संत जगमित्र नागा | Sant Jagmitra Naga

 संत जगमित्र नागा ( Sant Jagmitra Naga ) यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे तेराव्या शतकामध्ये इ.स.1330 मध्ये झाल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांचे समकालीन असलेले संत जगमित्र नागा हे वडिलोपार्जित श्रीमंत घराण्यातील होते. परंतु काही काळानंतर काळाच्या ओघात त्यांची संपत्ती अचानक नष्ट झाल्याने त्यांची अचानक गरिबी आली होती. अशा गरीबी परिस्थितीमुळे त्यांचे जिवलग मित्रही त्यांच्यापासून दूर गेले होते.

समाजातील त्यांची पत कमी झाली होती तरी ते ईश्वर भजनात नेहमी मग्न असायचे. त्यांना एवढे मित्र होते की त्यांचे नाव जगमित्र असे पडले. असे जगाचे मित्र असणारे जगमित्र  नागा स्वामींच्या कृपेमुळे आणि सहवासामुळे महान झाले म्हणून त्यांच्या नावापुढे लोकांनी नागा जोडून जगमित्र नागा असे त्यांना म्हटले जाऊ लागले. तर काहींच्या मते जगमित्र हे त्यांचे टोपण नाव होते. त्यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील मुठे खोऱ्यातील पिरंगुट या परिसराचे इ.स. 1358 मध्ये कुलकर्णी पद होते. त्यानंतर बाळाजी हरी मेंडजोगी नावाच्या इसमाला जगमित्र यांनी ते वतन विकले.

संत नामदेवांचे समकालीन असलेले संत जगमित्र नागा यांचा कार्यकाळ हा अव्वल मुसलमानी राजवटीचा होता. त्या काळात मोठ्या प्रमाणात देव देवतांचा तिरस्कार केला जायचा. तसेच भक्ती समूहावर आक्रमणे केली जायची.धर्मनाश करण्याचा प्रयत्न केला जायचा. हिंदूंना मुसलमानात घेतले जायचे. अशा परिस्थितीत समाजाला प्रेमभाव देणाऱ्या, समतेचा विचार सांगणाऱ्या, जातीभेद,निरपेक्ष, धर्मनिरपेक्ष विचारधारा सांगणाऱ्या आणि भावभक्ती करणाऱ्या वारकरी सांप्रदायाचा नेमकाच उदय झालेला होता.आणि याच काळात संत जगमित्र नागा यांनी संत ज्ञानदेवाच्या विचाराने आणि संत नामदेवांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक आणि परमार्थिक लोकसेवेचे कार्य केले होते.

संत जगमित्र नागांचे आयुष्य त्या काळच्या संतांच्या सहवासातून उज्वल झाले होते. पंढरपूरच्या साधुसंतांच्या संगतीमुळे,नामदेवाबरोबर अनेक वेळा केलेल्या तीर्थयात्रेमुळे, कायमस्वरूपी आषाढी कार्तिकी वारी,भजन,कीर्तन, प्रवचन यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक व परमार्थिक झालेला प्रभाव पुढे लौकिक ठरला. जात- धर्म बाजूला ठेवून संत जगमित्र यांनी भाव भक्तीने केलेले हरी चिंतन ते सात्विक भावाने नेहमी करत असायचे. पुढे त्यांनी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.गावात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे व नित्य नियमाने हरिचिंतन करणे हाच त्यांचा दिनक्रम होता.

संत जगमित्र यांनी संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या सहवासात राहून भावविश्व,ईश्वरभक्ती, भावनिक तळमळ,अध्यात्मिक तळमळ, ईश्वर चिंतन,परमत सहिष्णुता,नामस्मरण यांसारख्या अनेक गोष्टी अनुभवल्या त्यामुळे विठ्ठला बद्दलची अंतकरणातून त्यांना असणारी ओढ ते त्यांच्या अभंगातून सांगतात. त्याकाळी मराठवाड्यात परळी वैजनाथ व आजूबाजूचा परिसर मुसलमानी सत्तेच्या अमलाखाली होता. जगमित्र नागा यांच्या समकालीन सर्व संत त्यावेळी अतिशय अशा गंभीर परिस्थितीला तोंड देत लोकसेवेचे कार्य करत होते. संत जगमित्र नागा त्याकाळी त्यांना वरिष्ठ असणाऱ्या संत गोरा कुंभार, संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत चोखामेळा इत्यादी थोर संतांच्या संगतीत राहून भजन कीर्तनाचा लाभ घेत होते.

