संत शेख महंमद | Sant Shekh Mahamad

 संत शेख महंमद ( Sant Shekh Mahamad ) यांचा जन्म वाहिरा या गावी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे झाला होता. संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधीकाळासंदर्भात अभ्यासकांमध्ये एकमत पहायला मिळत नाही. डॉ.भीमा मोदळे यांनी संत कवी शेख महंमद यांचा पुणे विद्यापीठात अभ्यास करून त्यांच्या जन्म शतकांबद्दल असलेल्या मतभिन्नतेवर आढावा घेऊन ते सांगतात की, संत कवी शेख महंमद यांचा जन्म  इ.स.1575 मध्ये झाला होता.

तसेच श्रीगोंद्यातील महाराजांच्या मठामध्ये एका फलकावर लिहिलेले साल 1626 हे दर्शवते. तसेच डॉ. भिमा मोदळे यांनी शेख महंमद महाराजांचा कालखंड तारतम्याने इ.स.1575 ते 1674 असा मानावा असे म्हटले आहे.त्यानुसार संत शेख महंमद महाराजांचा जन्मकाळ पंधराव्या शतकाचा उत्तरार्धात अखेरीस झाला आसावा असे मानले जाते.त्यांच्या वडिलांचे नाव राजमहंमद व आईचे नाव फुलाई होते. त्यांचे वडील राजमहंमद बीडमधील धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून नोकरी करत होते.

स्वामी जयराम यांनी त्यांच्या एका अभंगातून “ राजे महंमद पिता, फुलाई माता। त्यांचे पोटी संता अवतार॥” असे वर्णन केले आहे. तसेच स्वतः शेख महंमद यांनी त्यांच्या योगसंग्राम ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे की,”याती गोरे राज महंमद पिता। सगुण पतिव्रता फुलाई माता। प्रसवली अविनाश भक्ता। शेख महंमदालागी ॥”संत शेख महंमद यांना वारकरी व सुखी सांप्रदायाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांच्या पत्नी फतीमाबी  ह्या सुद्धा धार्मिक वृत्तीच्या असाव्यात कारण त्यांचा कोठेही विरोध असल्याचे संत महंमद यांच्या लिखाणातून आढळून येत नाही.त्यांना तीन मुले असून त्यांची नावे दावलजी, अजमजी आणि  हकीमजी अशी होती.संत शेख महंमद महाराज व फातीमाबी या दांपत्याचे मुलांवर चांगले संस्कार झाले होते.

तसेच त्यांच्या चारही मुलांनी संत महंमद यांना गुरु मानून त्यांच्याकडूनच दीक्षा घेतल्याचे समजते. त्यांचे संपूर्ण कुटुंबच वारकरी संप्रदयाचा आदर करत होते. घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे आणि त्यांचे वडील धारूर किल्ल्यावर नोकरी करत असल्यामुळे त्यांना गावात मान होता.शेख महंमद यांचा किल्ल्यावर लहानपणापासूनच वावर असल्यामुळे त्यांची नजर तीक्ष्ण असून त्यांना लहानपणापासूनच राजकीय तेढ आणि सामाजिक ज्ञान अवगत झाले होते.

तसेच त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण बुद्धीमुळे आणि थोर वृत्तीमुळे गोरगरीब जनतेच्या अडचणी, जातीभेद, वर्णभेद, या गोष्टी त्यांना समजत होत्या. त्यांना या गोष्टी पहावत नव्हत्या म्हणून त्यांनी संतांच्या सहवासात राहून त्यांच्याप्रमाणे या सर्व गोष्टींना विरोध करत काम करायचे ठरवले. आणि लवकरच ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या ठिकाणी राहण्यास आले. एकदा मालोजीराजे वेरूळ वरून शिखर शिंगणापूरला जात असताना संत शेख महंमद यांची कीर्ती माहित झाल्यामुळे रस्त्यातच असणाऱ्या श्रीगोंदा या ठिकाणी महाराजांची भेट घेण्यासाठी थांबले. भेटीनंतर मालोजीराजांना महंमद महाराजांविषयी त्यांच्या ज्ञानयोग तपचर्या व सिद्धपुरुषत्व याबद्दल जाणीव होताच त्यांनी मनस्वी त्यांचे दर्शन घेतले.

तसेच मालोजीराजे व बाळाजी कारभारी या दोघांनीही त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. तसेच काही जमीन त्यांना इनाम देऊन त्यांच्या मठात एक विहीरही खोदून देऊ असे एक इनाम पत्र त्यावेळी त्यांना सादर केले.पुढे शहाजीराजे ही महाराजांना गुरु मानू लागले. मुघल सत्तेने महाराजांना वाहिरे येथे जमीन इनाम म्हणून दिली होती तर मालोजीराजांनी श्रीगोंदा येथे महाराजांना जमीन इनाम म्हणून दिली होती. वाहिरा आणि श्रीगोंदा या दोन्ही गावांमध्ये त्यांनी आपला जास्तीत जास्त जीवन काळ व्यतीत केला.

