तीर्थक्षेत्र शेगाव |Tirth Kshetra Shegaon

महाराष्ट्र राज्यातील विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अकोला तालुक्यात श्री क्षेत्र शेगाव (Tirth Kshetra Shegaon ) हे संत गजानन महाराजांचे समाधी स्थान म्हणून प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे. ब्रह्मावतार श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पावन झाली असून या ठिकाणाला विदर्भातील लोक प्रतिपंढरपूर समजतात. प्राचीन काळात शृंगमुनी यांनी हे गाव वसवले होते म्हणून या गावाला शृंगगाव असे नाव पडले. त्यालाच पुढे शेगाव म्हटले जाऊ लागले.

त्या अगोदर येथील प्रख्यात शिवमंदिरामुळे या गावाला शिवगांव म्हणून ओळखले जायचे. या गावाच्या नावाबद्दल विविध मतांतरे असले तरी सध्या ते परब्रम्ह संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्यामुळे नावारूपास आले आहे. श्री गजानन महाराज त्यांच्या अवतार कार्याच्या समाप्तीच्या शेवटी हरि पाटलांसोबत पंढरपूरला गेले होते. असेही सांगितले जाते की, श्री गजानन महाराजांना पंढरपूर मध्ये समाधी घ्यायची होती परंतु साक्षात पांडुरंगाच्या आदेशाने त्यांनी शेगाव मध्ये समाधी घेतली. तसेच ऋषीपंचमी चा पुण्यदिनही त्यांनी अगोदरच ठरवल्याचे सांगितले जाते. त्यांच्या समाधी प्रसंगी लाखोंच्या संख्येने लोक हजर होते.

अनेक सुवासिनींनी त्यावेळी त्यांची पूजा केली होती. त्यांच्या अंगाला सुगंधी द्रव्य लावून त्यांना स्नान घालण्यात आले होते. त्यादिवशी सूर्यकिरण जमिनीवर पडताच परब्रम्ह गजानन महाराजांनी आपले प्राण ब्रह्मरंध्रातून अनंतात विलीन केले. अनेकांनी शोक व्यक्त करून अश्रू ढाळले. श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची बातमी अनेक भक्तांना स्वप्नात जाऊन दिल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे त्यांच्या समाधीचा सोहळा शेगाव मध्ये अकल्पनीय झाला. गजानन महाराजांच्या अवतार कार्याच्या शेवटी सन 1908 मध्ये श्री गजानन महाराजांना आपले कार्य संपत आल्याची जाणीव झाली होती. विशेष म्हणजे त्याच वेळी गजानन महाराजांचे खास भक्त जगु पाटील नावाच्या भक्ताने महाराजांचे मंदिर उभारण्याची कल्पना महाराजांच्या इतर भक्तांकडे व्यक्त केली होती.

तसेच सर्वांनी मिळून त्यांची विनंती मान्य केली होती. गजानन महाराजांचा पूर्वीचा मठ माळी समाजातील लोकांच्या जागेत होता. त्यावेळी माळी समाज देशमुख यांच्या बाजूने होता व गावात वर्चस्व पाटील घराण्यातील मराठ्यांचे होते. गजानन महाराजांना ही तफावत अजिबात मान्य नव्हती. म्हणून श्री गजानन महाराजांनी मंदिर बांधण्यासाठी मराठा आणि माळी समाज या दोघांच्याही जागेचा उपयोग केला नाही. शेवटी गजानन महाराजांनी एका जागेकडे बोट दाखवून “मी येथे राहील” असे सांगून त्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु ती जागा सरकारी असल्यामुळे महाराजांचे परमभक्त हरी कुकाजी पाटील यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकारकडे दाखल केला होता.त्यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे सरकारी अधिकारी डेपोटी कमिशनर करी साहेब हे होते. त्यांनी 1901 च्या ठरावानुसार मंदिरासाठी एक एकर जागा शासनामार्फत देऊ केली होती.

