श्रीक्षेत्र माहूरगड | Shrikshetra Mahurgad

आदिमाया शक्ती रेणुका माता महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुलमाता आहे. नांदेड पासून 130 किलोमीटर अंतरावर मातापुर म्हणजेच माहूरगड ( Shrikshetra Mahurgad ) हे आदिमायाशक्ती रेणुका मातेचे स्थान आहे. देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही आदिमाया शक्ती रेणुका माता या गडावर आली कशी ते पाहताना असे सांगितले जाते की, कान्यकुंप्ज नगरीचा राजा रेणू होता. त्याने कन्याप्राप्तीसाठी भागीरथी तीरावरती फार मोठा यज्ञ केला होता. आणि या यज्ञातून म्हणजेच या यज्ञ अग्नीतून रेणुका मातेचा जन्म झाला , निर्मिती झाली. भगवान शिव शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या जमदग्नी ऋषीशी रेणुका मातेचा विवाह झाला होता.

जमदग्नी ऋषी शिवशंकरांचा अवतार असल्यामुळे  विवाहाच्या वेळी सगळे देव विवाहसाठी उपस्थित होते आणि रेणुका मातेच्या लग्नामध्ये कामधेनु,कल्पतरू,दिव्य चिंतामणी,परीस, आणि सिद्ध पादुका हे सगळे इंद्रदेवाने रेणुका मातेच्या लग्नामध्ये दिले होते. रेणुका मातेचा विवाह झाल्यानंतर माता देवी जमदग्नी ऋषीं बरोबर त्यांच्या घरी गेली. पुढे रेणुका मातेला पाच मुले झाली. पहिला वसु, दुसरा विश्व वसू, तिसरा भवतवाहन,चौथा भवत्वसू आणि पाचवा परशुराम. पुढे एक दिवस रेणुका माता नदीवर अंघोळ करण्यासाठी गेल्या असता तेथील गंधर्व तेथील स्रियांबरोबर काम क्रीडा करत होते. ते क्षणभर मातेच्या नजरेस आले आणि माता परत आपल्या आश्रमाकडे  निघाली.

जगदग्नी ऋषी फार अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना ते समजले आणि रेणुका मातेला आश्रमाकडे येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांना खूप राग आला होता. आणि रागाच्या भरात त्यांनी आपल्या चारही मुलांना जवळ बोलावून घेतले आणि सांगितले की आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या मातेचा शिरच्छेद करून टाका. परंतु चारही मुलांनी माताप्रेमापोटी असे करण्यास  नकार दिला. मग तर जमदग्नी ऋषींना फारच राग चढला. की माझी मुले माझे ऐकत नाहीत. मग त्यांनी आपल्या शापाने चारही मुलांना भस्मसात केले.त्यानंतर त्यांचा पाचवा मुलगा परशुराम त्यांच्याजवळ आला. ऋषींनी त्यालाही त्याच्या आईचा शिरच्छेद करण्यास सांगितले. परशुरामाला हे ऐकून फार वाईट वाटले परंतु आपल्या पित्याने केलेली आज्ञा मानणारा पुत्र परशुराम होता. त्याने लगेच आपल्या आईचा शिरच्छेद करून टाकला.

त्यावेळी जमदग्नी ऋषी खुश होऊन त्यांनी परशुरामाला सांगितले की हे परशुरामा तू माझे ऐकले म्हणून तुला जो मागायचा तो वर माघ. परशुराम फार बुद्धिवंत होता. म्हणून परशुरामाने आपल्या पित्याकडे माझ्या चारही भावांना जिवंत करून माझ्या आईलासुद्धा जिवंत करा असा वर मागितला. जमदग्नी ऋषी भगवान शिव शंकराचा अवतार असल्यामुळे त्यांना हे समजलं आणि त्यांनी तथास्तु म्हणून आपल्या चारही पुत्राला आणि रेणुका मातेला परत जीवदान दिले. आणि सगळीकडे आनंद झाला. आणि ते आपल्या आश्रमात निघून गेले.

