर त्याला अभंग म्हटले जाते.


अस्तोभंग – म्हणजे अभंग लिहिताना अवडंबर नसणे, म्हणजे उगाच कोणीतरी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचे उत्तर मनधरणी म्हणून केलेली उत्तराची सरबत्ती असा स्वार्थीपणा त्यामध्ये नसावा. सर्वांना जीवनात भोग असतात प्रत्येक जीवाला जीवनात सुखाची अभिलाषा असते आणि तो सुखाला प्राप्त करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो. प्रश्न असा आहे की हेच प्रश्न, प्रपंचातील प्रश्न साधू पुरुषांना विचारले जातात. जो कोणी साधू पुरुष या प्रपंचातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयारी दर्शवतो तो स्वार्थी असतो.

तुकोबारायांना हा प्रश्न विचारला गेला होता. सुख म्हणजे काय? त्याचे उत्तर गाथेमध्ये अगदी सुलभ दिलेले आहे. तुकोबाराय म्हणतात या अडचणींना, भोगांना सामोरे जा. भोग भोगून संपवले जातात त्यागून संपत नाहीत. भोग त्यागणाऱ्याला सुद्धा ते भोगावेच लागतात या मताचे तुकोबाराय होते.म्हणजे त्यांचे अभंग अस्तोभंग प्रकारात मुळीच मोडत नाहीत

असंधिप्तता– म्हणजे अभंगांमध्ये  ईश्वराशिवाय कोणाशी लगट केलेली नसणे, संत तुकाराम महाराजांची निष्ठा आणि अनन्यभावाची शरणागती त्यांच्या अभंगामधून आपणाला दिसते. त्यांनी विठ्ठलाशिवाय कोणाकडेही काहीही मागितले नाही. त्यांच्या अभंगांमधून ते सांगतात की, शेंदरी, हेंदरी दैवतीl कोण पूजी ही भुते खेते l बडिया माझा पंढरीराव ll यालाच निष्ठा आणि अनन्यभाव म्हणतात.

अल्पअक्षरत्व– म्हणजे अक्षरे कमी असावीत परंतु योग्य प्रकारे अचूक शब्दांमध्ये अभंग निर्देश जावा, उदा. “गोदेकाठी होता आड” म्हणजे गोदा हा शब्द गोदावरीचा अल्प अक्षर जरी असला तरी गोदा हा शब्द मूळ शब्द आहे, प्रचलित शब्द आहे, तो सहज गोदावरी शब्दापर्यंत पोहोचतो म्हणून तुकाराम महाराज त्याचा वापर करतात आणि स्पष्टपणे गोदावरी शब्दापर्यंत पोहोचवतात.

विश्वत्व मुखम– म्हणजे अभंगामध्ये विश्वाच्या ज्ञानामधील, नजरेमधील आणि मुखामधील शब्द असावेत. तुकाराम महाराजांनी कधीही सांगितले नाही की तुम्ही या ग्रंथाचे अध्ययन करा, त्या ग्रंथाचे अध्ययन करा. व्याकरण संगीत शास्त्र आणि भरतमुनींनी केलेले नाट्यशास्त्र असे आहे की त्याचा तुकाराम महाराजांवर कुठलाही परिणाम झाला नव्हता. संत तुकाराम महाराज हे लोकसंत होते लोकांमध्ये वावरायचे ते नेहमी समाजाला सांगायचे की जे ग्रंथ सहज उपलब्ध होतात त्यांचे तुम्ही अध्ययन करा.

तुकाराम महाराज म्हणतात “गीता,भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे” म्हणजे गीता भागवत उपलब्ध करण्यासाठी वेळ लागत नाही. गीता भागवत मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सायास करावा लागत नाही.गीता जगण्याचे तंत्र शिकवते तर भागवत मरण्याचे तंत्र शिकवते. असे हे विश्वत्त्वमुखम अध्ययन करावे.

सारग्रहण– सार ग्रहण म्हणजे त्या काव्यप्रकारामधून काहीतरी सार निघावे म्हणजेच काहीतरी तथ्य निघावे. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगांमध्ये, प्रत्येकी चरणामध्ये आणि प्रत्येक अक्षरांमध्ये काही ना काही तथ्य आहे. त्यातून काहीतरी सार निघते.

दोषराहित्य– म्हणजे द्विरोप्ती, निरोप्ती, चतुरोप्ती किंवा गागा प्रकारचे दोष  वाड्मयामध्ये लागतात या दोष निवृत्त संबंधाने सजगता लेखकाची, कवीची किंवा संतांची असावी. संत तुकाराम महाराज म्हणतात की, “ शरण शरण जी हनुमंता l तुम्हा आलो रामदूता ll “ त्यांनी हनुमान रायाला येथे देव मानले आहे. देवाशी बोलताना दुहेरी उल्लेख केला जात नाही आणि संतांशी बोलताना एकेरी उल्लेख केला जात नाही. कारण देवाशी असणारी जवळीक आणि संतांचा असणारा आश्रय हाच मनाचा समाधान मार्ग असतो. हाच मोक्ष मार्गाला पाठवू शकतो. अशाप्रकारे निर्दोष अभंगांची रचना अनेक संतांनी, महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी करून ठेवलेली आहे.

Leave a Comment