तीर्थक्षेत्र जेजुरी | Tirthkshetra Jejuri

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले,दुसरा कैलास पर्वत समजले जाणारे तसेच भारताची दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी गावाच्या जवळच असलेल्या डोंगरावर हिंदू धर्माचे श्रद्धास्थान आणि अख्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचे म्हणजेच मल्हारी मार्तंड यांचे देवस्थान आहे. यालाच जेजुरी गड किंवा खंडोबाची जेजुरी ( Tirthkshetra Jejuri ) असेही म्हणतात. पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा जोतिबा आणि जेजुरीचा खंडोबा यांना मानणारे आणि पूजणारे संपूर्ण महाराष्ट्रात अनंत कष्टकरी, शेतकरी तसेच विविध जाती धर्माचे लोक आहेत. परंतु जुना जेजुरी गड आणि नवा जेजुरी गड म्हणजे काय हे अनेकांना माहीत नाही.

खंडोबाचे जुने स्थान हे कडे पठारावर आहे आणि याच जुन्या कडे पठारावरून देव खंडोबा नवीन ठिकाणी कसे गेले याची एक सत्य कथा सांगितली जाते. कित्येक वर्षांपूर्वी जेजुरी जवळील एका गावामध्ये खंडोबाचे एक भक्त राहत होते. त्यांच्या घराण्यात त्यांचे पूर्वज सुद्धा पूर्वापार खंडोबाची कठोर भक्ती करत होते. ते दररोज कऱ्हा नदीचे पाणी घेऊन जुन्या गडावर म्हणजेच कडे पठारावर जाऊन देवाला स्नान घालायचे व देवाची पूजा करायचे.अशीच खंडोबाची सेवा त्यांनी आयुष्यभर केली.

पुढे काही काळानंतर त्यांचे वय झाल्यानंतर त्यांचे कडे पठारावर देवाला स्नान करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जाणे अशक्य होऊ लागले होते. असेच एक दिवस ते देवाला पाणी घेऊन गेल्यानंतर त्यांनी खंडोबाला विनंती केली की, हे देवा मी आता म्हातारा झालो आहे. मला आता तुझ्याकडे येणे होत नाही. तूच आता माझ्या घरी चल कारण मी तुझ्या भक्तीशिवाय जगणे अशक्य आहे. त्यांची ही विनंती देव खंडोबा ने मान्य केली परंतु ते म्हणाले की मी तुझ्या मागे येत असताना तू वळून मागे बघायचे नाही.

तु ज्या ठिकाणी मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी थांबेल. भक्ताने त्यांची ही अट मान्य केली आणि पुढे भक्त खैरे आणि मागे देव खंडोबा असे ते चालू लागले. असे करता करता आज ज्या ठिकाणी खंडोबा देवाचा नवीन गड आहे त्या ठिकाणी खैरे नावाच्या भक्ताला शंका आली की देव खरंच आपल्या पाठीमागे आहेत ना! म्हणून त्यांनी चुकून पाठीमागे पाहिले तर देव त्यांच्या पाठीमागे होते. मग देवाने घातलेल्या अटीप्रमाणे देवाने भक्त खैरे ना दर्शन देऊन त्याच ठिकाणी ते गुप्त झाले.

पुढे भक्त खैरे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याच ठिकाणी खंडोबा देवाचे छोटेसे मंदिर बांधले. त्याच मंदिराचे आज मोठे प्रशस्त मंदिर झाले असून जेजुरीच्या खंडोबा देवाचा हा नवीन गड भक्तांसाठी फार मोठे श्रद्धेचे ठिकाण झाले आहे. हे मंदिर हेमाडपंथी कोरीव काळ्या दगडामध्ये बांधलेले असून मंदिराचे बांधकाम अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील असल्याचे भिंतीवरील कोरीव अंकित शीला लेखातील पुराव्यावरून समजते. येथील या मंदिरात खंडोबा देवाची आणि माळसादेवीची सुंदर मूर्ती असून बाराव्या -तेराव्या शतकापासून खंडोबा ला पूजले जात असल्याचे पुरावे आढळतात.

मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी जवळपास 450 दगडी पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते. वाटेमध्ये खंडोबा महाराजांची दुसरी पत्नी बानाई देवीचे मंदिर लागते. चंपाषष्ठी च्या दिवशी येथे फार मोठा उत्सव भरतो आणि लाखो लोकांची गर्दी पहावयास मिळते. मुख्य मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या डाव्या बाजूला गणेश मूर्ती व उजव्या बाजूला दगडी शिलालेख आहे. तसेच मंदिराच्या परिसरात असलेल्या सभामंडपातील शिलालेख अनुसार मंदिराचे बांधकाम वीरपाल व वीर मल्ल यांनी इस 1248 मध्ये केल्याचे समजते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एकूण 450 पायऱ्या असून यालाच नऊ लाख पायऱ्या असे म्हटले जाते. कारण या पायऱ्या बांधण्यासाठी नऊ लाख दगड वापरलेले आहेत.

तसेच आदिलशहाच्या काळात जेजुरीचे मल्हार भक्त राघो मुंबाजी खटावकर यांनी सुद्धा सोळाव्या शतकामध्ये मंदिराचे बरेच काम केल्याचे समजते. तसेच जेजुरीच्या मध्यभागी गावकरी आणि भक्तगणांच्या पाण्याच्या सोयीसाठी मोठ्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करून पाण्याची सोय करण्यात आली होती. या विहिरीला खटावकर विहीर असे नाव पडले होते. याच विहिरीला सध्या काहीजण फकीराची विहीर किंवा चिल्लाळाची विहीर असे म्हणतात. त्याचप्रमाणे सन 1568 मध्ये आप्पाजी पुवशी, सन 1664 मध्ये गोविंद कुलकर्णी, सन 1732 मध्ये श्री गोंदेकर, सन 1736 मध्ये मल्हारराव होळकर, सन 1780 मध्ये तुकोजी होळकर अशा अनेकांनी गडावरील भिंती, दरवाजे, दीपमाळा, नगारखाना, रंग महाल, वेशी कमानी, कुंड, तळे, चिंचेची बाग इत्यादी बांधकामे आणि सुधारणा करून जेजुरी गडाचे जतन केले आहे. विशेष करून या जडणघडण मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वाटा मोठा ठरला आहे.

शिवशंकर म्हणजेच महादेवांचा अवतार असलेले खंडोबा कडे पठारावर कसे आले याचीही एक कथा सांगितली जाते. हजारो वर्षांपूर्वी लवथळेश्वर च्या डोंगरावर अनेक ऋषीमुनी राहत होते. त्या ऋषीमुनींना दोन राक्षस भावंडे मनी आणि मल्ल नावाच्या राक्षसांकडून मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यांना शक्तीचे वरदान होते. त्या शक्तीचा गैरवापर करून ते ऋषी, मुनी, योगी,साधुंना त्रास देत असत तसेच त्यांचा यज्ञ चालू असताना ते मोडत होते. अशा विचित्र परिस्थिती मध्ये हे सर्व साधूजन लवथळेश्वर येथे आपल्या कुटुंबासह लपून बसले होते. तेथे त्या सर्वांनी सार्वजनिक देवाची उपासना करून भगवान शिव शंकराला प्रसन्न केले.

मग भगवान शिव शंकराने म्हणजेच साक्षात महादेवाने काळभैरवाचे सूर्याप्रमाणे तेज असणारे रूप धारण करून हाती खडग घेऊन जुन्या पठारावर म्हणजेच कडेपठारावर मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला. त्यामुळे खंडोबाला मल्हारी असे म्हटले जाते. तसेच म्हाळसा देवीचा पति म्हणून म्हाळसाकांत असे म्हटले जाते. मार्तंड भैरव हे शिव शंकराचे रूप आहे. त्यांना दोन बायका होत्या. त्यांची पहिली बायको लिंगायत समाजातील माळसादेवी होती. लिंगायत समाज हा नेवासे मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

नेवासे येथील एक मोठे व्यापारी होते.त्यांच्या स्वप्नात त्यांची मुलगी म्हाळसाचे लग्न खंडोबा बरोबर होणार आहे असे आले होते. म्हणून ते खंडोबा कडे गेले आणि त्यांनी देवाला विनंती करून म्हाळसा आणि खंडोबाचे लग्न झाले. हे लग्न पौर्णिमेला पाली या ठिकाणी झाले होते. हे लग्न झाल्यानंतर पुढे काही दिवसातच धनगर समाजातील मुलगी बानाई खंडोबाच्या दर्शनासाठी आली होती त्यावेळी देवाने तिला पाहिले असता त्यावेळी त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. देव खंडोबाला बानाई बरोबर लग्न करण्याची इच्छा झाली होती.