या सर्वांपेक्षा वयाने लहान असलेले जगमित्र त्यांच्या बाजूला उभे राहून ते हळूहळू प्रबोधन करण्यास शिकले. त्यांनी संत नामदेवांच्या सहवासात राहून रोज किर्तन, भजन, प्रवचन, हरी जागर करत आपले अध्यात्मिक ज्ञान वाढवले व लोकसेवेचा वसा घेतला आणि त्यानंतर ते कायमचे विठ्ठल भक्त झाले. त्याकाळी समाज जीवन धर्मप्रधान होते. कर्मकांडे आणि नको त्या चालीरुढी फारच वाढत चालल्या होत्या. त्यावेळी समाजाला समानतेच्या आणि एकतेच्या विचारांची गरज होती. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा प्रभाव असल्यामुळे लोकांचा भगवंतावर विश्वास बसत नव्हता. म्हणून संत महात्मे अनेक काव्यांमधून, कथा आणि प्रवचना मधून  भक्तांच्या संकट समयी ईश्वर त्यांच्या पाठीशी कसा उभा राहतो सांगत होते.

अशाच काही कथा संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगामधून श्री सकल संतगाथेमध्ये संत जगमित्रांबद्दल सांगितलेल्या आहेत. त्या कथा त्यांच्या कठोर पांडुरंग भक्ति बद्दल आहेत. भक्त संकट समई परमेश्वराचा कसा धावा करतो आणि परमेश्वर भक्तांच्या पाठीशी कसा उभा राहतो ते त्या कथेच्या अभंगरचनेमधून सांगतात. संत नामदेव सांगतात की एकदा जग मित्रांच्या घराला सगळे झोपेत असताना आग लागली अशात अचानक जगमित्र जागे झाले. त्यांचे घर जळत असताना घर फक्त वरच्या बाजूने जळत होते परंतु घरातील कोणालाच काहीही जाणवत नव्हते.

तसेच त्या आगीमुळे त्यांच्या घरातील कुठल्याही गृहस्थाला कसलीच इजा झाली नाही. त्यावेळी जगमित्रांना आग लागल्याचे समजतात त्यांनी फक्त पांडुरंगाचे नामस्मरण चालू केले  होते. म्हणून साक्षात विठ्ठलाने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण केल्याचे त्या कथेतून ते सांगतात. त्यावेळी गावातील सर्व लोक चकित झाले होते. असे संत नामदेवांनी त्यांच्या ”भक्ता सहकारी असे नारायण, किले निवारण विघ्नाचे त्या l “ या अभंगातून या कथेचे विवरण केले आहे.

अशीच एक दुसरी चमत्कार कथा संत नामदेव कृत संत चरित्रे मध्ये श्री सकल संत गाथा मध्ये सांगितलेली आहे. एकदा परळीमध्ये मुस्लिम राजसत्तेचा नवीन सुभेदार आला होता. त्याने गावकऱ्यांनी भेट दिलेली जग मित्रांची जमीन जप्त केली होती. गावकऱ्यांनी त्याला फार विनंती केली की जगमित्रांना लोकांनी दिलेली ही जमीन आहे तुम्ही असे करू नका. परंतु सुभेदाराने ऐकले नाही उलट सुभेदार जगमित्रांना म्हणाला की, आमच्या घरी विवाह कार्य आहे.

