कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ भक्त बाळप्पा महाराज ( Shri Balappa Maharaj ) एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांच्या घरात सावकारी व्यवसाय होता. तसेच सोन्याचा व्यापारही ते करत होते. घरातूनच अध्यात्मिक वातावरणामुळे वयाच्या 30 व्या वर्षी संसारातून सुटका करून अध्यात्मिक गुरुच्या शोधात ते गाणगापूरला आले होते. त्यांच्या मोठ्या मुलीचा त्यांनी विवाह केला आणि मुलाची मुंज करून संसार विरक्ती झाल्यामुळे गुरूंच्या शोधात ते फिरत होते.
त्यांच्या मुरगूड गावावरून ते गाणगापूरला गेले आणि तेथेच त्यांनी अनुष्ठान मांडले. तेथे त्यांना एका ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी सेवेत वाहून घ्यावे. तसेच त्यांना तसे स्वप्न पडले होते. ते अक्कलकोटला आल्यानंतर स्वप्नात पाहिलेल्या मूर्ती प्रमाणे स्वामींची मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. तेथील औदुंबराला मिठी मारून त्यांनी आनंदाश्रू गाळले. तेथेच त्यांना खात्री पटली होती की, स्वप्नदृष्टांत देणारे दिगंबर रूप सतपुरुष श्री स्वामी समर्थ महाराज हेच होते. म्हणून लगेचच त्यांनी स्वामींकडे धाव घेऊन त्यांचे चरण पकडले.हा क्षण म्हणजे गुरु शिष्याची अद्भुत भेट असा होता.
मग बाळप्पा महाराज तेथेच अक्कलकोटला स्थिर झाले व तिथेच राहू लागले. मंदिरातच त्यांनी जप सेवा आणि तपचर्या सुरू केली. बाळप्पा हे श्रीमंत घराण्यातील असल्यामुळे सुरुवातीला त्यांना मठातील झाडणे,भांडी घासणे, पाणी भरणे अशा हलक्या कामांची लाज वाटत होती. परंतु स्वामी नेहमी म्हणायचे ”निर्लज्जो गुरुसान्निधो’ म्हणजे गुरुची सेवा करताना लाज बाळगू नका. नंतर बाळप्पाची स्वामी वरील निष्ठा वाढत जाऊन ते स्वामींचे परम भक्त झाले. नंतर त्यांच्यामध्ये कसलेही ममत्व राहिले नाही व त्यांनी सर्वसंग परित्याग करून श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतले. समर्थांच्या सेवेमध्ये अनेक सेवेकरी होते.
सगळे आपापल्या परीने स्वामी महाराजांची सेवा करीत होते. परंतु या सर्वांमध्ये फार थोर असलेले श्रीमंत सद्गुरू बाळप्पा महाराज यांनी स्वामींची अपार भक्ती आणि सेवा केली होती. किंबहुना स्वामींची सेवा कशी करावी याचा परिपाठ बाळप्पा महाराजांनीच घालून दिला होता. जो आजही कार्यरत आहे.रोज सकाळी भूपाळीने सुरुवात करून, स्नान घालून स्वामींची सेवा केली जायची. यामध्ये बाळप्पा, चोळप्पा, ( Cholappa ) भुजंग आप्पा, चोळप्पाचे जावई श्रीपाद स्वामी व सुंदराबाई असे अनेक सेवेकरी होते. प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची. यामध्ये ढवळाढवळ चालत नसे. रोज आरती व्हायची. मग स्वामी कोठेही असो यामध्ये खंड पडत नसे.
आरती झाल्यानंतर मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी सहस्ते इतरांना वाटत करत होते. असे करण्यामागचा स्वामींचा हेतू हाच होता की सर्वाना स्वामींचे दर्शन मिळावे. हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा प्रसादासाठी नेहमी प्रथम हात पुढे करायचे. परंतु स्वामींनी बाळप्पाला कधीही प्रसाद दिला नाही.त्यामुळे बाळप्पा मनाने रोज खिन्न व्हायचे आणि आजही आपल्याला प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसायचे. अशी बरीच वर्षे गेली. रोज बाळप्पा हात पुढे करायचे आणि स्वामी काहीही देत नसायचे.पण एक दिवस मात्र बाळप्पाने ठरवले की, आज काहीही होवो आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचेच नाही.
आरती झाल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी गोलाकार उभे राहिले. मग स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले. तेव्हा बाळप्पाने एका भक्ताच्या पायांमधून हात पुढे घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागले. स्वामींना दिसू नये म्हणून त्यांनी एका भक्ताच्या अडून हात पुढे केला होता परंतु स्वामीं सृष्टीचे चालक-मालक आहेत. कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपणे शक्य नाही. तरीही बाळप्पाने ही चालाकी केली होती.
