नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ कधीही विचारू नये असे हिंदू धर्मामध्ये म्हणतात. असेच एक नाव,रूप, स्थान सांगणे कठीण होईल अशा एका वैराग्य संपन्न असलेल्या आणि गौरीशंकर, सुपड्या, लाहिरी बाबा ,कुवंरस्वामी अशा विविध भागात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या, जवळच्या काळातील सद्गुरू शंकर महाराजांचा ( Shankar Maharaj ) जन्म वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 सन 1800 मधील सांगितला जातो.
गुजरात भागात देवियाबाबा, इस्लाम भागात रहिमबाबा, आफ्रिकेमध्ये टोबो, तर अरबस्थानात नूर मध्ये महंमदखान, मध्य भारतामध्ये लहरीबाबा, दक्षिण भारतात गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानत असायचे. काही ठिकाणी “अष्टावक्र “असा उल्लेखही त्यांचा आढळतो. मोठे डोळे,अजानूबाहू, वाढलेली दाढी मिशी आणि डोक्यावरचे केस, पांढरे शर्ट आणि धोतर, लहान मुलांसारखे वागने व गुडघे वर करून बसण्याची पद्धत, असे बहुरूपी रूप दिसणारे सद्गुरु शंकर महाराज यांचे योगसामर्थ्य मात्र चेहऱ्यावर सुद्धा प्रगट दिसायचे. ते एक अलौकिक पुरुष होते. “प्रसिद्धीसाठी सिद्धी नको “ असे ते नेहमी सांगायचे. धर्म, जात, पंथ,गरीब,श्रीमंत, वर्णभेद असा कुठलाही भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.ते कुठे शिकले कोणास ठाऊक परंतु अनेक विद्वानांशी ते इंग्रजीतून बोलायचे.
स्वतःला अशिक्षित म्हणून घेणारे शंकर महाराज अनेक भाषांमध्ये बोलायचे. त्यांचा आवडता नंबर 13 होता. या नंबर वर विचारले असता “सब कुछ तेरा,कुछ नही मेरा “ असे ते सांगायचे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापुर गावामध्ये चिमणाजी आणि पार्वती बाई नावाचे उपासनी कुटुंब सुखात संसार करत होते. त्यांना लग्नानंतर बरेच वर्ष पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्यांचा संसार सुखी आहे असे ते मानत नव्हते. नेहमीच काहीसे मनात दुःखी असायचे. सुरुवातीपासूनच त्यांनी महादेवाची कठोर भक्ती केली होती.
एके दिवशी चिमणाजींना स्वप्नात दृष्टांत झाला. स्वप्नात एक साधू येऊन त्या साधूने चिमणाजींना सांगितले की, तू उद्या तुझ्या जवळच असलेल्या डोंगरावर जा, तिथे तुला एक वाघांचा कळप दिसेल आणि त्या वाघाच्या कळपामध्ये एक सुंदर बाळ तुला मिळेल. हे स्वप्न पाहिल्यानंतर चिमणाजी आणि पार्वती बाईला कधी सकाळ होते आणि कधी त्या डोंगरावर आपण जातो असे झाले होते. तांबडे फुटताच चिमणाजी आणि पार्वती बाई उठले.सकाळ होताच त्या डाहूल माले डोंगराकडे धावत गेले. पाहतात तर त्या ठिकाणी वाघांचा कळप होता व वाघांच्या डरकळ्यांचा आवाज येत होता. तसेच त्या कळपामध्ये सुंदर बालक रडत होते.
या बाळाच्या डोक्यावर नागराजांनी त्याला ऊन लागू नये म्हणून फणा काढून सावली धरली होती. ते बाळ म्हणजे साक्षात शिवशंभूंचा अवतार होते. तो दिवस होता सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमीचा. पार्वती बाई वाघांच्या कळपातून नागराजाच्या छायेखालील बाळाकडे गेल्या आणि त्यांनी बाळाला उचलून आपल्या कुशीत घेतले. अशातच असा चमत्कार झाला की बाळाचे हात पार्वती बाईंच्या स्तनाला लागले व पार्वती बाईला दूध फुटले. मूल नसलेल्या बाईला दुधाचा पान्हा फुटणे म्हणजे फार मोठा दैवी चमत्कार होता.
