ओंकाराचे स्वरूप म्हणजे राम नाम, कर्ता म्हणजे राम, राम नाम समजून करावे,नामस्मरणाचे महत्व, असे महत्त्वाचे संदेश देणारे संत गोंदवलेकर महाराज ( Sant Gondavalekar Maharaj ) यांचा जन्म महाराष्ट्र संत भूमीवर बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 1845 मध्ये सूर्योदयाच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक या छोट्या गावात झाला होता.
त्यांचे मूळ नाव गणपतजी रावजी घुगरदरे ( कुलकर्णी) असे होते. गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यात पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी आणि भक्ती सात पिढ्या चालत आलेली होती. गोंदवलेकर महाराजांचा जन्म आई गीताबाई आणि वडील रावजी या दाम्पत्याच्या पोटी झाला . लहान वयातच देवभक्ती आणि त्यांच्यातील अलौकिक गुण इतरांना दिसत होते. त्यांना भगवत भजनाची खूप आवड होती. शिवाय ते हुशार होते.
अन्नदानाच्या कार्यात त्यांचा लहानपणापासूनच ओढा होता. महाराजांच्या आई गीताबाई यांच्या मते लहानपणापासूनच गोंदवलेकर महाराजांच्या चेहऱ्यावर एक आगळे वेगळे तेज दरवळत होते. त्यामुळे प्रत्येक माणसावर आणि भक्तांवर त्यांची चांगली छाप पडत असे. महाराज खेळण्यात आणि पोहण्यात फार पटाईत होते. घोड्यावर स्वार होण्याची कला त्यांना लहानपणापासूनच अवगत होती.
ते झाडावर चढण्यात आणि पळण्यात सुद्धा फार पटाईत आणि अग्रेसर होते. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत महाराजांनी भरपूर प्रवास केला.प्रवासामुळे सामाजिक अडचणी, तत्कालीन समाज जीवन, लोकांचा आनंद आणि दुःख हे सर्व उत्तमरीत्या आणि खूप जवळून त्यांनी पाहिले होते. गोंदवलेकर महाराजांना जेवणात जाडे भरडे अन्न, भाजी भाकरी, पिठले अशा प्रकारचे जेवण जास्त आवडत होते असे सांगण्यात येते. श्री गोंदवलेकर महाराजांना वाचनाची खूप आवड होती. त्यांना काव्य रचना आणि गायनाचीही आवड होती . तसेच महाराजांना अन्नदान करण्याची आवड होती. लहान मुलांची त्यांना विशेष आवड होती.
महाराजांना भजनाची नामस्मरणाची देवपूजा करण्याची आवड तर होतीच परंतु प्रापंचिक गोष्टींचा आणि जबाबदारीचा त्यांनी कधीच कंटाळा केला नाही किंवा टाळाटाळ केली नाही. त्यांना गरीब ,अशिक्षित आणि खेड्यातील लोक जास्त आवडत, तसेच त्यांना स्वतःलाही खेड्यात राहिला फार आवडायचे.
जसजसे महाराज मोठे होत होते तस तशी त्यांची आध्यात्मिक आवड वाढत होती.अखेर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आध्यात्मिक गुरुच्या शोधात घरातून पलायन केले. परंतु घरच्यांनी,नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी त्यांचा लवकरच शोध घेतल्यामुळे त्यांचा हा पहिला प्रयत्न फसला. पुढे मुंज झाल्यानंतर गोंदवलेकर महाराजांनी उपाध्यायंकडून सर्व विद्या काही काळातच आत्मसात केली. पुढे त्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी महाराजांचा विवाह करण्यात आला. परंतु त्यांच्या मनातील गुरु भेटीची तळमळ तशीच राहिली होती.