परंतु हे लग्न करायचे कसे म्हणून देव म्हाळसा बरोबर सारीपाटाचा खेळ खेळले. त्यामध्ये माळसा आणि देवामध्ये खंडोबा महाराज हरले तर त्यांना बारा वर्षांचा वनवास ठरला होता. आणि तसेच घडले. देव सारीपाटी चा खेळ हारले आणि त्यांना बारा वर्ष वनवासात जावे लागले. त्यावेळी वनवास काळात ते बानाईला भेटण्यासाठी गेले. बानाईच्या बाबांकडे भरपूर मेंढरे होते. देवाने मेंढपाळाचे रूप घेऊन मेंढरे सांभाळू लागले होते. एक दिवशी देवाने बानाई चे सर्व मेंढरे मारून टाकले. देवाची इच्छा एकच होती की बानाई बरोबर माझे लग्न व्हायला हवे. बानाईच्या वडिलांना आणि आईला हा शिव शंकराचा अवतार आहे हे माहीत नव्हते.

नंतर देवाने आपल्या हातातील भंडारा मेंढरांच्या अंगावर शिंपडला असता सर्व मेंढे उठून उभी राहिली. नंतर देवावर बाणाईच्या आई-वडिलांची श्रद्धा बसल्यामुळे बानाई च्या वडिलांनी तिचे देवाबरोबर लग्न लावून दिले. शिव शंकरांच्या या अवतारावर म्हणजेच खंडोबा देवावर महाराष्ट्रातील कोळी, आगरी आणि धनगर समाजाचे लोक जिवापाड प्रेम करतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी देशातील कानाकोपऱ्यातून धनगर समाजाचे लोक खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. खंडोबाचा भंडारा जवळ ठेवणारे मेंढपाळ जंगलात, दर्या खोऱ्या मध्ये, स्मशानात आणि इतर कुठेही मेंढ्या बसवून त्यांचा सांभाळ करतात. देवाच्या विश्वासावर ते कशालाही घाबरत नाहीत. अशी श्रद्धा आणि एकनिष्ठता त्यांची खंडोबा देवावर असते.

वर्षातून एकदा का होईना परंतु आपले कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे जेजुरीला जात असतात. एवढेच नव्हे तर घरातील कुठल्याही शुभ कार्याच्या अगोदर आपले कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची पूजा केल्याशिवाय कार्याला सुरुवात केली जात नाही. तसेच नवीन लग्न झालेले वधू-वर जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या संसाराला सुरुवात करत नाहीत. लग्न झाल्यानंतर लगेच सहकुटुंब खंडोबा देवाचे दर्शन घेऊन तेथे जागरण गोंधळ घालतात किंवा घरी येऊन जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवतात.

घरी ठेवलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात कुलदैवत देव खंडोबा आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा रात्रभर गोंधळी गजर केला जातो आणि सकाळी नववधू-वर यांच्या हस्ते मनात देवाचा आदर ठेवून आणि इच्छा ठेवून नंगर तोडला जातो. तोडलेल्या नंगराचा एक तुकडा दाराच्या उंबरठ्यावर फिट केला जातो आणि दुसरा तुकडा घरातील देव घरात पूजला जातो. पूर्वी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात पाहुण्यांना आणि जवळच्या लोकांना मांसाहारी जेवण दिले जायचे परंतु सध्या ही प्रथा बंद झालेली असून आता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात गोड जेवण दिले जाते. पूर्वीच्या काळात जेजुरीच्या खंडोबाच्या डोंगर पायथ्याशी सुद्धा कोंबडी, बकरी कापून देवाला नैवेद्य दाखवला जायचा. परंतु सध्या ही प्रथा बंद झालेली असून आता गोड पोळीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.

संत नरहरी सोनार आणि संत एकनाथ महाराजांच्या ओव्या मधूनही जेजुरीचे महात्म्य अभ्यासायला मिळते.जेजुरीचे महात्म्य सांगणारी जेजुरी ही कविता अरुण कोलटकर यांनी लिहिलेली आहे. तसेच राज मेमाने यांनी लिहिलेल्या पेशवेकालीन जेजुरीचा इतिहास या पुस्तकातून संपूर्ण जेजुरीचा इतिहास वर्णिला गेला आहे. दक्षिण भारतात खंडोबाची 11 देवस्थाने आहेत परंतु खंडोबाचे मूळ जेजुरी गड हेच सांगितले जाते.

1 thought on “तीर्थक्षेत्र जेजुरी | Tirthkshetra Jejuri”

Leave a Comment