पुढे पार्वती बाईंनी त्यांचा आपल्या लेकरासारखा सांभाळ केला. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले होते. आई-वडिलांनी त्यांचे नाव शंकर ठेवले. शंकर महाराज दहा ते बारा वर्षाचे होईपर्यंत अंतापुर मध्येच होते. तेथून पुढे आई-वडिलांसहित ते नाशिकला गेले. लहानपणापासूनच महादेवाची कठोर भक्ती करणारे आई वडील आणि शंकर महाराज नाशिकला गेल्यानंतर त्रंबकेश्वर च्या मंदिरात त्यांची भेट एका साधू श्रीनाथ बाबा यांच्याशी झाली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर श्रीनाथ बाबा शंकर महाराजांना हिमालयामध्ये घेऊन गेले. श्रीनाथ बाबाच्या संगतीत शंकर महाराजांनी हिमालयात कठोर तपचर्या केली होती. नंतर त्यांना सद्गुरूंची ओढ लागली होती.
जसा मंदिराला कळस असेल तरच मंदिर शोभते तसेच माणसाला सद्गुरु असल्याशिवाय आध्यात्मिक पूर्ती होऊ शकत नाही असे शंकर महाराजांना वाटायचे. तेथून पुढे ते सद्गुरु शोधात भ्रमण करू लागले. तीर्थक्षेत्रे करत करत ते पंढरपूरच्या वाळवंटात गेले. तेथेच त्यांची श्री स्वामी समर्थ यांच्याशी भेट झाली. त्यांच्या त्या भेटीतच त्यांना स्पर्श दीक्षा झाली. श्री स्वामी समर्थांनी शंकर महाराजांना आपले शिष्य करून घेतले. तेथून पुढे स्वामींनी शंकर महाराजांना इतके चांगले घडवले की लोक शंकर महाराजांना स्वामी समर्थांचा अवतारच मानू लागले. तिथून शंकर महाराज सोलापूरच्या शुभ्राय महाराजांच्या मठाकडे गेले.
गेल्यानंतर मठाच्या बाहेरच उभे राहिले होते. तेथे शुभराय महाराजांचे शिष्य जनार्धन महाराज भजन करत होते. भजना मधून ते भगवान शंकरांचा राग गात होते. तेवढ्यात त्यांना शंकर महाराजांचा “अलख निरंजन”असा आवाज आला. असा आवाज आल्यानंतर शुभ्राय महाराज बाहेर आले. पाहतात तर काय तेथे शंकर महाराज उभे होते. शंकर महाराजांनी शुभ्राय महाराजांच्या डोक्यावर हात ठेवताच त्यांना समाधी लागली. आणि शुभ्राय महाराजांना शंकर महाराजांच्या रूपात दत्तात्रयांचा अवतार दिसला.
शंकर महाराज नेहमी साध्या पद्धतीने शिकवण देत असायचे. मोठी व्याख्याने कीर्तने प्रवचने त्यांनी कधीच केली नाही. त्यांच्याकडे आलेल्या लोकांना ते नेहमी साध्या पद्धतीने प्रबोधन करायचे. ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास आचरणात आल्याशिवाय उपयोग नाही, भावनेने शिजेल तेच भजन, आई-वडिलांची सेवा करा, कुलदैवत आणि कुलस्वामिनी ची सेवा करा असे त्यांच्या साध्या भाषेतील मार्मिक प्रबोधन असायचे. साध्या पद्धतीने बोलणारे शंकर महाराज अध्यात्मावर बोलताना मात्र भल्याभल्यांचा आवाज बंद करायचे.
भक्तांना ते त्यांच्या बोली भाषेत उत्तर द्यायचे. त्यांचे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नव्हे तर काही परदेशी भाषेवर सुद्धा होते. एका रशियन कुटुंबाशी त्यांनी रशियन भाषेत अध्यात्मावर चर्चा केली होती. परदेशात सुद्धा शंकर महाराज प्रसिद्ध होते. जपानमध्ये त्यांचे अनेक भक्त आहेत. आजही एका जपानी चित्रकाराने काढलेले त्यांचे छायाचित्र पुण्यातील संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परांजपे यांच्याकडे आहे. त्यांच्या वयाविषयी अनेक विद्वानांना प्रश्न पडायचा. ते कधी म्हातारे वाटत तर कधी तरुण.
