14 जानेवारी 1268 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी संत चोखामेळा ( Sant Chokhamela ) यांचा जन्म झाला असे अनेक ठिकाणी नमूद असल्याचे आढळते. काहीजण त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाल्याचे सांगतात.तसे त्यांच्या जन्माविषयी विसंगत मतमतांतरे आढळतात. त्यांच्या आईचे नाव सावित्रीबाई आणि वडीलांचे नाव सुदामा यसकर होते. बहिणीचे नाव निर्मळा तर मेहुण्याचे नाव बंका होते. आणि त्यांच्या मुलाचे नाव कर्ममेळा होते. हे सर्व त्या काळचे कवी होते. त्यांची बहीण ही कोरेगाव पासून जवळच असलेल्या मेहुड गावात दिलेली होती.
संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत जनाबाई, संत सोपान,संत मुक्ताबाई,जगमित्र नागा, संत सावळामाळी आणि नरहरी सोनार हे त्यांचे समकालीन संत होते. भावाचे नाव चोखा आणि चोखा म्हणजे स्वच्छ, पवित्र आणि मेळा म्हणजे मैला आणि मैला म्हणजेच अस्वच्छ. तसेच मैला शब्द त्यावेळी महार या अर्थानेही वापरला जायचा. म्हणून चोखामेळा म्हणजे पवित्र महार अशा अर्थाने चोखामेळा हा शब्द तयार झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मेहुण्याचे नाव बंका ही अशाच पद्धतीने तयार झाल्याचे वाटते. बंका म्हणजे वाकडा, वेंका, व्यंकडी म्हणजेच श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची मूर्ती नेहमी एक पाय टांगलेली वाकडी असते.
चोखोबांची बहिण निर्मळा ही बंकाला देण्यात आली आणि बंकाची बहीण सोयराबाई ही चोखोबांना देण्यात आली. असे त्यांच्या लग्नाचे साटे – लोटे झाले. त्यानंतर चोखोबा पुढे पोटापाण्यासाठी मंगळवेढा या गावी गेले. मंगळवेढ्यापासून पंढरपूर जवळच असल्याने त्यांचा संबंध पंढरपूर मधील भक्ती संप्रदायाशी आला. दामाजीपंतही तिथलेच होते. पंढरपूर जवळच असल्याने ते वारकरी संप्रदायामध्ये विलीन झाले. त्यांना भक्ती संप्रदायांमध्ये आणण्यासाठी संत नामदेवांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. आणि तसे त्यांच्या वाङ्मयामध्ये आढळून येते. आणि मग ते पंढरपुरात आले आणि विठ्ठल भक्तीत मग्न झाले.
पुढे त्यांनी एका अभंगातून असे सांगितले की आमच्या अवतीभोवती दलित वस्तीत सर्व घाण आहे. त्यांचे वागणे बोलणे मला आवडत नाही. चोखोबांची अडचण ही होती की आवरर्णात त्यांना राहवत नव्हतं आणि सवर्ण त्यांच्यात त्यांना राहू देत नव्हता. कारण त्या वेळचा काळच असा होता की सवर्ण दलितांना त्यांच्यात सामावून घेणे अशक्य होते. त्यांना मंदिरामध्ये ही प्रवेश नव्हता. त्यामुळे चोखोबा सतत विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात तिष्ठत उभे असायचे. म्हणूनच संत नामदेव महाराजांनी मरणोत्तर चोखोबांच्या अस्थी मंदिराच्या महाद्वारा जवळच जमिनीमध्ये पुरून तेथे चोखोबांची समाधी बांधली.
पंढरपूरमध्ये राहूनच विठ्ठलाची भक्ती करायची म्हणून चोखोबांनी मंदिराच्या समोरच परंतु नदीच्या पलीकडील तीरावर एक झोपडी बांधली होती. आणि तेथे राहूनच ते भजन कीर्तन ऐकत व विठ्ठलाच्या भक्तीत विलीन होत आसत. या झोपडीतच त्यांनी एक दीपमाळाही बांधली होती. ते या झोपडीत राहिल्यामुळे ते दलित वस्ती पासून तसेच सुवर्णांपासूनही दूर राहिले आणि त्यांना तेथे विठ्ठलाची भक्तीही करता आली. परंतु त्यांच्या त्या झोपडीची जागा नंतरच्या काळात उत्तर भारतीयांनी बळकावली. मराठीचे फार मोठे लेखक,साहित्य अकादमीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी त्यावर एक कथाही लिहिलेली आहे
मनाने पवित्र आणि देहाने शुद्ध असलेल्या चोखोबांनी महान विठ्ठल भक्ती केली. त्यांची बायको सोयराबाई त्यांच्याच विचाराची असल्याने ती सुद्धा विठ्ठल भक्त होती. ते काही काळ मंगळवेढ्यास राहत होते मात्र त्यांना ओढ पंढरपूरच्या विठ्ठलाची असायची. सामाजिक दृष्ट्या मंदिरात जाण्याची परवानगी नसल्याने चोखोबा नेहमी मनाने कष्टी राहायचे. त्यांना रस्त्याच्या कडेला बसूनच भजन कीर्तन ऐकावे लागायचे तसेच पंगतीचे उष्टे अन्न प्रसाद म्हणून घ्यावे लागायचे. त्यांनी तसे लिहूनही ठेवलेले आहे.
जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll
बहु भुकेला झालो l तुमच्या उष्ट्यासाठी आलो ll
नेहमी ते विठ्ठल मंदिराच्या बाहेर महाद्वारा जवळ बसायचे. एकदा त्यांची देवाजवळ जाण्याची उत्कंठा एवढी वाढली की ते आपल्या जागेवरून हळूहळू पुढे सरकू लागले. इतक्यात पुजाऱ्याने त्यांना हटकले. कुठे चाललास असे दरडावून विचारले आणि त्याच्या अंगावर धावूनही गेले. मग घाबरून चोखोबा मागे सरकले. परंतु त्यांनी विठ्ठल नामाचा जप सोडला नाही. एकदा मध्यरात्री चोखोबा उठ ना…. आशी साद घातल्याचा त्यांना भास झाला. थोड्याच वेळात परत आवाज आला अरे तुला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे ना तर चल माझ्याबरोबर अशी हाक ऐकू आली. आणि खरोखरच स्वतः विठ्ठलांनीच त्यांना गाभाऱ्यापर्यंत नेहून आपल्या जवळ बसवले व चोखोबांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेतले. चोखोबांच्या अश्रूंनी पांडुरंगाच्या पायावर अभिषेक झाला.
आणि विठ्ठल चोकोबांना म्हणाले झाली ना तुझी इच्छा पूर्ण. चोखोबांनी सुद्धा देवा केवढे विशाल तुमचे अंतकरण, धन्य धन्य झालो मी असे म्हणत अश्रू ढाळले. तसेच विठ्ठलाने जाताना चोखोबांना आपल्या गळ्यातील रत्नहार तुलसीप्रसाद म्हणून दिल्याचेही सांगितले जाते.बऱ्याच वेळा संत चोखामेळा यांना वेठबिगारी करावी लागत असे. वेठबिगारी म्हणजे न सांगता त्यांना कामाला जुंपलं जायचं. त्या काळात सर्वच दलितांना वेठबिगारी करावी लागत असे.
असेच एकदा चोखोबांना मंगळवेढ्याचा वेठबिगार कामगार कुसू याने गावाची वेस बांधण्यासाठी मंगळवेढ्यास कामासाठी नेहले. आणि त्यात तेथे बांधकाम करत असताना बांधकाम कोसळून अनेक दलित कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये चोखोबांचाही देहांत झाला. चोखोबांचे प्रेत ओळखताना ज्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ते चोखोबांचे प्रेत असेल असा निष्कर्ष लावण्यात आला. आणि तसा उल्लेख एका अभंगातून संत नामदेवांनी केलेला आहे.
ही घटना 1338 मध्ये घडली. चोखोबांना एकूण 70 वर्षाचे आयुष्य मिळाले. या 70 वर्षांमध्ये त्यांनी अखंड विठ्ठलाच्या भक्ती बरोबरच अनेक अभंग रचले. संत चोखोबांच्या अभंगाची गाथा एकूण 358 अभंगाची आहे. त्यातील 55 अभंग विठ्ठल महिमेवर, 17 अभंग पंढरीच्या महिमेवर, एक अभंग आत्मनिवेदनेवर, बाल क्रीडेसाठी 4, करुणा या अर्थाचे 97 , परिपूर्ती आणि समाधानावर 4 अभंग, संत नामदेवांवर 37 अभंग, संत विषयावर 8 , उपदेशावर 52, भाव विषयावर 2 आणि विटाळ विषयावर 6, भक्त वत्सलता 11, बहार स्थिती 2, पांडुरंग विवाह 7, नामदेव स्तुती 32, ज्ञानदेव स्तुती 5, संकीर्ण 2, जोहार 3, आणि शेवटचा प्रसाद1 अशा एकूण 358 अभंगाची गाथा आहे. त्यातील सर्वात जास्त 97 अभंग हे त्यांचे जगण्याची स्थिती आणि करुणा सांगणारे आहेत.
तर त्यापाठोपाठ त्यांनी एकूण 37 अभंग संत नामदेव स्तुतीवर लिहिले. लेखक अनंत भट त्यांच्या अभंगाचे लिखाण करत असायचे. त्या काळात ब्राह्मणांचे अभंग दलित लिहून घेत असत व दलितांचे अभंग ब्राह्मणाकडून लिहून घेतले जायचे असे म्हणतात. फार मोठ मोठ्या गायकांनी संत चोखामेळा यांचे अभंग गायले आहेत. आणि आजही ते आपणास ऐकावयास मिळतात. संत चोखामेळा यांचा सर्वात लोकप्रिय अभंग म्हणजे
ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा l काय भुललासी वरलिया रंगा ll कमान डोंगी परी तिरं नोहे डोंगा l काय भुललासी वरलिया रंगा ll नदी डोंगी परी जल नोहे डोंगे l काय भुललासी वरलिया रंगे ll चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा l काय भुललासी वरलीया रंगा ll याचा अर्थ ऊस जरी वाकडा असेल तरी रस गोडच असतो, धनुष्यबाणाची कमान जरी वाकडी असली तरी तीर हा सरळच असतो, नदी जरी वाकडी असली तरी त्यातील जल हे पवित्रच असते. तसेच चोखा जरी महार असला, दलित असला तरी माझा भाव भोळा, सरळ आणि प्रेमळ आहे असे त्यांना त्यामधून सांगायचे आहे. संत नामदेव महाराज म्हणतात चोखोबांची स्थिती स्वतः विठ्ठलांनी अशी सांगितली आहे की,
चोखा म्हणे माझा l चोखा माझा जीव llचोखा माझा भाव l कुलधर्मदेव चोखा माझा ll
काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती I मीही आलो व्यक्ती तयासाठी ll माझ्या चुकीचे करिता जे ध्यान I तया कधी विघ्न पडून देयीll
याप्रमाणेच संत चोखोबांचे अनेक अभंगामधून थोर असे वर्णन नरहरी सोनार, संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मोरोपंत स्वरूपानंद स्वामी आणि अशा अनेक महान संतांनी केले आहे.