जमदग्नी ऋषींचा आश्रम फार मोठा होता. अनेक शिष्य त्यांच्याकडे शिकण्यासाठी होते. त्यांच्या लग्नामध्ये इंद्रदेवाने दिलेली कामधेनु तेथे होती. मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, मागेल ते देणारी ही कामधेनु होती. पुढे महिमावती नगरीचा राजा सहस्रार्जुन शिकार करण्यासाठी जंगलामध्ये आला होता , त्याच्याबरोबर त्याचे सैन्यही होते. त्यांनी हा जमदग्नी ऋषींचा आश्रम बघितला. हा बलाढ्य आणि प्रसिद्ध आश्रम पाहून त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याच्या मनात वाईट विचार यायला लागले. सुरुवातीला त्याचे मन त्या कामधेनु गायीवर गेले. ही कामधेनु माझ्या राज्यात फार सुंदर दिसेल असे तो पुटपुटला आणि त्याने जमदग्नी ऋषींकडे विनंती केली की ऋषी महाराज ही तुमची कामधेनु गाय तुम्ही मला द्या. परंतु जमदग्नी ऋषींनी राजाला नकार दिला.

तुला ही गाय मिळणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.मग राजा सहस्रार्जनाने इकडे तिकडे पाहिले. त्यांना तिथे परशुरामही दिसला नाही. हे पाहून सहस्रार्जून राजाने आपल्या सैन्याबरोबर आश्रमावर हल्ला केला. आणि जगदग्नी ऋषींच्या शिष्यांना मारून जगदग्नी ऋषींचा वध या महापापी राजा सहस्रअर्जुनाने केला. त्यामध्ये माता रेणुकाही जखमी झाल्या आणि तो कामधेनु गाईला घेऊन निघून गेला.थोड्याच वेळात तेथे परशुराम आला आणि त्याने ही सर्व परिस्थिती पाहिली . परशुरामाचा क्रोध अनावर झाला त्याठिकाणी परशुरामाने शपथ घेतली की मी ह्या क्षत्रिय धर्माचा नाश करेल.

आपल्या पित्याचा अग्निसंस्कार हा कोऱ्या जागेवर करेल असे ठरवले. आपल्या आईल- वडिलांना कावडीमध्ये बसून तो तीर्थक्षेत्र करत कुरुक्षेत्र,द्वारका,समुद्र, काशी अशी अनेक तीर्थे करत करत तो मातापुर म्हणजे कृष्णा मलकी गाव येथे आला. या गावालाच पुढे मातापुर आणि पुढे माहूरगड असे नाव पडले. या माहूर गडावर परशुराम पोहोचला. तेथे अंतर ज्ञानी दत्तात्रय महाराज होते , त्यांना हे सगळं समजलं होतं. परशुराम दत्तात्रय महाराजांसमोर आला आणि म्हणाला माझ्या पित्याचे अग्निसंस्कार करण्यासाठी मला कोरी भूमी पाहिजे.

त्यावेळी दत्तात्रय महाराजांनी परशुरामाला तेथील कोरी भूमी दाखवली. परशुरामाने महाराजांनी दाखवलेल्या जागेवर आपला दिव्य बाण मारला. त्याने बाण मारलेल्या ठिकाणी सध्याचे मातृतीर्थ तयार झालेले आहे. तेथे सगळे तीर्थे तयार झाली आणि त्या पाण्याने आपल्या पित्याला परशुरामाने आंघोळ घातली. अग्निसंस्काराच्या अगोदर जे मंत्रोच्चार केले जातात ते दत्तात्रय महाराजांनी मंत्रोच्चार केले. ज्या वेळेस परशुराम आपल्या पित्याला अग्नी देण्यास पुढे निघाला त्यावेळी माता रेणुका म्हणते मीही या अग्नीमध्ये प्रवेश करणार. हे ऐकताच परशुराम फार दुःखी झाला आणि आई माता रेणुकाला म्हणाला “आई तुझ्या वाचून मी या सह्याद्रीवर एक क्षणही काढू शकणार नाही “ त्यावेळी आदिमाया शक्ती रेणुका मातेने सांगितले की हे परशुरामा मी जरी या अग्नीमध्ये गेले तरी मी या ठिकाणी सर्व देव,किन्नर, मुनी आणि सर्व तीर्थासकट या ठिकाणी राहील. असे सांगून शेवटी माता रेणुकाने अग्नीमध्ये आपले शरीर अर्पण केले.

त्यावेळी परशुरामाला फार दुःख झाले होते. तो डोळे मिटूनच बसला होता आणि अचानक वरून आकाशवाणी झाली. “हे परशुरामा तू फक्त मागे वळून बघू नकोस तुझ्या आईचे दर्शन तुला होणार आहे “ हे ऐकून परशुरामाला अत्यंत आनंद झाला. आणि त्याला मागे वळून बघण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी क्षणात मागे वळून बघितले. पाहतो तर जमिनीतून आदिमाया शक्ती वर येत होती. परंतु त्याने बघितले तेव्हा फक्त आदिमाया शक्तीचा फक्त चेहराच वर आलेला होता. त्याने मागे बघितले त्यामुळे त्याला फक्त तेवढे मुखदर्शन झाले. मुखदर्शन झाल्यामुळे त्या ठिकाणाला मातापुर म्हटले जाते. तेव्हापासून आदिमाया शक्ती रेणुका माता या माहूरगडावरती आहे असा भक्तांचा विश्वास आहे.