एकदा असेच पुण्याचे प्रोफेसर भालचंद्र देव यांनी महाराजांना त्यांचे वय विचारले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे वय अंदाजे दीडशे वर्ष असे सांगितले होते. ही घटना 1935 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. मग देव जाणो त्यांचा जन्म कधी झाला. त्याचप्रमाणे पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी त्यांच्या काही टेस्ट करून त्यांचे वय जाणण्याचा प्रयत्न केला होता. त्या वैज्ञानिक तपासणीतही त्यांचे वय 152 वर्षे आढळले. पुढे नंतर शंकर महाराज अहिल्यानगरला गेले. तेथून पुढे नागपूरला गेले. तुळजापूर, हैदराबाद, श्रीशैल , अशी अनेक ठिकाणी त्यांनी भटकंती केली होती.असे महाराष्ट्र भ्रमण करत असताना त्यांनी समाजामध्ये त्यांचे अनेक अनमोल विचार पेरले.
इच्छा, हावरेपणा, इर्षा, आणि असुया सोडल्याने सुख शांती लाभते, सद्गुरु मुळे धार्मिक नैतिक आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्ती होते, देव,संत आणि गुरु यांच्यावर विश्वास व श्रद्धा ठेवा, अपेक्षा आणि पुरती शिवाय साधना नाही, आत्मप्राप्ती करून घेणाऱ्याला जन्म मृत्यू नसतो, भक्ती ही सिद्धी पेक्षा श्रेष्ठ आहे, आपल्यात सदगुणांची वाढ करा, आम्ही कैलास वाशी भगवान शिव शंकर आहोत. समाजाला देव समजून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मनुष्य जन्मातच हे समजून कल्याण करून घ्या. आयुष्याचे सार्थक होईल. असे अनेक मौल्यवान उपदेश शंकर महाराजांनी समाजाला केले.
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
हे सांगताना महाराज कधी विसरले नाहीत. उदबत्तीच्या धुरातून मी त्रलोक्य भटकून येतो असे म्हणणारे शंकर महाराज शेवटी पुण्याजवळील धनकवडीला स्थिर झाले होते. तेथेही त्यांनी पुण्यातील अनेक भक्तांना संकट मुक्त करून, ज्ञानाचा मार्ग दाखवून पूजनीय गुरुवर्य शंकर महाराज यांनी धनकवडीला सोमवार दिनांक 24 एप्रिल 1947 मध्ये वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी घेतली. पुण्यातून सातारा रोडने जाताना धनकवडी मध्ये त्यांचे समाधी स्थळ आहे. पुण्यातील प्रसिद्ध आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रख्यात समाज सुधारक,साधू ,पंडित शंकर महाराजांना मानत होते. अनेक विद्वान त्यांची विद्वत्ता जाणत होते.
पुण्यातील सरदार आप्पा बळवंत मेहंदळे यांच्या नावाने “आप्पा बळवंत चौक” प्रख्यात आहे त्यांच्याच घरातील ताईसाहेब मेहंदळे या शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या होत्या. शंकर महाराजांच्या सहवासामुळे ताई साहेब ज्ञानेश्वरी वर प्रवचने करू लागल्या होत्या. त्यांची प्रवचने मेहेंदळे वाड्यावर दुसऱ्या मजल्यावर दिवाणखान्यात होत होती. वेदांत आणि योगशास्त्राचा अभ्यासही त्यांनी महाराजांसोबत केला होता. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी स्वतः शंकर महाराज ही अनेक वेळा उपस्थित राहायचे.
मेहंदळे कुटुंबीयांची शंकर महाराजांवर अपार श्रद्धा होती. कर्नाटक मधील हिप्परगी गावामधील श्री भागवत यांनी महाराजांचे चरित्र लिहिले आहे. त्यावेळी त्यांनी सत्यनारायणाची मोठी पूजा करून त्यांच्या चरित्राचे संपादन केले होते. तसेच प्रसाद मधून त्यावेळी त्यांचे अनेक चरित्र पुस्तके वाटण्यात आली. तसेच श्री भस्मे आणि श्री भोर यांनी त्यांची शंकरगीता तयार केलेली आहे.आजही महाराष्ट्रातून तसेच भारतातून अनेक भावीक धनकवडीच्या एक अवलिया गुरु,योगी सद्गुरु शंकर महाराज यांच्या समाधी स्थळाला दर्शनासाठी जातात.