कीर्तन ( Kirtan ) – माणसांमध्ये परिवर्तन करणारे आणि माणसाचे वर्तन सुधारण्याचे प्रभावी साधन म्हणजे कीर्तन ( Kirtan and Pravachan ) होय. कीर्तनामध्ये साधू संतांच्या वाणीतुन निघालेले बोध म्हणजे संतांनी लिहिलेल्या ओव्यांवर प्रबोधन केले जाते.
हे कीर्तनरुपी प्रबोधन करत असताना साधुसंतांचा आचार, विचार, संचार, उच्चार आणि प्रचार याची एक वाक्यता असते. तसेच कीर्तनामध्ये समता असते, ममता असते आणि उद्धाराची क्षमता असते. म्हणून आजही फार गर्दी नसेल परंतु दर्दी लोकआणि तरुण पिढी सुद्धा कीर्तनाकडे आकर्षित आहे.किर्तन म्हणजे एक पात्री नाट्य म्हणायला काही हरकत नाही. किर्तन ही ब्रह्मकला व चीतकला आहे. तसेच माणसाला सुधारणारी फार मोठी शक्ती आहे. त्याचप्रमाणे कीर्तनामध्ये जी सात्विकता,तात्विकता आणि पावित्र्य आहे
त्यामुळे कीर्तन कलेला कधीच मरण नाही. चैतन्यावर आधारित ही कला असल्यामुळे ही चैतन्य कला आहे. तसेच माणसांमध्ये खोलवर रुजणारी, भावणारी आणि माणसांमध्ये आध्यात्मिक बदल व माणसाचे वर्तन सुधारणारी कला आहे. किर्तन सादर करण्याच्या काही पद्धती आहेत त्या म्हणजे रामदासी कीर्तन, हरिदासी कीर्तन आणि वारकरी कीर्तन त्यातील सगळ्यात प्रचलित म्हणजे वारकरी कीर्तन होय. वारकरी कीर्तन हे खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या उत्सवानिमित्त, यात्रेनिमित्त, देव देवतांच्या जयंतीनिमित्त
तसेच इत्यादी कार्यक्रमानिमित्त आयोजित केले जाते. या कीर्तनात सकाळी काकड आरती पासून ते शेजारती पर्यंत म्हणजे सात दिवस सतत नामाचा गजर आणि त्यामध्ये प्रबोधन करणारे कीर्तनाचे साधन असते. अशा या कीर्तनामध्ये एक वारकरी विना घेतो आणि राम कृष्ण हरी नामाच्या गजराने कीर्तन सुरू होते. पहिल्यांदा माऊलींचा “रूप पहाता लोचनी” हा अभंग घेतला जातो आणि त्यानंतर कीर्तनाचा मुख्य अभंग कीर्तनकार ह भ प महाराजांकडून सुरू केला जातो. मग महाराज त्यावर दृष्टांतासह निरूपण
करतात. तसेच मध्यंतरी अधून मधून विठोबा रायाचे भजन घेतले जाते. प्रथमतः विठ्ठल विठ्ठल भजन घेतले असता कीर्तनकाराला हार घातला जातो. उत्तरार्धामध्ये दृष्टांत च्या माध्यमातून घेतलेल्या अभंगाचे सिद्धांत दृष्टांत च्या आधारे भाविकांना पटवले जातात किंवा भक्तामध्ये ते रुजवले जातात. तसेच महाराजांकडून दिलेले दृष्टांत हे रंजकमय, लोकांना हसवणारे, लोकांची करमणूक करणारे व व्यवहारातील आणि चालू घडामोडीतील असतात. शेवटी माऊलींचे भजन घेऊन कीर्तनाचा समारोप केला जातो. त्यानंतर भैरवी घेतली जाते व कीर्तन समाप्त केले जाते.
दुसरी कीर्तनाची पद्धत म्हणजे रामदासी पद्धत. यामध्ये त्यांच्या पद्धतीने कीर्तनामध्ये अधून मधून घेतले जाणारे भजन विठोबा रखुमाई ऐवजी रघुपती राघव राजाराम भजन घेतले जाते. त्याचप्रमाणे हरिदासी कीर्तन पद्धतीत उत्तरांगांमध्ये आख्यान असते.परंतु सर्व कीर्तन पद्धतीमध्ये संतांचे थोर विचार भाविका पर्यंत पोहोचणे हे एकच ध्येय असते. कीर्तनामध्ये हे सारे जगच विष्णुमय आहे हे पटवून दिले जाते. अस्पृश्यता निवारण,उच्च नीच भेद, गरीब श्रीमंत भेद, व्यसनमुक्ती अशा महत्त्वाच्या विषयावर व संतांच्या विचारावर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते.