याच माहूरगडावरती  महाराष्ट्रातून तसेच देशभरातून माता रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. अतिशय मनमोहक असे माहूरगड परिसर आहे. माहूर मध्ये तीन पर्वत प्रसिद्ध आहेत. एका पर्वतावर माता रेणुका मंदिर दुसऱ्या पर्वतावर अत्री अनुसया शिखर मंदिरे आहेत.आणि तिसऱ्या पर्वतावर प्रसिद्ध दत्त शिखर मंदिर आहे. त्याचबरोबर येथील तीन तीर्थ मातृतीर्थ,सर्वतीर्थ.आणि भानूतीर्थ प्रसिद्ध आहेत.तसेच तेथे अजूनही काही मंदिरे आहेत ते म्हणजे जगदग्नी ऋषी मंदिर,भगवान परशुराम मंदिर, माहूरच्या किल्ल्यात कालिका माता मंदिर आणि देवेश्वर मंदिर तसेच या ठिकाणी पांडवलेणी नावाची लेणी सुद्धा आहे.

तसेच माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, वाझरा शेख फरीद वॉटर फॉल, राजे उदारामचा वाडा तसेच माहूरला भेट देणारे लोक पुसद पासून 90 किमी, माहूरपासून 50 किमी आणि  किनवटपासून 15 किमी अंतरावर असलेले उनकेश्वर हॉट स्प्रिंग येथे देखील भेट देतात, ज्यात गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या सल्फरयुक्त पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. उनकेश्वर हे नाव भगवान उनकेश्वर म्हणजेच महादेव, शिव मंदिर आणि आश्रम संकुलामुळे पडले आहे.

त्याचप्रमाणे माहूरचा इतिहासही फार उल्लेखनीय आहे.  माहूर मध्ये खंडक्या बल्लाळ शहा आणि गोंड राजा यांनी  बांधलेला एक फार मोठा किल्लाआहे. बाराव्या शतकामध्ये  गोंड राजाचे सरदार आप्पासाहेब देशमुख हे माहूरचे शासक होते. त्यांचे वंशज भारतरत्न नानाजी देशमुख यांनी त्यांचा पुढे कारभार सांभाळला. पुढे वाशिमचे ऋग्वेदी ब्राह्मण राजे माहूरचे जहागीरदार बनले. पुढे राजा उदाराम यांच्याकडे येथील सत्ता होती. 1632 मध्ये त्यांचा दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी पंडिता सावित्रीबाई म्हणजेच रायबागान या तेथील शासक होत्या. या सर्वांचा इतिहास फार पराक्रमी आणि रंजक आहे.

पूर्ण महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिमाया शक्ती रेणुका मातेच्या , माहूरगडाच्या दत्त शिखरा पासून प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात आणि निखळ चांदण्यात न्हाऊन निघणारी एक पवित्र परिक्रमा मानली जाणारी देवीची परिक्रमा निघते. दरवर्षी एकदा ही परिक्रमा राखी पौर्णिमेला श्रीदत्त शिखरावरून निघते. यात महाराष्ट्रातील अनेक भाविक मोठ्या संख्येने सामील  होतात. परिक्रमा यात्रा अनुसया माता, मातृतीर्थ, रेणुका देवी, देवदेवेश्वर मंदिर, कैलास टेकडी अशी ही परिक्रमा शेख फरीद धबधबा येथे पोहोचल्यानंतर भाविक सकाळी धबधब्यात स्नान करून अनुसया मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन इतर रम्य ठिकाणी आणि तेथील तीर्थ पाहून यात्रेची समाप्ती करतात.

विशेष म्हणजे घनदाट जंगलातील पाऊल वाटेने भक्तगण अनवाणी चालताना मातेच्या जयघोषाबरोबर श्री दत्तगुरू नामाचा जयघोष करतात. यात लहान मुलांपासून ते  वृद्धांपर्यंत श्रद्धेने लोक परिक्रमा करतात.तसेच अनेक भक्त आपल्या कुल मातेचे दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या दिवशी माहूरगडला जातात.

Leave a Comment