त्यांचा काळ हा मुस्लिम राजवटीचा काळ होता.दिल्लीचा मुघलबादशाहा, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज तसेच देशात इतर ठिकाणीही छोटी मोठी राज्य होती. हे सर्व सत्तेसाठी, स्वार्थापायी एकमेकांशी लढत होते .यात गोर-गरीब लोकांचे हाल होत होते तर दुसरीकडे लोकांमध्ये अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद वाढतच चालला होता. देशामध्ये हिंदूंची संख्या जास्त असूनही बहुतेक ठिकाणी मुस्लिम सत्ता होती.

दोन्ही धर्मीयांमध्ये आचार विचार आणि राहणीमान पूर्णपणे वेगवेगळे होते. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची ही वर्णव्यवस्था आणि प्रत्येक जातीचे देव व परंपरा वेगवेगळ्या होत्या. या सर्व गोष्टींमुळे सर्व समाजातील लोकांची प्रगती थांबलेली होती. सर्वांना बुरसट विचाराने ग्रासलेले होते. आणि या काळातच संत शेख मोहम्मद यांनी आपले काम जोरात सुरू केले होते. संत शेख महंमद यांनी वारकरी संप्रदायाबरोबर सुफी,दत्त,नाथ या चारही सांप्रदायाचे काम परिस्थितीनुसार त्यांनी केले असावे असे काही इतिहासकारांनी त्यांचे मत सांगितले आहे.

तसेच त्यांच्या मधील व्यासंग व योगसाधना मोठी असली पाहिजे असे इतिहासकार सांगतात. भारतातील मुख्य कादरी सुफी म्हणून महंमद गौस या व्यक्तीला मानले जाते. आणि या मोहम्मद गौस पासूनच शेख मोहम्मद यांची परंपरा सांगितली जाते.महंमद गौस नंतर राज महंमद नंतर कादरी चाँद बोधले नंतर शेख महंमद अशी गुरू परंपरा आहे. जनार्धन स्वामी आणि शेख महंमद हे दोघेजण चांद बोधले यांचे शिष्य होत. तसेच जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज होते.

अशा या गुरुपरंपरेवरून आणि चारही पंथात असलेल्या भजन,पूजन, योगसाधना, अनुष्ठान आणि ध्यानधारणा या साम्यावरून  संत शेख मोहम्मद यांनी चारही पंथाचे काम केले असावे असे सांगितले जाते. परंतु वारकरी संप्रदाय हा सरळमार्गी,समतावादी पंथ असल्याने वारकरी सांप्रदायामध्ये ते जास्त रमल्याचे सांगितले जाते.वारकरी संप्रदाय हा सर्व जाती-धर्म, वंश, लिंग आदींना सोबत घेणारा सर्वात मोठा संप्रदाय आहे असे  त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेले आढळते. तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाची महती समाजापर्यंत पोहचवण्याचे काम शेवटपर्यंत केले.परंतु नदीचे मूळ आणि ऋषीचेकुळ शोधू नये असे अनेक थोर संत महापुरुष सांगतात.  

संत परंपरेमध्ये सोळाव्या शतकाचा विचार केला असता मुस्लिम समाजात जन्म घेऊन सुद्धा सर्व समाजातील लोकांच्या उद्धारासाठी संत शेख महंमद यांचे साहित्य म्हणजे फार मोठे योगदान आहे. परंतु दुर्दैव म्हणजे त्यांनी एकूण दहा ग्रंथ लिहिले परंतु त्यातील काही अजूनही प्रकाशित झाले नाहीत.त्यांनी 1)योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10)  ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. यामध्ये योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. यात 18 अध्याय असून वरील ग्रंथापैकी साठी संवत्सर व ज्ञान गंगा हे ग्रंथ अप्रकाशीत आहेत.

महाराजांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याबद्दल घडलेल्या अनेक चमत्कार कथा आपण ऐकत आलेलो आहोत जसे की खाकेबाची कथा, मोदोबाची कथा, देहू मधील मंडप विझवल्याची कथा, व्यापारी भक्ताची जहाज काढल्याची कथा, गाय जिवंत केल्याची कथा, योग संग्राम कोरडा निघाल्याची कथा, तेलीनबाईची कथा, मुधा पांगुळ प्रसंग, गोधडी थरथर कापायला लागल्याची कथा आशा अनेक कथा संत महंमद महाराजांविषयी सांगितल्या जातात.शेवटी  संत शेख महंमद यांची समाधी वाहिरा व श्रीगोंदा या दोन्ही ठिकाणी सपत्नीक आहे. त्यावरून त्यांच्या दोघांमधील प्रेमभावना व भक्तीभावना समजतात.

Leave a Comment