( अभंग क्रमांक- 1497, 1802, 536, 3146, 214 )
अभंग (Abhang )
एक धरिला चित्ती । आम्ही रखुमाईचा पती।।१।।
तो तेर्ण झाले अवघे काम । निवारला भवभ्रम ।।२।।
परद्रव्य परनारी । झाली विषाचिये परी ।।३।।
तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ।।४।। १४९७
अर्थ – आम्ही एकच रुक्मिणीचा पति पांडुरंग चित्तात धरला आहे . या योगाकारणे आमचे सर्वकार्य होऊन आमचा संसार दुःखाचा परिहारही झाला. परद्रव्य आणि परस्त्री ही आम्हाला विषासारखी भासू लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला फार व्यवहाराची, किंवा संसाराची आणि ह्यापेक्षा अधिक काही करण्याची जरूरी नाही.
चिंतन – महाराज या अभंगामधून परमार्थाची सुलभता सांगतात. अर्थात हा स्थितीपर अभंग आहे. देव मिळविण्याकरीता आणि परमार्थ साधण्याकरीता, आम्ही एकच देव धरला व दोन सोडले. त्यामुळे आमचे काम झाले.
अभंग
कनवाळू कृपाळू भक्तालागी मोही। गजेंद्राचा धावा तुवां केला विठाई ।।१।।
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जीवलगे यें वों पांडुरंगे ।।२।।
भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले । आंबऋषी कारणें जन्म दहा घेतले ||३।।
प्रल्हादाकारणें स्तंभी अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेम पान्हा पाजिला ।।४।।
पमन्याकारणें कैसी धांवसी लवलाही । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागरा ठायी ।।५।।
रवी पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणी वस्त्रे कैसी झाली माऊली ।।६।।
दुर्वास पातला धर्मा छळावया बनीं । धांवसी लवलाही शाखा देठ घेऊनि ।।७।।
कृपाळू माउली भुक्तिमुक्ति भांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ।।८।। १८०२
अर्थ– हे विठाबाई आई, तू भक्ताविषयी कनवाळू व कृपाळू आहेस म्हणून त्यास मोहून टाकतेस. तूंच गजेंद्राचा धावा ऐकून त्यास मुक्त केलेस. हे जीवाचे जीवलगे, पांडुरंगे आई माझ्यासाठी तू धांवून ये अशी मी द्विवार विनंती करतो.हे विठ्ठला, भक्तास साहाय्य केल्याने तुला फार श्रम झाले कारण अंबऋषीकरितां तुला दहा अवतार घ्यावे लागले. त्याप्रमाणेच भक्त प्रल्हादाकरीता खांबामध्ये अवतार घेऊन दैत्याचा तुला नाश करावा लागला व तू आपल्या भक्तास प्रेमाचा पान्हा पाजलास, उपमन्यूकरिता कसा लगबगीने धावलास व त्यास क्षीरसागरामध्ये स्थापून प्रेमाचा पान्हा कसा पाजलास.
ज्यावेळी दुर्योधनादि कौरवांनी द्रौपदीस सभेमध्ये वस्त्रहरण करून छळिले त्यावेळी तूच वस्त्रांचे रुप धरून कसे रक्षण केलेस? दुर्वास ऋषी धर्मास छळण्याकरीता वनात आला त्यावेळी द्रौपदीने तुझा धावा केला. तो ऐकून तू धांवत गेलास आणि द्रौपदीजवळ भाजीचा देठ मागितलास व त्यायोगाने तृप्त झालास आणि मग धर्मराजाचे रक्षण केलेस, तुकाराम महाराज म्हणतात हे कृपावंत आई, तू स्वर्गसुखादि भोगाचे व चारी मुर्तीचे आगर आहेस, म्हणून माझा अंगीकार तू कर ?