आमच्या शुभ कार्यात वाघ दैवत असते. तू माझ्या घरी शुभकार्य दिवशी  एक वाघ घेऊन ये. तेव्हा जगमित्रांनीही वाघ घेऊन येण्याचे मान्य केले. आणि संत जगमित्रांनी विठ्ठलाला साकडे घातले की हे पांडुरंगा तूझ्या भक्तावरील हे संकट टळू दे. आणि चमत्कार काय तर साक्षात विठ्ठलाने वाघाचे रूप धारण करून जगमित्राजवळ वाघ आला. जेव्हा जगमित्रांनी ओळखले आणि त्यांनी त्या वाघाला गावात आणले.

त्या वाघाला घेऊन जगमित्र गावाच्या वेशीत आले तेव्हा सगळ्या गावात भीतीचे वातावरण तयार झाले होते. सर्वांनी घराची दारे खिडक्या लावून घेतल्या  होत्या. परंतु जग मित्रांनी सर्व लोकांना सांगितले की तुम्ही भजन करत राहा हा वाघ तुम्हाला काही करणार नाही आणि जगमित्र त्या वाघाला घेऊन सुभेदाराच्या घरी गेले. हे पाहून सुभेदाराने जगमित्रांना हात जोडले आणि महाराज मला क्षमा करा म्हणून जगमित्तत्रा पुढे ते नतमस्तक झाले. मग जगमित्र वाघाला घेऊन वनात गेले. संत जगमित्र नागा हे फारच शांत संयमी वृत्तीचे सत्पुरुष असल्यामुळे त्यांची ख्याती लवकरच दूरवर पसरली होती.पुढे संत जगमित्र नागांच्या कीर्तन व प्रवचनासाठी गावोगावी लोक मोठ्या संख्येने जमू लागले. आणि त्यांच्या चरणांचे मनस्वी दर्शन घेऊ लागले.

येथील अनेक भागवत पंथीय भक्त संत जगमित्राबद्दल आदर करत होते. ते नेहमी गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते म्हणून गावातील काही परमार्थिक मंडळींनी काही जमीन त्यांना दान म्हणून दिल्याचे सांगितले जाते. परंतु जगमित्र नागा यांनी हे दान सुरुवातीला नाकारले होते. परंतु नंतर गावकऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी ती जमीन मान्य केली परंतु ते त्या जमिनीतून पिकलेल्या उत्पन्नाचे दानधर्म करायचे. जगमित्रांमध्ये ईश्वर भक्तिमुळे अजिबात असक्तीभाव उरला नव्हता.संत जगमित्र नागा यांनी इ.स.1380 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला परळी वैजनाथ येथे समाधी घेतली.

त्यांच्या समाधीकाळावर अनेक संशोधकांचे एकमत आढळते. त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी अनेक भाविक आवर्जून जातात. जगमित्र नागा यांचे अभंग समजण्यासाठी सोपे असून जवळजवळ सर्वच अभंग हे आठ चरणाचे आढळतात. तसेच प्रत्येक दोन चरणाच्या शेवटी अंतयमक वापरलेले दिसते. तसेच त्यांच्या कविता ही समजण्यास सोप्या असून अत्यंत प्रसादिक आहेत. त्यांनी त्यांच्या अभंगामधून केलेले विठ्ठलाचे वर्णन सहज भक्तीभाव दर्शवते. त्यांचे फक्त बारा अभंग उपलब्ध असून त्यामध्ये विठ्ठलाविषयी तीन अभंग व विठ्ठल रुक्मिणी विषयीचे एकूण नऊ अभंग आहेत.

तसेच संत नामदेवांच्या श्री सकलसंतगाथेमध्ये त्यांच्याविषयीचे सात अभंग आहेत. संत नामदेवांनी त्यांच्या संतचरित्रे या सदरात संत जगमित्रांविषयी 126 चरणांचा प्रदीर्घ असा चरित्रविषयक अभंग लिहिलेला आहे. संत जगमित्र नागा यांचे अभंग कोणी लिहिले याचा संदर्भ सापडत नाही त्यावरून त्यांचे संख्येने अनेक अभंग असल्याचे सांगितले जाते परंतु काळाच्या पडद्याआड प्रत्यक्षात ते कोठेही सापडत नाहीत.

Leave a Comment