संत बोधले महाराजांचा ( Sant Mankoji Bodhale Maharaj ) जन्म बाले घाटात धामणगाव या गावी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे इ. स.1604 मध्ये झाला होता.त्यांचा अवतार हा ईश्वरी अवतार मानला जातो. म्हणून आपणास त्यांच्या जन्म विषयी सविस्तर वर्णन अगोदर पहायला हवे . मानकोजी महाराजांच्या वडिलांचे नाव भानजी तर आईचे नाव पार्वतीबाई होते. हे कुटुंब मूळचे सासवड गावचे होते.याच गावी संत सोपान काकांचे समाधी स्थान आहे. संत सोपान काकांच्या भक्ती आणि कार्याने पवित्र झालेल्या या भूमीतच माणकोजी महाराजांचे वडील भानजी राहत होते.
एकदा भानजी जगताप यांना तीर्थयात्रेला जायची इच्छा झाली. आणि त्यांनी तुळजाभवानीच्या तुळजापुरला जाण्याचे निश्चित केले. आणि आपल्या आई तुळजाभवानीचा कुलाचार करायचा त्यांनी ठरवला.आराध्य देवता आपला परमार्थ सांभाळत असते तर कुलदेवता आपला संसार सांभाळत असते त्यामुळे कुलदेवतेचे चिंतन पूजन वर्षाकाठी का होईना परंतु झाले पाहिजे असे भानजी नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी तुळजापूरला जायचे ठरवले. बार्शीला एका भगवान मंदिरात भानजी कुटुंबासह दर्शनासाठी आले असता त्यांना संध्याकाळी फार उशीर झाला होता. रात्र झाल्यामुळे आणि तेथील नदीला पूर आल्यामुळे भानजी यांनी बार्शी मध्येच मुक्काम केला.
सकाळी उठल्यावर त्यांना इतके प्रसन्न वाटले की, आजूबाजूला घनदाट अरण्य, शेजारून एक नदी वाहते परंतु त्यांना त्या गावाचे नावही माहित नव्हते ना नदीचे नाव माहीत होते . मग त्यांनी एका गृहस्थाला नदीचे व त्या गावाचे नाव विचारले असता त्यांनीही नागमोडी नागझरी नदी असल्याचे सांगितले व त्या गावाचे नाव धार्मन्यग्राम असे सांगितले. तसेच या गावाचा इतिहासही काही वेगळाच असल्याचे सांगितले.
या गावाजवळ असलेल्या वनाचे नाव धर्मवन होते तसेच या वनात एक महादेवाचे लिंग होते आणि त्या लिंगाचे नाव धर्मलिंगेश्वर असे सांगितले आहे. धर्म लिंगेश्वर हे अधिष्ठान फार जुन्या काळातील असून महाभारतातील पाच पांडव जेव्हा आज्ञातवासात होते त्यावेळी याच वनात ते फिरत फिरत आले होते आणि याच वनात स्वतः धर्मराज यांच्या हस्ते हे धर्मलिंग स्थापन झाल्यामुळे या लिंगाला धर्मलिंगेश्वर नाव दिले गेले. आणि त्या वनाला धर्मवन नाव पडले आणि म्हणूनच त्या गावाला धर्मग्राम असे नाव पडले. या धर्मग्राम गावाला पुढे धर्मण्यपूर असे नाव पडले. आणि कालांतराने या गावाला धामणगाव असे नाव पडले.
अशा या धामणगाव मुक्कामी असलेल्या भानजी यांनी आपल्याला मुक्कामी जागा चांगली भेटली म्हणून त्यांनी तेथेच तीन-चार दिवस मुक्काम ठोकला. आणि नंतर पुढे ते तुळजापूरला गेले. तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले त्यावेळी तुळजाभवानीने त्यांना दृष्टांत दिला की, आता तू माझ्या पायथ्याशी राहा. तू परत सासवडला जाऊ नकोस धामणगाव हे तुळजापूरच्या पायथ्याशी असलेले गाव असल्यामुळे आणि तुळजाभवानीच्या दृष्टांतामुळे भानजी आणि त्यांच्या कुटुंबानी या धामणगावातच राहायचे ठरवले.