चिंतन – पांडुरंगाचा धांवा करणारा, तुकोबारायांचा हा प्रसिध्द अभंग आहे. बहुतेक हा अभंग वारकरी मंगळवारी व शुक्रवारी म्हणतात. कारण हे देवीचे वार म्हटले जातात. या अभंगात पाच, सहा भक्तांची नावे आहेत. १) गजेंद्र २) अंबऋषी ३) प्रल्हाद ४) उपमन्यू ५) द्रौपती ६) धर्म, खरं म्हणजे धावा द्रौपतीने केला आहे. धर्मराजभक्त, फक्त नावाला आहेत. या पांच भक्तांनी देवाचा धावा केला. तो कसा धावला.
त्यांच्याकरीता काय केले व काय दिले हे तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगात सांगतात, प्रथम चरणांत महाराज देवाचा स्वभाव सांगतात. विठ्ठल, पांडुरंग कसा आहे तर तो कनवाळू व कृपाळू आहे. ही दोन विशेषणे महाराज देवास देतात. कनवाळू व कृपाळू यात थोडा भेद आहे. कनवाळू या शब्दाचा अर्थ, कणव म्हणजे दया असा होतो. देव दयाळू आहे. एका अभंगात व्यासिंधू व कृपासिंधू असे दोनही शब्द आलेले आहेत.
अभंग
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण। आम्हां नारायण तैशा परी ।।१।।
सर्वभावें लोभ्या आवडे हैं धन। आम्हा नारायण तैशापरी ।।२।।
तुका म्हणे एकविध झालें मन । विठ्ठलावाचून नेणे दुजे ।।३।। ५७६
अर्थ– ज्याप्रमाणे पतिव्रतेस आपला पतीच परमपूज्य असतो, त्याप्रमाणे आम्हांला नारायण परमपूज्य आहे. ज्याप्रमाणे काया वाचा मर्ने लोभी मनुष्याला धन अत्यंत आवडते, त्याप्रमाणे आम्हास नारायण आवडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे मन एकनिष्ठ झाले आहे. ते विठोबावाचून दुसरे काही जाणत नाही.
चिंतन – या अभंगात तुकोबाराय अनन्यतेचे महत्व सांगत आहेत. नारद अनन्यतेची व्याख्या करतात.
अभंग
तुजविण कांही । स्थिर राहे ऐसें नाहीं ।।१।।
कळो आले बहुता रीती। पांडुरंगा माझ्या चित्ती ।।२।।
मोकलोनि आस । सर्वभावे झालो दास ।।३।।
तुका म्हणे तूंचि खरा । येर वाउगा पसारा ।।४।। ३१४६
अर्थ -हे देवा तुझ्यावाचून कांही अचळ राहील असे नाही. म्हणजे एका देवावांचून सर्व नाशिवंत आहे.हे पांडुरंगा असे अनेक प्रकारे माझ्या चित्तासच कळून आले. ह्याकरिता मी सर्वांची आशा टाकून सर्व भावाने तुझा सेवक झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तूच एक खरा आहेस बाकी सर्व मायेचे असार व्यर्थ आहे.
चिंतन – तुकोबाराय देवासमोर देवाबद्दल बोलतात. यात सात प्रकार पडू शकतात.
अभंग
वैकुंठा जावया तपाचे सायास । लागे जीवा नाश करणें बहु ।।१।।
शतया पुंडलिके केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ।।२।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ।।३।। २१४
अर्थ – वैकुंठास जाण्याकरीता जीवाचा नाश होण्याइतके तपानुष्ठानांचे कष्ट सोसावे लागतात, पापाचे आणि पृथ्वीस पापी जनांचे जे ओझे आहे ते नाहीसे करण्याकरीता पुंडलिकाने सर्वांवर उपकार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरी हे साक्षात पृथ्वीवरील वैकुंठ आहे. म्हणून सर्वांना वैकुंठाची वाट सोपी झाली आहे.
चिंतन – वारकरी सांप्रदायी साधकांची पाच तत्वे आहेत. १) देव २) संत ३) ग्रंथ ४) तिर्थक्षेत्रे
५) साधना
१) वारकऱ्यांचा देव आहे पांडुरंग, विठ्ठल अर्थात राम कृष्ण
२) सांप्रदायाचे मुख्य संत आहेत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबाराय वगैरे.
४) साधना आहे नामसंकीर्तन.
५) तिर्थ क्षेत्रे आहेत पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण वगैरे.