हरिपाठ म्हणजे काय | What Is Haripath

ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेला पाठ म्हणजे हरिपाठ ही काही अभंगांची रचना आहे. ( What Is Haripath ) हरिपाठाचा अर्थ हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान पंढरीनाथ पांडुरंग आणि पाठ म्हणजे अभ्यास किंवा स्मरण असा सांगितला जातो. हरिपाठ म्हणजे हरी नामाच्या महिमेचे स्मरण. हरी नामाचे फार मोठे सामर्थ्य आहे. संत साहित्यामध्ये हरिपाठाचा महिमा अगाध असल्याचे सांगितले जाते.

हरिपाठ कीर्ति मुखें जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥२॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें ।
निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥

या अभंगातून माऊली सांगतात जो कोणी साधक या हरिपाठाच्या महिमेची कीर्ती गाइल तसेच नाम साधना करेल त्याचा देह पवित्र होईल. तसेच त्याला वैकुंठा मध्ये स्थान प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे अशा भक्ताचे आई-वडील आणि सारे कुळ यांना चतुर्रर्भुज रूप प्राप्त होऊन वैकुंठाची प्राप्ती होते. त्यांच्या पितरांचा उद्धार होतो. हे अतिशय गुढ असणारे ज्ञान माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जगाची माऊली महा वैष्णव ज्ञानोबा माऊली यांनी हरिपाठ रचला.

या कलियुगातील युग धर्म हरिनामाचे महत्त्व जनसामान्यांना समजावे म्हणून 28 अभंगाची रचना संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज यांनी केली. आजही महाराष्ट्रात घरोघरी नित्य नियमाने हरीपाठाचे वाचन आणि पठण होते. काही काही घरांमध्ये तर हरिपाठ झाल्या शिवाय जेवणही करत नाहीत. हरिपाठ गायल्याने किंवा हरिपाठ म्हटल्याने काय लाभ होतो ते संत महात्म्यांनी खालील प्रमाणे सांगितले आहे.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी या अभंगापासून ते विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या नऊ अभंगापर्यंत 14 वेळा हरी या शब्दाचा उल्लेख होतो. तर पुढे “त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मणी” या अभंगापासून ते “हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन” या अभंगापर्यंत पंचवीस वेळा हरी या शब्दाचा उल्लेख होतो. आणि “वेदशास्त्र प्रमाण” या अभंगापासून ते “ज्ञानदेवी प्रमाण” या अभंगा पर्यंत सोळा वेळा हरी नामाचा उच्चार होतो. म्हणजे एकूण 54 वेळा हरी नामाचा उच्चार होतो. तसेच प्रत्येक अभंगानंतर “हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी”याप्रमाणे 27 अभंगांना पुन्हा 54 वेळा हरी नामाचा उल्लेख होतो.

या प्रकारे माऊली आपणाकडून न कळता हरिपाठातून 108 वेळा हरी नामाचा उच्चार करून घेतात. म्हणजेच एक तुळशी माळ हरी नामाचा जप हरिपाठ वाचनातून आपोआप होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतावरील दृढ विश्वासाने हरिपाठाचे 28 अभंग रचले आहेत. तसेच 28 वा अभंग फलश्रुती मिळवून देणारा असल्यामुळे वारकरी सांप्रदायांमध्ये हरिपाठ चे अभंग 27 म्हणण्याचा परिपाठ आहे. 27व्या अभंगानंतर “नाम संकीर्तन साधन पै सोपे l जळतील पापे जन्मांतरीची ll” हा संत तुकाराम महाराजांचा हरिनामाचा महत्त्व सांगणारा 28 वा अभंग म्हटला जातो.

परंतु माऊलींनी जो 28 वा अभंग रचला आहे त्यामध्ये माऊली सांगतात आळंदीला इंद्रायणी नदीच्या तीरावर राहून जो कोणी हरिपाठाचे पारायण करेल त्याच्यावर लवकरच सद्गुरूंची कृपा होईल. तसेच हे सद्गुरु त्या व्यक्तीला हरिनामाचा उपदेश करतात त्यामुळे त्या साधकाच्या मनामध्ये भगवंता विषयी प्रेम निर्माण होईल. तसेच त्या प्रेमामुळे त्याची अखंड नामसाधना चालू राहील. तो नियमित हरिनामाचा जप करत राहील आणि भगवंत प्रेमाचा अधिकारी होईल. असे माऊली सांगतात. म्हणजेच श्रद्धापूर्वक हरिनामाचा पाठ करणाऱ्या साधकाला गुरूंकडून हरिनामाची प्राप्ती होते आणि हरिनामा मध्ये आनंद प्राप्त होतो.

तिसरा लाभ माऊली सांगतात “असावे स्वस्थ चित्त एकाग्रे मन, उल्हाशी करून स्मरण जीवी ll अंतकाळी तैसे संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य ll “ यामध्ये माऊली नाम साधना कशी करावी आणि त्याचे फळ काय हे सांगतात. सामान्यपणे मनुष्याचे चित्त हे विषयांमध्ये गुंतलेले असते ते नेहमी शांत असावे म्हणून व्यक्तीने जप करताना भगवंताच्या नामात मन रमून शांत चित्ताने जप करावा. त्यामुळे अंतकाळी आणि संकटाच्या वेळी प्रत्येक ठिकाणी हरी तुम्हाला वाचवेल. अगदी अंतकाळी हरी मोक्ष देऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्हाला वाचवतात.

चौथा लाभ माऊली सांगतात की,” संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवितरे l श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोपला तात्काळ ज्ञानदेव ll या ज्ञान महिमेची प्रचिती आजवर अनेक साधुसंतांनी घेतलेली आहे. ती आपल्याला सुद्धा होऊ शकते. यासाठी मनापासून आळस न करता हरिनामाचा जप केला पाहिजे. हरिपाठ मध्ये मुख्यता माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, तसेच संत निवृत्तीनाथ महाराज यांनी अभंग रचले आहेत.

विशेष करून हरिपाठ मध्ये माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गायले जातात. गावोगावी आणि शहरांमध्ये अनेक ग्रामदैवत मंदिरामध्ये आणि इतरही सर्व मंदिरांमध्ये पहाटेच्या वेळी हरिभक्त परायण आणि वारकरी संप्रदायातील सर्व भक्त हरिपाठाचे संकीर्तन करतात. त्यामुळे पहाटेच्या वेळी आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन मनामध्ये एक प्रकारची चांगली ऊर्जा तयार होते. हरिपाठाचे डॉ. लता पाडेकर यांचे हरिपाठ एक आनंद वाट नावाचे पुस्तक आहे.

त्याचप्रमाणे लेखक कौशल्या गोरे यांचे हरी मुखे म्हणा, श्री अण्णा घाणेकर यांचे श्री ज्ञानेश्वरकृत, लेखक विठ्ठल नाडकर्णी यांचे सार्थ श्री पंचरत्न हरिपाठ, आणि न्यायाचार्य श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी हरिपाठ एक आव्हानात्मक सूत्र ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरी विशेष चिंतन असे पुस्तक लिहिले आहे. अशा अनेक हरिपाठ पुस्तकांचा वापर करून महाराष्ट्रासह अनेक राज्यात घरोघरी, मंदिरामध्ये आणि सामूहिक हरिपाठ परायण केले जाते. भक्तांना याचा विशेष अनुभव येतो.

Leave a Comment