धामणगावात राहत असताना भानजी यांचा शांत स्वभाव, वैराग्य वृत्ती, आणि त्यांचा भक्तीभाव यामुळे त्यांनी धामणगावात लवकरच लौकिक मिळवला. सत्वशील असणाऱ्या भानजी यांना गावात लोक मानू लागले. त्यांची पत्नी पार्वतीबाईचे वर्णनही त्यांच्या चरित्रग्रंथात फार सुंदर केले आहे. भजनी निरंतर, पतीच्या मनोगणाने संसार करणारी, ग्रहणी असणारी असे थोर वर्णन पार्वतीबाईंचे केलेले आपणास आढळते. अशी ही पार्वती त्याच गावात गरोदर झाली आणि त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले. भानजी यांना धामणगाव मध्ये राहण्याचा अधिकार मिळाला तसेच त्यांना तेथेच पुत्ररत्न प्राप्त झाले आणि आई तुळजाभवानीचा दृष्टांतही मिळाला त्यामुळे भानजी यांचे कुटुंब तेथेच आनंदात राहू लागले.
त्याच गावात भिकाजी जगताप नावाचा मनुष्य राहत होता. भिकाजी जगताप यांच्याकडे गावची पाटीलकी होती. परंतु भिकाजी निपुत्रिक होते. आणि त्यांना वार्धक्य आलेले होते. मग ते भानजी जगताप यांना विनंती करू लागले की तुम्हीही भानजी जगताप आणि मीही भिकाजी जगताप या गावची पाटीलकी माझ्याकडे आहे. तुम्ही आम्ही एकच आहोत. एक काम करा ही पाटीलकी तुमच्याकडे घ्या कारण मला मुलगा नाही. मग भानजी जगताप यांनी हे मान्य केले. आणि गावची पाटीलकी भानजी जगताप यांच्याकडे आली. पुढे भिकाजी जगताप यांचा सांभाळ मरेपर्यंत भानजी जगताप यांनीच केला. भिकाजी जगताप यांच्या मृत्यूनंतरही भानजी जगताप यांनी त्यांचे सर्व विधीमार्ग केले.
पुढे पाच वर्षांनी भानजी जगताप यांना दुसरे पुत्र प्राप्त झाले. जेव्हा पार्वतीबाई गरोदर झाली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे तेज काही वेगळेच होते. कारण पोटामध्ये दुसरा गर्भ हा कोणता आहे हे सांगताना बोधलीलांबरी ग्रंथामध्ये असे वर्णन केले आहे की कैलासवासी शंकरच पुत्र रूपाने पार्वतीबाईंच्या पोटी जन्माला येणार आहेत. खरं तर हा अवतार कसा आहे हे सांगताना असे म्हणावे लागेल की, जसा सूर्य आणि चंद्र यांचा उदय आणि अस्त आपल्या मनाप्रमाणे कल्पित असतो सूर्य, चंद्र यांचा कधी उदय आणि अस्त होतच नाही.
त्याप्रमाणेच देवांना आणि संतांना जन्म आणि मरण लोकसंग्रहाकारण आहे. म्हणून मानकोजी महाराजांना भगवान शिव शंकराचा अवतार मानले जाते. काही ठिकाणी भगवान शंकराचा अवतार संत निवृत्ती महाराज आणि निवृत्ती महाराजांचा अवतार मानकोजी महाराज सांगितले जातात. आणि म्हणूनच मानकोजी महाराजांच्या आरतीमध्ये.
अदिब्रह्म मूर्ती शिव शिव शंकरा व गौरीशंकरा l
तोच निवृत्ती झाला कलयुगी थोर ll
निवृत्तीनाथाचा केवळ अवतार l
बोध त्याची मुळी झाला दिनकर ll
असे वर्णन आढळते. तसेच गोपाळ मालगावकरांनी जे अष्टक चरित्र केले आहे त्यामध्ये ते सांगतात की भानजी जगताप यांनी जेव्हा जन्मताच मानकोजींचे रूप पाहिले तेव्हा त्यांचे स्वरूप पाहून भानजी लिन झाले होते आणि अक्षरश: त्यांच्यामधील मी तू पण हरपले होते कारण मानकोजींचे चे स्वरूप हे साधारण स्वरूप नसून ते संत रुपी तेज होते. त्यांच्या पायामध्ये कमळ आहे.नाभी हिरा शोभून दिसत आहे.अशा पद्धतीने दिनाकाराने जन्मला मुरारी असे थोर वर्णन त्यांच्या चरित्रात केले आहे . तसेच ब्रह्मवृंदांनी हा मुलगा दिनाकाराने जन्मलेला मुरारी असून त्याच्या प्रतापाने तो त्या काळातील यवन साम्राज्य संपून टाकील. असे भविष्य वर्तवले.
