श्री गजानन महाराज | Shri Gajanan Maharaj

आधुनिक काळातील एकोणवीसाव्या शतकात समाजाला भक्तीचा मार्ग दाखवणारे वऱ्हाडातील शेगावचे योगीराणा,थोर संत, सिद्धयोगी, परमहंस संन्याशी,महान आणि असमान्य व्यक्तिमत्व असलेल्या श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले गाव शेगाव हे पूर्वी खामगाव तालुक्यामधील मुख्य शहर होते. तसेच फार वर्षापूर्वी या गावाचे नाव शिवगाव होते. पुढे याचाच अपभ्रंश होऊन ते शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले.गजानन महाराज (Shri Gajanan Maharaj ) हे दत्तात्रेय परंपरेचे भारतीय अध्यात्मिक गुरु मानले जातात. त्यांचा जन्म निश्चित असा कोणालाही माहिती नाही .

त्यांना पहिल्यांदा साधारणता त्यांच्या वयाच्या 30 व्या वर्षी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 ला प्रथम पाहिले. म्हणून त्यांचा प्रकट दिन त्यांचे भक्त 23 फेब्रुवारीला साजरा करतात. परंतु त्यांची पुण्यतिथी ही ऋषिपंचमीला मानली जाते. सहा साडेसहा फूट उंच, तांबट वर्ण, पातळ दाढी आणि केस, लांब हात आणि वस्त्रहीण शरीर, अशी श्री गजानन महाराजांची देहचर्या होती. घाई घाई चालल्याप्रमाणे भासणारी चाल, अनवाणी चालत हातात त्यांच्या कधीतरी चिलीम दिसत असे. तसेच खाण्याची आवड त्यांना होती.मिरचीचा ठेचा असो किंवा पक्वान्न मिळालेला आहार ते नेहमी आवडीने खात असत.

त्यांचे राहणीमान वऱ्हाडी थाटात होते व स्पष्ट आणि शास्त्रोक्त भाषेत ते बोलत असायचे. त्यांना चारही वेदांचे सखोल ज्ञान होते व हिंदी आणि इंग्रजी मधून सुद्धा ते संभाषण करत होते असे काही भक्तांच्या आठवणीतून स्पष्ट झाले आहे. त्यांना सर्व धर्मांचे आकलन होते तसेच त्यांच्याकडे गायन कला अवगत होती. गजानन महाराजांचे चरित्र हे दास गणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ यामध्ये सांगितलेले आहे. 23 फेब्रुवारी 1878 मध्ये शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेमध्ये देविदास पातुरकरांच्या कार्यक्रमाच्या दिवशी मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते खाताना त्यांना प्रथम पाहिले गेले.

त्यावेळी दिगंबर पंत यांनी त्यांना मठातून जेवनाचे ताट करून आणले. त्यावेळी हे महात्मा भोजनामध्ये दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून खाऊ लागले. त्यांच्यासाठी उष्टे खाणे आणि स्वादिष्ट जेवण एकसमान होते. हे पाहून सर्वांना आश्चर्य झाले. त्यांचे जेवण झाल्यानंतर बंकटलाल त्यांना एक पाण्याचा लोटा घेऊन येताना त्यांनी पाहिले की हे महात्मा जनावरांच्या कुंडामध्ये पाणी पीत होते. बंकटलाल त्यांना म्हणाले की मी आपल्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी घेऊन आलो आहे. आपण हे घाण पाणी का पीत आहात.

तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जोपर्यंत या पृथ्वीवर ब्रह्माचा वास आहे तोपर्यंत शुद्ध – अशुद्ध, सुगंध – दुर्गंध कशामध्ये भेद नसेल. त्यांचे हे अमृत वचन ऐकून बंकटलाल आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर सर्वांना हे समजले की हे कोणी साधारण व्यक्ती नसून कोणीतरी तेजस्वी संत महात्मा आहेत. माघ महिन्याच्या कृष्ण सप्तमीला ते शेगाव मध्ये प्रगट झाले होते. त्या दिवशी बंकटलाल गजानन महाराजांना आपल्या घरी घेऊन गेले. तसेच त्यांना स्नान घालून त्यांची पूजा केली गेली. तेव्हापासून बंकट लाल त्यांचे कायमचे भक्त झाले. काही काळ तेथे राहिल्यानंतर श्री गजानन महाराज पुढे मारुतीच्या मंदिरामध्ये राहू लागले. हळूहळू शेगाव मधील अनेक जण त्यांचे भक्त झाले. दासगणू गजानन महाराजांच्या चरित्रात असे म्हणतात.

