संत मोरया गोसावी | Sant Morya Gosavi

कोणी गणपती बाप्पा म्हटले तर पुढे लगेच मोरया म्हटले जाते ही जणू प्रथाच पडली आहे. गणपती बाप्पा मोरया ही ओळ आजवर आपण किती वेळा म्हटले असेल ते मोजता देखील येणार नाही. परंतु गणपती बाप्पाचा जयजयकार करत असताना मोरया का म्हटले जाते हा प्रश्न आपल्याला कधी पडलाच नाही. तर मोरया हे नाव आहे 14 व्या शतकातील हिंदू धर्म आणि गाणपत्य सांप्रदायातील संत मोरया गोसावी ( Sant Morya Gosavi ) नावाच्या मोठ्या गणेश भक्ताचे.

अष्टविनायकाची यात्रा करण्याची प्रथा सुद्धा त्यांनीच घालून दिल्याचे सांगितले जाते. त्यांचा जन्म पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव या ठिकाणी झाला होता. मोरगाव हे महाराष्ट्रात मयुरेश्वर आणि मोरेश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मोरया गोसावी महाराज मोरगाव वरून पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले होते. मोरया गोसावी कोणत्या काळात होऊन गेले याबद्दल अनेक मतभेद आहेत. इंडोलॉजिस्ट युवराज कृष्णन यांच्या मते मोरया गोसावी हे तेरावे ते चौदाव्या शतका दरम्यान होऊन गेले.

कर्नाटक मध्ये बिदर जिल्ह्यात शाली नावाच्या गावात वामन भट्ट शालिग्राम आणि त्यांची पत्नी पार्वती बाई यांच्या सात्विक कुटुंबात मोरया गोसावी यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील वामन भट्ट श्रुती स्मृती पुराणोक्त गृहस्थ आश्रमाचे काटेकोरपणे पालन करत होते. त्यांचे अर्धे आयुष्य लोटले तरी त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. म्हणून उदास असलेले वामन भट्ट घर सोडून पत्नी बरोबर चालत मजल दर मजल करत ते मोरगावला आले. मोरगावला पूर्वीच्या काळी “भूस्वानंद”असे म्हटले जायचे. कडेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरयाला पाहून त्यांचे चित्त स्थिर झाले होते. येथेच राहून वामन भट यांनी गणपतीची  खूप भक्ती केली.

त्यांच्या या भक्तीतूनच गणपती त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला. श्री शके १२९७ सन.१३७५, विधातरू नाम संवत्सर, माघ शुद्ध चतुर्थी, वार शुक्रवार रेवती नक्षत्र, द्वितीय चरण माध्यान काळ असताना त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव त्यांनी अजन्मा असे ठेवले होते. अजन्मा लहानपणापासून गणेश भक्तीत रमला होता. गणेशाच्या आराधनेत मग्न असताना त्याची भेट गुरु योगीराज नयन भारती गोसावी यांच्याशी झाली होती. त्यांना गुरु नयन भारती गोसावी यांनी कफनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू दिले होते व मंत्रउपदेश करत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली होती.

तसेच त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळा मुठा नदीच्या काठी येऊन थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली होती. 42 दिवसांच्या कठोर अनुष्ठानने त्यांना चिंतामणी प्रसन्न झाले होते आणि मोरया आता गोसावी बनले होते. शतदम संपन्न गोसावी अष्ट सिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या, संकट निवारणासाठी राबू लागल्या होत्या. अनेक भक्तांचे कष्ट व दुःख निवारण त्यांनी केले.त्यांच्या पायाशी येऊन लोक व्यथा मांडू लागले.

त्यामुळे मोरया गोसावींना ध्यानधारना करण्यासाठी वेळ मिळत नसे. एक दिवस गणपती समोर त्यांनी आपली ही समस्या मांडली. विनायकाच्या संकेतानुसार मोरया गोसावी पुण्याजवळील चिंचवड येथे आले आणि तेथील एका जंगलात जाऊन एकांतात ध्यानधारणा करू लागले. चिंचवड गावच्या लोकांना हे समजताच त्यांनी त्यांना गावात येण्याची विनंती केली आणि गावात आणल्यानंतर त्यांना तेथे एक झोपडी बांधून दिली. त्या झोपडीत राहून मोरया गोसावी गणपतीची सेवा करू लागले.

