श्री क्षेत्र मढी | Shri Kshetra Madhi

अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात मढी ( Madhi ) हे एक गाव आहे. पाथर्डी या  शहरापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या मढी या छोट्याशा गावाचा इतिहास  फार पौराणिक आहे. येथील श्री चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधी मुळे हे गाव नावारूपास आले. एकदा इतिहासकाळात राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज पहिले मोगलांच्या वेढ्यामध्ये सापडले होते. तेव्हा राणी येसूबाईंनी श्री चैतन्य कानिफनाथांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका या वेढ्यातून पाच दिवसाच्या आत झाली तर मी संपूर्ण गडाचा विकास करून एक पितळी घोडा देवास अर्पण करीन.

आणि तसेच घडले पाच दिवसांच्या आत शाहू महाराजांची मुघलांच्या वेढ्यातून सुटका झाली. आणि राणी येसूबाईंनी त्यांचा नवस पूर्णही केला. आणि म्हणूनच येथील श्री चैतन्य कानिफनाथांच्या मंदिराचा आकार हा एखाद्या गडकिल्ल्यासारखा आहे.भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने नऊ नारायणांनी वेगवेगळ्या नऊ नाथांच्या रूपाने अवतार घेऊन योग मार्गाने सिद्धअवस्था प्राप्त करून  धर्माचे आणि संस्कृतीचे  रक्षण केले. नाथ सांप्रदाय म्हणजे भारतातील शैव सांप्रदाय. नाथ म्हणजे रक्षणकरता किंवा स्वामी. नऊ नाथ ब्रह्माच्या वीर्यापासून उत्पन्न झाले म्हणून समस्त नाथ सांप्रदाय हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये मोडत नाही.

ब्रह्माद्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरूंनी नवनाथांना नाथ संप्रदायामध्ये महत्त्वाचे स्थान दिल्याचे मानले जाते. श्री शिवशक्ती महादेव,आदिशक्ती श्री हरी विष्णु नारायण, श्री दत्तगुरु आणि वैष्णवी देवी धाम मधील भैरवनाथ हे नवनाथांचे आग्रज मानले जातात. नवनाथांपैकी आदिनाथ म्हणजे शिव किंवा महादेव यांच्यापासून सुमारे आठव्या ते बाराव्या शतकात नाथ सांप्रदाय सुरू झाला आणि मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी तो पुढे चालवला.

याच नवनाथांपैकी कानिफनाथ म्हणजे प्रबौद्ध  नारायणाचा अवतार. ते हिमालयात एका हत्तीच्या कानात प्रकट झाल्याचे मानले जाते म्हणून त्यांना कानिफनाथ असे नाव पडले. कानिफनाथांना कनिषा, कानपा,कान पाद, कान्हपा,करणीपा किंवा कानेरी पाद तसेच कृष्णपाद नावाने सुद्धा संबोधतात. मढी म्हणजे भटक्यांची पंढरी समजली जाते. या ठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही अठरा पगड जाती धर्माचे लोक कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. श्री चैतन्य कानिफनाथ हे हिमालयातून दक्षिणेकडे आले.

नंतर ते बिरी,तांबडा देव येथून मढीत आले. सुरुवातीला  ते पवनानगर या नदीच्या काठी असलेल्या आपेश्वर  या महादेवाच्या मंदिरात समाधी लावून बसायचे. त्या काळात गुरु मच्छिंद्रनाथही मढीतच होते. त्यांच्यासोबतच कानिफनाथ समाधी लावून बसायचे मोठा शिष्य परिवार होता. तेथे उत्सवाला ते ढोल ताशा आणि डफ वाजवत असत. त्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यान साधनेत व्यत्यय यायचा. म्हणून ते कानिफनाथांना सांगून जवळच्याच डोंगरावर मायंबा या ठिकाणी जाऊन ध्यानसाधनेस बसले.नंतरच्या काळात कानिफनाथ महाराज हे गडावर असलेल्या एका गुफेत ध्यान साधना करू लागले आणि त्यानंतर कानिफनाथांनी फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली.

मढीच्या यात्रेच्या अगोदर येथील महाराजांच्या संजीवन समाधीला तेल लावण्याचा पारंपारिक विधी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगोदर महाराजांच्या पादुकांचा जलाभिषेक केला जातो व नंतर शंख व नगारा वाद्याच्या गजरात नाथांच्या नावाचा  जयघोष करत पारंपारिक पद्धतीने नाथांना तेल लावले जाते. तेल लावल्यानंतर मढी आणि निवडुंगे गावात विविध व्रतबंधने पाळली जातात. जसे की काही शेतीची कामे, मंगल कार्य,गादी व पलंगावर शयन करणे दाढी हजामत करणे इत्यादी कामे वर्ज केली जातात. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यात्रेची तयारी करणे ही त्यामागील भावना आहे.