तसेच दिलेली एक एकर जागा विकसित केल्यानंतर आणखी एक एकर जागा मंदीरासाठी देण्यात येईल असा शेराही करी साहेबांनी दिला होता. जागा मिळाल्यानंतर श्री गजानन महाराजांचे भक्त हरी पाटील व बंकटलाल यांनी आम्ही दोघेच या मंदिराचे बांधकाम करू शकतो असे महाराजांना सुचवले. परंतु महाराजांना सर्व भक्तांकडून हे काम करून घ्यायचे असल्यामुळे 12 सप्टेंबर 1909 रोजी श्री गजानन महाराजांनी श्री नारायण पाटील यांच्या अडत दुकानावर महाराजांचे भक्त,गावकरी व व्यापारी या सर्वांची एक सभा बोलावली. त्या सभेमध्ये प्रत्येक अडत्याच्या प्रत्येक कापसाच्या गाठीवर काही कर आकारण्यात आला.

अशा प्रकारे धर्मादाय निधीतून मंदिराच्या बांधकामासाठी पैसे जमा करण्यात आले. आणि मंदिराच्या जागेवर एक दगडी शिळा ठेवून आजूबाजूला बांधकामास सुरुवात झाली. तसेच मूळ मंदिराचे बांधकाम दगड चुना आणि रेतीने करण्यात आले. सध्या गजानन महाराजांच्या समाधी स्थळावर भव्य दिव्य अशी इमारत उभी केलेली असून ज्या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीसाठी शिळा ठेवली होती त्या ठिकाणी महाराजांची संगमरवरी मूर्ती बसवलेली आहे. या जागेला भुयार असे म्हणतात. येथे भुयारात प्रवेश केल्यानंतर महाराजांच्या मूर्तीचे दर्शन होते. मंदिराच्या बाहेरील बांधकामावर पौराणिक काळातील शिलालेख आढळतात.

भुयारातून पुढे गेल्यानंतर तळ मजल्यातून राम मंदिरात प्रवेश होतो. असे या हेतूने केले आहे की संतांकडे गेल्यानंतर संत देवाकडे घेऊन जातात. गजानन महाराजांच्या मंदिरासाठी एक भव्य दिव्य सभा मंडप असून हनुमान आणि राम मंदिराला जोडल्या जाणाऱ्या सभामंडपाच्या आतल्या भागात व वरच्या भागात महाराजांच्या अनेक लीलांचे चित्र काढलेले आहेत. तसेच महाराजांच्या समाधी स्थानावर संगमरवरी पादुका प्रस्थापित केलेल्या आहेत. तेथेच मागे विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून त्यालाच महाराजांचे समाधी स्थळ असे म्हटले जाते. तेथे जवळच एक शयनगृह व महाराजांचा त्याकाळी वापरात असलेला पलंग ठेवला आहे. येथे महाराजांच्या वापरात असलेल्या अनेक वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत. महाराजांच्या समाधी ग्रहण स्थळाबाहेर औदुंबर वृक्ष व मारुतीची प्राचीन मूर्ती आहे.

मुख्य प्रवेशद्वारा बाहेर डाव्या बाजूला नाग देवाचे मंदिर व महाराजांचे सेवक बाळाभाऊ महाराज व नारायण महाराज यांच्या समाध्या आहेत. भक्तांना जप,पारायण, ध्यान, भजन व चिंतन करण्यासाठी येथे एक पारायण मंडप आहे. महाराजांच्या मंदिराची भव्य दिव्य इमारत वर्णन करेल तेवढी कमीच आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या सेवेसह इमारतीची, भक्तनिवासाची आणि इतर सर्वच बाबींची देखभाल येथील गजानन महाराज संस्थान पाहते.येथील भक्त निवासात भक्तांना राहण्यासाठी अल्प दर आकारले जातात.भक्त एकूण 700 पेक्षा जास्त खोल्यांची सुविधा असून ऐनवेळी येणाऱ्या जास्त भक्तांसाठी ज्यादा 5000 पेक्षा जास्त बिछाने ठेवण्यात आलेले आहेत. येथील भक्त निवासात भक्तांच्या आवडीप्रमाणे एसी सुविधा सह वेगवेगळ्या निवासाची व्यवस्था केलेली आहे.