स्वामी प्रसाद वाटत बाळाप्पा च्या हातापर्यंत आले आणि एक क्षणभर तेथे थांबले. आणि दुसऱ्या क्षणी बाळप्पाच्या हातात भली मोठी प्रसादाची थाळी पडली. मग बाळप्पाने ती थाळी घट्ट पकडून तेथून निघून गेले. न जाने स्वामी पाहतील आणि मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद काढून घेतील. या भीतीने बाळाप्पा ने तेथून धूम ठोकली होती. असा विचार करून बाळाप्पा घरी आले. दरवाजा आतून बंद केला. हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली थाळी घट्ट धरली आणि हमसून हमसून रडू लागले. आणि मनातच म्हटले स्वामी का बरे इतका वेळ लावला या गरिबाला प्रसाद देण्यासाठी. माझ्याकडून असा काय अपराध घडला की मला प्रसादासाठी एवढी वाट पाहू पाहायला लागली. आज मज पामराचे काय भाग्य उजळले की मला स्वामींचा प्रसाद मिळाला. असे म्हणत म्हणत ते प्रसाद न खाता रडत राहिले. त्यांची भाव समाधी लागली होती आणि इतक्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला.
बाळप्पा दार उघडा, बाळप्पा दार उघडा असा आवाज येऊ लागला. कसल्याही परिस्थितीत तुम्हाला लगेच बोलवले आहे. झाले बाळप्पाने ओळखले की स्वामींनी का बोलावले आहे. आता स्वामीपुढे जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मग बाळप्पा लगेच स्वामींकडे गेले. स्वामींच्या पुढे हाताची मूठ पुढे करून मान खाली घालून ते उभे राहिले. तोवर स्वामी म्हणाले हरामखोर हमसे नजर चुराके प्रसाद लेके जाता हैl तू बडा जिन है, ना तुम मुझे छोडेगा, ना मै तुझे l ला वो प्रसाद ला l तशी बाळप्पा ने ही थाळी स्वामींच्या हातात देऊन टाकली. मग स्वामींनी ती थाळी घेतली व बाळप्पालाही अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. आणि म्हणाले अरे तू या प्रसादाच्या मागे का लागला आहेस. जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी तुला कधीच दिला आहे. माझ्या मांडीवर मी तुला घेतले आहे.
माझ्या शेजारीच मांडी घालून तू बस. हाच तुला प्रसाद. तसेच स्वामींनी त्यांच्या बोटातील श्री स्वामी समर्थ अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाच्या बोटात स्वतःच्या हाताने घातली आणि माझे कार्य तू पुढे चालव असा जणू साक्षात्कार केला. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष, छाटा आणि पादुका बाळप्पाला प्रसाद म्हणून दिल्या. आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला व औदुंबर छायेत बसण्याची आज्ञा केली.त्यानंतर बाळप्पांनी कधी प्रसादाचा हट्ट केलाच नाही. तो प्रसाद म्हणजे स्वामींच्या शेजारीच समाधी घेण्याची परवानगी बाळप्पाला मिळाली होती. कि जी दुसऱ्या कोणालाही मिळाली नव्हती.
ती फक्त बाळाप्पाला मिळाली होती. “धन्य ते स्वामी गुरु आणि धन्य ते बाळप्पा महाराज “ त्यानंतरही श्री स्वामी समर्थ आणि बाळाप्पा महाराज यांच्यामध्ये अनेक अध्यात्मिक आणि प्रारब्ध विषयी संवाद झाले होते. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पाला तुम्ही जरी माझे भक्त असाल तरी स्वकर्माने मिळालेले प्रारब्ध भोगावेच लागते असे सांगितले होते. तसेच त्यावर नियमित भगवंताचे नामस्मरण हाच एकमेव उपाय हे महाराज सांगत होते.
पुढे स्वामींच्या निर्वाणानंतर मठाची संपूर्ण जबाबदारी बाळप्पा कडे आली होती. नंतर राजांनी मठ सांभाळण्यासाठी मानधन किती घेणार हे विचारले होते. त्यावर बाळप्पा म्हणाले होते की, मी स्वामींची सेवा करतोय, मी हे मानधनासाठी करत नाही. स्वामी सेवेत बाळप्पा असे भक्त होते की, त्यांना पदाचा आणि पैशाचा कशाचाही गर्व नव्हता. तसेच स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ असे नाव देणारे बाळप्पा हेच भक्त होते. पुढे त्यांनी मठाचे बांधकाम केले. नंतर सण 1910 मध्ये बाळप्पा महाराजांनी समाधी घेतली. आजही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जाणारे सर्व भाविक बाळप्पा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात.
त्यांच्या मठात स्वामी समर्थ महाराजांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसतात. तसेच मठात स्वामी समर्थ महाराजांचा बाळप्पा आणि चोळप्पा महाराजांसोबत काढलेला ओरिजनल फोटो आहे. तसेच काशीचे शिवलिंग आणि त्यांच्या गुरुपरंपरेतील गजानन महाराज यांची मूर्ती तेथे बसवण्यात आलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांची ही विश्रांतीची जागा होती असे सांगण्यात येते.श्री स्वामी समर्थांच्या निर्वानानंतर जवळपास 32 वर्षे बाळाप्पा महाराज होते. नंतर गंगाधर स्वामी महाराज आणि त्यानंतर गजानन महाराज अशी त्यांची गुरुपपरंपरा सांगितले जाते.