जन्मताच त्यांना अध्यात्माची ओढ असल्यामुळे अगदी लहान वयातच त्यांना आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव झालेली होती. ब्रह्म ज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पुढे अखेर वयाच्या 12 व्या वर्षी आईला थोडीशी पूर्व सूचना देऊन महाराजांनी एका रात्री घरातून प्रयाण केले आणि गुरु शोधासाठी भारत भ्रमण सुरू केले. इस 1858 साली त्यांनी जेव्हा गुरू शोधासाठी भारत भ्रमण सुरू केले होते त्यावेळी त्यांनी गृहत्याग केला होता तेव्हा गोंदवलेकर महाराजांच्या मार्गात हरिपूरच्या राधाबाई, मिरजेचे अण्णाबुवा, नाशिकचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, हुमनाबादचे माणिक प्रभू, काशी मधील तेलंग स्वामी, बंगालचे रामकृष्ण परमहंस अशा अनेक गुरूंच्या भेटी झाल्या.
तसेच समर्थ संप्रदायातले सतपुरुष श्रीराम कृष्ण यांनी महाराजांना येहेळ गावच्या श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे इस 1859 मध्ये येहेळ गाव इथल्या श्री तुकामाई यांच्याशी भेट घालून दिली. शेवटी नऊ महिन्यांच्या खडतर प्रवासानंतर त्यांना त्यांच्या गुरुकडून म्हणजे श्री तुकामाई कडून अनुग्रह प्राप्त झाला. पुढे इस 1860 मध्ये श्री गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार नेमिस आरण्याकडे प्रयाण केले. नेमिस अरण्य हे सत्य युगातील एक तीर्थक्षेत्र असून पृथ्वीतलावर हे सर्वात पहिले तीर्थक्षेत्र मानले जाते. इथे रोज 33 कोटी देवता आणि 88 हजार ऋषीमुनी यांचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.
इ.स. 1861 मध्ये नेमीस अरण्यामध्ये एका गुहेमध्ये महाराजांची श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याशी भेट झाली. सन 1863 मध्ये श्री गोंदवलेकर महाराज यांनी आयोध्या, काशी, वृंदावन, कलकत्ता या ठिकाणी तीर्थयात्रा केल्या . या भारत भ्रमंतीनंतर 1865 नंतर ते पुन्हा गोंदवले गावात परतले. परत आपल्या गावी परतल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. पुढे 1876 च्या काळाच्या दरम्यान जेव्हा गोंदवले गावात भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा महाराजांनी तेथे खूप जनसेवेचे काम केले. सामान्य लोकांची सेवा केली आणि भरपूर अन्नदान केले.
अन्नदान हे महाराजांच्या आयुष्याचं मुख्य सार होतं असे म्हटले जाते. श्री गोंदवलेकर महाराजांनी भारतभर केलेल्या प्रवासात लाखो लोक त्यांचे शिष्य बनले. श्री ब्रह्मानंद, श्री भाऊसाहेब केतकर, श्री आनंद सागर, श्री पांडुरंग बुवा असे इत्यादी त्यांचे मुख्य शिष्य बनवून राहिले. पुढे 1903 साली मासूरने आणि गोमेवाडी येथे श्रीरामांच्या मूर्तींची त्यांनी स्थापना केली. सोबतच गोंदवले, सोलापूर, जालना, बेलधडी, गिरवी आणि मांडवे इथेही त्यांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली. तसेच यावन या गावी त्यांनी दत्तमंदिर बांधले.
शेवटी श्री गोंदवलेकर महाराजांनी इस 1913 साली गोंदवले ( Gondavale) गावात असताना 21 डिसेंबर रोजी त्यांनी रामरायासमोर शेवटचे कीर्तन केले आणि 22 डिसेंबर 1913 मार्गशीर्ष कृष्णदशमीला शेके 1835 मध्ये श्री गोंदवलेकर महाराजांचे महानिर्वाण झाले. आजही श्री गोंदवलेकर महाराजांची अनेक भक्त समरस होऊन भक्ती करतात. अनेक लोक त्यांच्या नावाने अन्नदान करतात. अनेक जण महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रामाणिकपणे पालन करतात.