गजानन महाराज संस्थान मार्फत मोफत महाप्रसाद, कमी दरात जेवणाची व्यवस्था,विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा, सेवार्थ बस सेवा असे अनेक प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वच महत्वाच्या शहरांमधून शेगावला येण्यासाठी एसटी बसेस व खाजगी बसेस उपलब्ध असतात. तसेच मुंबई नागपूर मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. शेगाव मधील आयएसओ नामांकन मिळवलेली शेगाव कचोरी ( Shegav Kachori ) महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध झाली असून येथे येणारे भाविक शेगाव कचोरी खाण्याचा आनंद घेतात. याच गजानन महाराज संस्थान मार्फत येथे जवळच आनंद सागर नावाचे प्रेक्षणीय ठिकाण निर्माण केले आहे.

जवळपास 350 एकर पेक्षा जास्त जागेमध्ये हे आनंद सागर वसलेले असून त्यापैकी 120 एकर जागेमध्ये वेगवेगळ्या सुविधायुक्त आनंद सागर या स्थळाचे बांधकाम करण्यात आले आहे.महाराष्ट्रात तसेच देशभर हे ठिकाण प्रसिद्ध असून आनंद सागर या वास्तूच्या विस्ताराचे अजूनही काम चालू आहे. शेगाव बेलापूर रस्त्यावर शेगाव पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंद सागर मध्ये आनंद विसावा नावाचे प्रशस्त भक्त निवास असून येथे सुद्धा भक्तांच्या जेवणाची आणि राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

शेगावच्या गजानन मंदिरात परमपूज्य महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाक्त येतात आणि परब्रम्ह गजानन महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होतात. येथे अनेक भाविक गुप्तदान करतात ते अन्नधान्य किंवा जेवणासाठी लागणाऱ्या किराणा मालाच्या स्वरूपात असते. येथे हजारो लोक दररोज महाप्रसाद ( जेवणाचा ) लाभ घेतात. जेवण, साफसफाई, इतर व्यवस्थापन यासाठी अनेक सेवेकरी आपली मोफत सेवा देतात. ते आसपासाच्या परिसरातून तेथे सेवेसाठी येत असतात.

त्यांचे आलेल्या भाविकांबरोबरचे वागणे अतिशय नम्र असतें आणि ते अतिशय आनंदाने ही सेवा देत असतात. गजानन महाराज संस्थानामध्ये खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आणि लक्ष्मी एकत्र नांदताना दिसतात. येथील कारभार पाहून मन अगदी भारावून जाते तसेच महाराजांचे हे शेवगाव चे संस्थान एक उत्तम आणि आदर्श व्यवस्थापन म्हणून ओळखले जाते. शेगावच्या या अव्वल संस्थानाचा कारभार एकदम पारदर्शी आहे. शेगावला श्रींच्या दर्शनासाठी गेलेले भाविक मोटेचे शिवमंदिर, महाराजांचे प्रगट स्थळ, बंकटलालचा वाडा, हनुमान व शीतला माता मंदिर, तसेच एक जुने शिवमंदिर अशा पाच ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाहीत. तसेच आनंद सागर मध्ये जवळजवळ शंभर टक्के भक्तगण या रम्य ठिकाणी आपला जास्तीत जास्त वेळ देतात. शनिवार, रविवार व बुधवार, गुरुवार येथे जास्त गर्दी असते. आनंद विहार व आनंद सागर हे दोन्हीही मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहेत.

श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवा उत्तम दर्जाच्या असून येथे भक्तांना फोनवर सुद्धा मार्गदर्शन केले जाते.
1) श्री मंदिर परिसर संकुल – 07265- 252699, 252018 / 9423840852
२) भक्त निवास संकुल – 9850850891 / 9422064318 / 9423144709
३) आनंद विहार संकुल – 07265- 252019 / 9657449496
४) आनंद सागर विसावा संकुल- 07265- 253018 / 9657449495
५) पर्यायी निवास व्यवस्था – 9763743734 / 9881055023

Leave a Comment