भगवान बाबा ( Sant Bhagwan Baba ) यांचे मूळ नाव आबाजी तुबाजी सानप असे होते. त्यांचा जन्म एका वंजारी कुटुंबात झाला होता. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सावरगाव घाट या गावी 29 जुलै 1896 साली त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. त्यांच्या घरातही नेहमीच विठ्ठल नामाचा जप केला जायचा. त्यांच्या गावात चौथीपर्यंत शाळा असल्यामुळे ते पुढील शिक्षणासाठी आपल्या गुरुजींच्या सांगण्यावरून लोणी, तालुका शिरूर जिल्हा बीड येथे आपल्या मामाच्या गावी पुढील शिक्षणासाठी गेले होते.
शिक्षण घेत असताना ते गुरे ढोरे राखणे व शेतीची कामे अशी मामाच्या घरची कामे करायची आणि त्यांना त्याची आवडही होती. त्यांचे आई-वडील धार्मिक असल्यामुळे त्यांना लवकरच अध्यात्माची आवड लागली. त्यामुळे ते नंतर नेहमीच संत संगतीत राहु लागले विठ्ठल नामात भगवान बाबा लिन झाल्यानंतर त्यांना एकदा विठ्ठल दर्शन घडले आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल चरणी अर्पण करण्याचे ठरवले. त्यांचे आई-वडील एकदा त्यांना घेऊन विजयादशमीच्या दिवशी दर्शनासाठी नारायण गडावर आले होते.
काही दिवस तेथे राहिल्यानंतर तेथेच त्यांनी माणिक बाबांचा अनुग्रह घेतला. पुढे त्यांची आध्यात्मिक प्रगती लवकरच चांगली झाली. माणिक बाबा हे त्यांचे गुरु सांगितले जातात आणि ते माणिक बाबांचे कायमचे उपासक झाले होते. पुढे त्यांची देवावरील श्रद्धा आणि भक्ती पाहून माणिक बाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा ठेवले. भगवान बाबांनी पुढे पंढरपूरच्या दिंडीत जाण्यास सुरुवात केली. तेथील दिघोळ गावचे प्रख्यात वारकरी गीते बाबा यांच्यासोबत ते सुरुवातीला पंढरपूरला गेले होते.
सहाव्या वर्षी पंढरीची पहिली वारी केली होती. पुढे अनेक वर्ष त्यांनी पंढरीची वारी केली आणि गुरु माणिक बाबा सोबत राहून अध्यात्मिक ज्ञान वाढवले.भगवान बाबा हे नेहमी कीर्तन प्रवचन भजन आणि दिंडी सोहळ्याचे कार्यक्रम करू लागले होते. विठ्ठल नामात एकमग्न होऊन ते नेहमी विठ्ठल नामस्मरण करायचे आणि नियमित पंढरपुर वारी करायचे. पुढे सन 2018 साली त्यांनी ठरवलं की आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्मासाठी घालवायचं. अध्यात्मिक शिक्षणासाठी ते काही काळ आलळंदीलाही राहिले.
ते सुरुवातीपासूनच नारायणगडाचे उपासक होते. नंतर ते आळंदीतून नारायण गडावर परतले. नारायण गड हे बीड जिल्ह्यातील फार मोठे तीर्थक्षेत्र आहे. माणिकबाबा नंतर ते नारायणगडाचे महंत सुद्धा झाले. नारायण गडावर त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रम केले.दिंडी,पालखीसह, भजन, कीर्तन,प्रवचन करत त्यांनी आपली आध्यात्मिक सेवा सुरू ठेवली होती. त्या ठिकाणी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी नारायण गड सोडला आणि ते धौम्य गडावर गेले.
धौम्यगड म्हणजे सध्याचा भगवानगड. तेथे जाऊन त्यांनी आपले संत कार्य सुरूच ठेवले आणि तेथे जाऊन त्यांनी भगवान गडाच्या निर्मितीसाठी लोकसहभागातून सुरुवात केली. 1958 पर्यंत त्यांनी गड बांधणीचे काम पूर्णही केले तसेच धौम्यगडाच्या पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता त्यांनी लोकसहभागातूनच बनवला. गडामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. गडाच्या बांधणी बरोबरच त्यांनी तेथे विठ्ठल भक्तीचाही गड बनवला. भगवान बाबांचा भक्तीमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांपासून बाबांची कीर्ती दूरवर पसरली आणि तेव्हापासूनच त्या धौम्यगडाला भगवानगड हे नाव पडले .
या गडाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. भगवान बाबा नाथषष्ठी निमित्त दरवर्षी पैठणची दिंडी करायचे. पुढे बंकट स्वामींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.तसेच त्यांनी संन्याशी धर्म सुद्धा स्वीकारला होता. भगवान बाबांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक,शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधने केली. त्यांनी नेहमी भटक्या विमुक्त जातीतील,अशिक्षित, वंचित, गरीब आणि सामान्य ग्रामीण लोकांना आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करून मोठे कार्य केल्याचे सांगितले जाते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती.ते अज्ञान, अंधश्रद्धा,वर्णभेद,जातीभेद, आणि धर्मभेद यावर प्रबोधन करायचे.
तेथे त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची सुरुवात केली होती. दरवर्षी गावोगावी हा वार्षिक सप्ताह भरवला जातो. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी भगवानगडावर भगवान विद्यालयाची शिलाही बसवली होती. वाड्या वस्त्या ,तांड्यावरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. भगवान बाबांनी खेडोपाडी हिंडून शिक्षणाचा प्रसारही केला होता. समाज शिक्षणातून सुधारणा झाली पाहिजे यासाठी त्यांनी अनेक शाळाही काढल्या. तसेच अनेक ठिकाणी वस्तीग्रह बांधली. त्यांनी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, पश्चिम महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्र फिरून कीर्तने व प्रवचने केली.
त्यावेळी त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा महाराष्ट्रातील मोठा वर्ग तयार झालेला होता. सध्याचा भगवान गड आणि आधीचा धौम्यगड या ठिकाणी त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रम करत पैठण,आळंदी, पंढरपूर पालखीची प्रथाही पाडली.भगवानगड हे वारकरी सांप्रदायाचे एक प्रवित्र स्थान मानलं जातं. सर्व जाती धर्मातील लोक या गडावर दर्शनासाठी येतात. भक्तांसाठी हे एक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. सन 1965 मध्ये भगवान बाबांची प्रकृती खालवत चालली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर तेथे दिनांक 18 जानेवारी 1965 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंतिम विनंतीवरून त्यांचे पार्थिव पुण्यातून भगवानगडावर आणले गेले. तेथेच त्यांचे समाधी स्थळ आहे. त्यानंतर भीमसिंह महाराज भगवानगडाच्या गादीवर बसले.
तेथून पुढे भगवानगडावर भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून भक्त येत असतात. अनेक ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजनही केले जाते आणि सामाजिक कार्यक्रमही केले जातात. लाखो भक्त या दिवशी भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी भगवानगडावर येतात. संत भगवान बाबा राजकारण आणि समाजकारण यांचे केंद्रबिंदू मानले जातात. काही वर्षांपूर्वी भगवान बाबा आणि भगवानगड हे नाव मराठवाड्यातील काही जिल्हे आणि नगर मधील काही तालुक्यांपुरतं मर्यादित होते. परंतु आता ते राजकारण आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू झालेले आहे.
ते वंजारी समाज आणि बहुजन समाजाचे शक्ती केंद्र आहे. सध्या येथे राजकीय माध्यमातून मोठ्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन केले जाते. केंद्रीय नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी या दसऱ्या मेळाव्याची सुरुवात 35 वर्षांपूर्वी केली होती. पुढे त्यांच्या वंशज मंत्री पंकजा मुंडे यांनी ती प्रथा पुढे चालू ठेवली. परंतु इस 2016 मध्ये भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी गडावर मेळावा घेण्यास नकार दर्शविल्याने पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी 2017 मध्ये भगवान बाबांचे जन्मस्थळी दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आणि तेथे भगवान बाबांचे मोठे स्मारकही उभारले.