कोण हा कोठीचा काहीच कळेना l
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगेll
साक्षात आहे ही परब्रम्ह मूर्ती l
आलेशी प्रचिती बहुतांना ll

याचाच अर्थ हा ब्रह्म अवतारी कोणीतरी असून ब्रह्माचे ठिकाण कोण काही सांगू शकत नाही. साक्षात ही परब्रम्ह मूर्ती असून याची प्रचिती खूप लोकांना आलेली आहे. असे दासगणू महाराज सांगतात. गजानन महाराजांना नेहमी झुणका भाकरी, मुळ्याच्या शेंगा, पिठी साखर तसेच हिरव्या मिरच्या खूप आवडत असायचे. गजानन महाराजांना सर्वात प्रथम बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी यांनी पाहिले होते. महाराजांनी कर्ममार्ग, भक्ती मार्ग व योग मार्ग असे तीन मार्ग सांगितलेले आहेत.

हे तीन मार्ग जीवात्म्याला, सर्वसामान्य माणसाला आत्मज्ञान प्राप्त करू शकतात असे महाराज सांगायचे. कर्म मार्ग करत असताना भक्तिमार्गाची वाट चाखावी लागते असे महाराज म्हणायचे. या अद्वैत ब्रह्म अवतारी महापुरुषाच्या “गण गण गणात बोते” या सिद्ध मंत्रातून त्यांचा ब्रह्मावतार सिद्ध होत होता. गजानन महाराज नेहमी “गण गण गणात बोते “असा मंत्र म्हणायचे. एकदा लोकांनी त्यांना या मंत्राचा अर्थ विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की गन म्हणजे विचार करणे. गण म्हणजे जीवात्मा, गणात म्हणजे जीव ही परमात्मा आहे, आणि बोते म्हणजे याचाच जय जयकार करा. अर्थात शरीरात वास करणारा जीवात्मा परब्रम्हा पासून वेगळा नाही.

त्यामुळे त्याचे चिंतन करा. त्यांच्या अशा अनेक प्रबोधन शिवाय त्यांचे अनेक चमत्कार शेगावकर यांनी पाहिलेले आहेत.
एक दिवस बंकटलाल आणि गजानन महाराज गावातील काही लोकांसोबत मकाची कणसे खाण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा मकाची कणसे भाजण्यासाठी त्यांनी शेकोटी केली होती. आगीच्या धुरामुळे झाडावरील असलेल्या मोहोळाच्या माशा बाहेर पडल्या. माशांना पाहून सगळे लोक इकडे तिकडे पळू लागले. परंतु महाराज त्याच ठिकाणी चुपचाप बसून राहिले. तरी एकही मधमाशी त्यांना चावली नाही. हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले.

शेगाव मध्ये त्यांनी एकूण 32 वर्ष त्यांच्या लीलांनी समाजाच्या दुःखांवर पांघरून घालून समाज प्रबोधनाचे कार्य केले. मिळेल ते खायचे,कुठेही पडून राहायचे, सर्वत्र मुक्त संचार करायचा अशा त्यांच्या अवलिया स्वभावामुळे सर्वांना त्यांचे विशेष वाटायचे.असेच एक दिवस अकोले जिल्ह्यातील आडगाव मध्ये त्यांनी एक पूर्ण कोरडी विहीर पाण्याने भरवली होती. तसेच एकदा आजारी गायीला आपल्या तीर्थाने बरे केले होते. सर्व प्राणीमात्रांमध्ये सुद्धा भगवंत आहे हे त्यांनी उदाहरणासहित कित्येक वेळा दाखवले.तसेच गावातील एक आजारी व्यक्ती महाराजांनी दिलेला आंबा खाऊन लगेच बरी झाली होती. त्या काळात जेव्हा प्लेग आजार पसरला होता तेव्हा त्यांनी प्लेग रोग झालेल्या पुंडलिक भोकरकर यांना अंगठ्याचा स्पर्श करून बरे केले होते.अकोला येथे 1908 मध्ये एका सभेला लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज याची भेट झाली होती.

अशा प्रकारे लोकांनी गजानन महाराजांच्या अनेक लीलांचा अनुभव घेतला. गजानन महाराजांनी शेगाव मध्ये राहून आपल्या भक्तांच्या अनेक समस्यांचे निवारण केले. त्यांच्या भक्तांनी त्यांना कित्येक वेळा पैसे, कपडे देण्याचा प्रयत्न केला. परंतु गजानन महाराजांनी कधीच अशा वस्तूंचा स्वीकार केला नाही. ते नेहमी दिगंबर अवस्थेमध्ये राहायचे. जेव्हा त्यांना समजले की आपले अवतार कार्य समाप्त होत आलेले आहे त्यावेळी त्यांनी आपल्या सर्व भक्तांना सुचित केले. शेवटी स्वयंभू मानल्या जाणाऱ्या या दिगंबर वृत्तीच्या,सिद्धकोटीला पोहोचलेल्या महान संताचे निर्वाण 8 सप्टेंबर 1920 भाद्रपद शुक्लपंचमीला शेगाव मध्ये समाधीस्थ होऊन झाले. आजही अनेक भक्त शेगाव मधील त्यांच्या समाधी स्थळाला दर्शन घेण्यासाठी जातात. आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.

Leave a Comment