प्रवचन ( Pravachan ) – किर्तनाबरोबर प्रवचनाचेही महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे आहे. आध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून संतांच्या अभंग गाथेमधील ओव्या प्रवचनासाठी घेऊन त्यांचा कथेच्या स्वरूपात विस्तार केला जातो. आणि संतांच्या विचारांची मुखाने दृष्टांत जोडून माहिती पटवून दिली जाते. प्रवचन करत असताना शक्यतो संगीताची साद नसते. हिंदू धर्मामध्ये अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जसे की वर्षश्राद्ध, दशक्रिया विधी, अभिष्टचिंतन सोहळे आणि इतर छोटे कार्यक्रम इत्यादीसाठी प्रवचन ठेवले जाते.
एखाद्या कार्यक्रमाला अनुसरून संतांचे विचार स्पष्टीकरण करण्याच्या कार्यक्रमाला अध्यात्मिक प्रवचन असे म्हणतात. किर्तन म्हणजे एखाद्या अभंगातील चार चरणाचे निरूपण म्हणजेच चार चरणाचा विस्तार दृष्टांत सह स्पष्ट करणे. तसेच प्रत्येक चरणात कीर्तनकार संत ज्याप्रमाणे उपदेश करतात त्याचप्रमाणे प्रत्येक चरणात विस्तार करून सांगतात. त्याचप्रमाणे प्रवचन म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी सारख्या इतर संत गाथा, ग्रंथातून एक दोन ओव्या प्रवचनासाठी घेऊन कथा स्वरूपात त्याचा विस्तार केला जातो. आणि भाविकांना ते समजून सांगितले जाते.
कीर्तनकार पोशाख ( Kirtankar Costume ) – कीर्तन करत असताना कीर्तनकार पांढरे धोतर,पांढरा पटका, पांढरा सदरा, खांद्यावर किंवा कमरेला पांढरे उपरणे अशी वेशभूषा परिधान करतात. डोक्यावरील पटका म्हणजेच फेटा कदाचित वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांचा असू शकतो परंतु कीर्तनकाराचा पोशाख हा पांढराच असतो. वर्षानुवर्षे कीर्तनकाराचा हाच पोशाख आहे , त्यात बदल झालेला नाही . सध्याच्या काळात उच्च शिक्षित तरुण कीर्तनकार होत असल्यामुळे काही तरुण कीर्तनकार पांढऱ्या कपड्यावर कोट परिधान करतात.
संगीत ( टाळ, वीणा, मृदुंग ) –
कीर्तन करत असताना त्याबरोबर संगीत महत्त्वाचे असते. त्यामध्ये टाळ , वीणा , मृदुंग इत्यादीचा समावेश असतो. गाणे, नाचणे,आणि टाळ वाजवणे हे कीर्तनावेळी एकाच पात्रात दिसून येते. त्यात अभंग वाणी ही त्यांचीच असते. तसे इतर कार्यक्रमात या सर्व गोष्टी वेगवेगळे पात्र करत असतात. म्हणून कीर्तनामधील संगीत कला ही पूर्ण संगीत म्हणून संबोधले जाते. याला भावपूर्ण संगीत असेही म्हणतात. वारीमध्ये वारकऱ्यांची अनेक दिवस संगीताची भाव समाधी लागलेली असते. विना कीर्तनामध्ये प्रमुख असून टाळ आणि
मृदुंग सुद्धा फार महत्त्वाची असतात. प्राचीन कलेमधील मृदंग देव देवतांना अतिशय प्रिय आहे. मृदुंगला शिवाचे वाहन समजतात. मृदुंग प्रामुख्याने भजनाच्या वेळी जास्त वापरले जाते. त्यामुळे भजनाला लय आणि ताल मिळतो. तसेच मृदुंगामुळे भजनाला वेग आणि ऊर्जा मिळते.म्हणून भजन चांगले होते. कीर्तनामध्ये टाळ आणि मृदंग एकत्र वाजवले जातात. त्यामुळे भजनाला खूप रंगत येते.
वारीमध्ये टाळ आणि मृदुंगाचा वापर जास्त होतो. वीणा सुद्धा प्राचीन वाद्य असून ते तंतुवाद्य आहे. वीण्याचा आवाज कंपनाद्वारे निर्मित होतो. वीन्याचे तीन-चार प्रकार आढळतात जसे की, रुद्र, तंजोरी, विचित्रा आणि गोटूवाद्यम वीणा . लाकडापासून तयार केलेले हे वाद्य भारतीय संस्कृतीत ज्ञान आणि विद्येची देवता सरस्वती देवीला फार प्रिय आहे. संस्कृत मध्ये वीणा वाद्याला कच्छपी असे म्हणतात. कीर्तनामध्ये कीर्तन पूर्ण होईपर्यंत वीणा खाली ठेवत नाहीत. तो प्रथम वारकऱ्याच्या आणि नंतर कीर्तनकाराच्या गळ्यात
घातला जातो. कीर्तनाच्या अशा महात्म्यामुळे सध्याच्या काळात किर्तन आणि प्रवचन शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी आळंदी, पंढरपूर सारख्या शहरांमध्ये किर्तन शाळेत जातात. शालेय शिक्षण घेत असताना हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे ठरणारे अध्यात्मिक शिक्षण घेण्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. किर्तन व प्रवचनाचे प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना संगीत कलाही शिकवली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी याकडे आकर्षित होत आहेत.