प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड गाव सोडून मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनाला जात असायचे. प्रत्येक चतुर्थीला मोरेश्वर ला मोरया ची पूजा करायचे. मग पंचमीला पारण करून परत चिंचवडला येत असायचे. कितीही संकटे आले,अडचणी आल्या तरी मोरया गोसावींनी आपल्या गणपती आराधनेत कधीही खंड पडू दिला नाही. एका अख्यायिकेनुसार एकदा कऱ्हा नदीला फार मोठा पूर आला होता. मोरया गोसावींना नदी पार करता येईना.

तेव्हा साक्षात गणपती कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन आला आणि त्याने मोरया गोसावीना कऱ्हेपार केले. तसेच एकदा त्यांना मोरगाव ला जायला फार उशीर झाला होता. देऊळ बंद करून गुरव घरी गेले होते. मोरया गोसावी ना गणपतीची पूजा होईल असे वाटेना. मग मोरया गोसावी तरटी पाशी बसून गणपतीला विनंती करू लागले. की मी फार लांबून आलो आहे माझ्या हातून तुझी सेवा घडू दे! त्यावेळी साक्षात गणपती त्यांच्यासाठी देवळाबाहेर आला. व त्याने मोरया गोसावी च्या पूजेचा स्वीकार केला.

हळूहळू चिंचवड मध्ये त्यांना भेटण्यासाठी लोक येऊ लागले. मोरया गोसावींच्या महात्म्यामुळे चिंचवड गाव गजबजू लागले. त्यावेळी मोरया गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते. ते अखंड आत्मा रंगात रमलेले असायचे. जनसंपर्कमुळे परत त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला होता. मग त्यांनी परत मयुरेश्वराचा धावा केला. हे ईश्वरा मयुरेश्वरा मला आता गुप्तवास करण्याची, समाधि घेण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल.

मयुरेश्वर त्यांना म्हणाले अरे तू आणि मी दोन वेगळे नाहीत.आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात वास करीन.जा तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील. असा आशीर्वाद देऊन मयुरेश्वर अंतरधान पावले. समाधानाने आणि तृप्तीने त्यांनी जिवंतपणे समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि आपला विचार त्यांनी आपला मुलगा चिंतामणीला सांगितला होता. हे ऐकून  चिंतामणीला फार दुःख झाले होते. परंतु वडिलांच्या आज्ञा असल्यामुळे पवना नदीच्या काठावर एक पवित्र जागा पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी एक गुहा तयार केली. मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके 1483 (इ. स.1561) हा उत्तम दिवस पाहून मोरया गोसावी घरून निघाले.

देवळात आले त्यांच्याबरोबर चिंतामणी महाराज दोन सुना नातवंडे असा परिवार होता. गावातील अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते. सगळीकडे मोरया नावाच्या घोषणा देत होते. मोरया गोसावींनी स्नान केले, पूजा केली, वस्त्र परिधान केले, आणि गुहेत उतरले. एक – दीड परस खोलीची गुहा होती. दहा हात लांब- रुंद, चिरे बंद पाषाणांनी बांधून काढलेली, मधोमध पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, पुढे एक चौरंग, त्यावर गणेश पुराण, दोन्ही बाजूला दोन उज्वल समया, मोरया गोसावी आसनावर बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या सुनांनी औक्षण केले. सगळेजण पाया पडत होते.

बघता बघता मोरया महाराज यांची समाधी लागली. नजर आणि भुवया स्थिरावल्या. शरीर ताट झाले. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले. चित्त चैतन्यकार होऊन  ते आत्मानंदात निमग्न झाले. चिंतामणी महाराज बाहेर आले. एक प्रचंड मोठी शिळा उचलून त्यांनी गुहेवर ठेवली. चिंतामणी महाराजांनी समाधीवर सिद्धी,बुद्धी सहित मोरया ची मूर्ती बसवली. समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली.आता इथे एक सुंदर मंदिर असून हे समाधी स्थान जागृत समजले जाते.

आजही विविध प्रांतातून भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. भक्तांना साक्षात्कार येतो आणि प्रचिती येते. आणि अशा गणपतीचा अवतार असलेल्या मोरया यांचे नाव गणपती बरोबर कायम लागले गेले. म्हणून “गणपती बाप्पा मोरया”, “मंगलमूर्ती मोरया “ अशा गणपतीच्या घोषणा दिल्या जातात.
            

Leave a Comment