मग सर्वजण जमा झाले.सर्व आयाबाया जमा झाल्या आणि पहिल्याचे नाव शिवाजी होते तर दुसऱ्या मुलाचे नाव सर्वानुमते मानकोजी ठेवण्यात आले. माणकोजी कालांतराने युद्धकलेमध्ये तरबेज झाले होते. पुढे त्यांनी काही रांगड्या तरुणांचे संघटन केले. व त्यांना युद्धाचे प्रशिक्षण दिले. आणि सर्वांनी मिळून त्या काळातील मुस्लिम राजवटीच्या अन्यायाला तोंड देत अन्याय करणाऱ्या यवणाला पंचक्रोशीतून हाकलून लावले.
आधीच पाटीलकी असणाऱ्या मानकोजींनी त्यांच्या पराक्रमामुळे तेथील पंचक्रोशीत सत्ता स्थापन केली होती. परंतु एकदा वडील आणि आपला भाऊ शिवाजी यांच्या सोबत माणकोजी पंढरपूर तीर्थक्षेत्री गेले असता पंढरपुरातील लोकांचा भक्तिभाव सोहळा, विठ्ठलाचे मनोभावे दर्शन, आणि पंढरीचे भक्तिमय स्वरूप पाहून त्यांच्या सत्तेच्या जगाचा त्यांना विसर पडला.आणि ते त्या सुख सागरात बुडून गेले.
तेथून पुढे माणकोजीं अहोरात्र विठ्ठल नामाचा जप करत नित्यनेमाने पंढरीची वारी करू लागले. एक दिवस ते विठ्ठल मंदिरात ठाण मांडूनच बसले आणि अन्न पाण्याचा त्याग करून सलग 14 दिवस जप करत बसले होते. यावेळी त्यांना पांडुरंगाने साक्षात दर्शन दिले. आणि म्हणूनच विठ्ठलाने बोध केला म्हणून मानकोजींचे आडनाव बोधले झाले. तसेच साक्षात्कारात पांडुरंगाने माणकोजींना सांगितले की येथून पुढे तुला आता पंढरीला यायची गरज नाही. मग माणकोजीं पांडुरंगाची मूर्ती घेऊन धामणगावला आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर बरेच संत मंडळी आणि संत तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी हे दोघेही असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याच हस्ते धामणगावला पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बोधले महाराजांचे एकूण 110 अभंग सरकारी सकल संत गाथेमध्ये असून ते आजही भक्तांसाठी उपलब्ध आहेत. आणि त्या काळापासून आषाढी कार्तिकीला धामणगावात मोठी यात्रा भरते. तसेच साक्षात विठ्ठल एकादशीला रात्रीच्या वेळी पंढरपूरवरून धामणगावला येतात असा भाविकांचा समज आहे. आजही धामणगाव मध्ये विठ्ठलाचा पालखी सोहळा पाच दिवस साजरा केला जातो. आणि पौर्णिमेला काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फुटते. काल्याच्या कीर्तनानंतर देव काला घेऊन पंढरीला जातात अशी भाविकांची भावना आहे. बोधले महाराजांचे चरित्र भक्तविजय आणि बोधलीलांबरी या ग्रंथांमध्येही सांगितलेले आहे.
बोधले महाराजांची विठ्ठल भक्ती सोबतच समाजकार्य ही फार मोठे होते. त्यांनी दुष्काळ काळात आपल्या घरातील धान्य लोकांना वाटले. तसेच गरीब वारकऱ्यांना ही सतत ते धान्य वाटप करत असायचे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चमत्कार करून समाजाला पांडुरंगाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि अनेकांना भक्तीमार्ग दाखवला.शेवटी शके 1616 इ स.1694 मध्ये ज्येष्ठ वद्य तृतीया या दिवशी त्यांनी धामणगाव येथे संजीवन समाधी घेतली आजही त्यांचे शिवाजी यांचे वंशज प्रकाश महाराज बोधले धाराशिव जिल्ह्यात राहतात. आणि माणकोजींचे वंशज विवेकानंद बोधले यांनी धामणगाव येथे राहून ख्याती संपादन केली आहे.