त्यानंतर  मढी या गावात होळी ते गुढीपाडवा अशी पंधरा दिवस मोठी यात्रा भरते. त्यावेळी येथे महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. या दिवशी भाविकांना मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन घेता येते. इतर वेळेस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.पाडव्याला दक्षिण गंगा गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणून पहाटे देवाला त्या पाण्याने स्नान घातले जाते. व महापूजा अभिषेक केला जातो. यावेळी चंदनाचा लेप समाधीला लावून त्यासोबत सुगंधी द्रव्य,फुले व वस्त्रे देवाला अर्पण करून देवाची महाआरती केली जाते.रंगपंचमीपासून पाडव्यापर्यंत अनेक भक्तगण झेंड्याच्या काठ्या घेऊन दिंडीत मढी या तीर्थक्षेत्री येतात व झेंड्याची काठी मंदिराच्या कळसाला टेकून मंदिराला प्रदक्षिणा घालतात.

ढोल ताशांच्या गजरात या प्रदक्षिणा केल्या जातात. काही भाविकांच्या यावेळी अंगातही येते. तसेच मंदिराच्या कळसावर रेवड्या उधळल्या जातात. या ठिकाणी भगवंताच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर मंदिराच्या बाहेर निघाल्यावर भगवान श्री विष्णूची तेजोमय मूर्ती आहे. इतकी तेजोमय मूर्ती आपणास कुठेही पहावयास मिळत नाही. तेथून पुढे गेल्यावर मारुतीरायाची एक मूर्ती आहे. तेथून दर्शन घेऊन निघाल्यानंतर मंदिराच्या दक्षिणेला गुरु मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. तेथून गर्भगिरीच्या डोंगराकडे बघितल्यास मच्छिंद्रनाथांचे संजीवन समाधी मंदिर दिसते. ते येथून फक्त पाच किलोमीटर अंतरावरच आहे.

समाधी मंदिराच्या वरच्या बाजूला व दक्षिण दरवाज्याच्या वरच्या बाजूला पारशी भाषेतील लेख लिहिलेले आहेत. असाच लेख उत्तर बाजूच्या भिंतीवर देखील पहावयास मिळतो. तसेच मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचीही मूर्ती आहे. या मंदिरातूनच गुफेत जाण्यासाठी एक रस्ता आहे गुफेत जाण्यासाठी दरवाजा फार छोटा आहे. गुफेतून मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराकडे जाण्यासाठी एक मार्ग होता असे सांगितले जायचे परंतु तो पुढे  न सापडल्यामुळे तो सध्या बंद केलेला आहे.

गुफेत उतरल्यावर डाव्या बाजूला एक खिडकी दिसते त्या खिडकीतून सूर्य मावळतीला सूर्यप्रकाश थेट गुफेतील नंदी आणि पिंडीवर पडतो.समाधी मंदिराच्या उत्तर बाजूस मागच्या बाजूला नवनाथ पारायण मंदिर आहे. या ठिकाणी नवनाथांच्या मूर्ती आहेत तसेच एक श्री गुरुदत्तात्रेयांची मूर्ती आहे.या ठिकाणी भक्तगण नवनाथ ग्रंथाचे पारायण करतात.या पारायण मंदिराच्या मागे कानिफनाथांचा एक सुंदर जन्म देखावा आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला एक डाळिंबाचे झाड असून त्याखाली एका देवीची मूर्ती आहे. त्याचीही एक कथा आहे. डाळिंबाई नावाची एक महिला नाथ सांप्रदायाची कट्टर तपचर्या करत होती.

शेवटी कानिफनाथांनी प्रगट होऊन रंगपंचमीला तिला दर्शन दिले. व सांगितले की तुझ्याकडे जो फक्त मनोभावे इच्छा बाळगून रंगीत धागा बांधेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कालांतराने डाळिंबाईच्या समाधीच्या जागेवर डाळिंबाचे झाड उगवले. त्या डाळिंबाच्या झाडाला रंगीत धागा बांधला की आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची धारणा आहे. म्हणून अनेक भक्त मढीला गेल्यावर तेथील  डाळिंबाच्या झाडाला  रंगीत धागा बांधतात. तर काही भक्त आपल्या हातातही रंगीत धागा बांधून येत.

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा गाढवांचा बाजार मढी या गावात भरतो. कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनही व्यापारी आपली गाढवं विकण्यासाठी या ठिकाणी येतात. अहमदनगर पासून 42 किलोमीटर अंतरावर निवडुंगे हे गाव आहे. तेथून तीन किलोमीटर अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डी वरून मढी 12 किलोमीटर आणि मढी पासून पाच किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे.तसेच मढी पासून 20 किलोमीटर अंतरावर मोहटादेवी मंदिर आहे.

तसेच येथे जाण्यासाठी दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकांमधून एसटी बसेस आहेत. अमावस्या व पौर्णिमेला अहमदनगर येथून ज्यादा बसेस सोडल्या जातात. तसेच यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकामधून मढी येथे जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध केल्या जातात. त्याचप्रमाणे भक्तांना राहण्याची व्यवस्था करण्याकरता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी मंदिराच्या ट्रस्ट ने रूमची ही व्यवस्था केलेली आहे.

1 thought on “श्री क्षेत्र मढी | Shri Kshetra Madhi”

Leave a Comment