आपल्या भारत देशात देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलेले आहे. म्हणूनच देवाचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्यांना देव नक्की भेटतो. त्याचप्रमाणे काही व्यक्तीही तशाच असतात , त्यापैकीच एक संत बाळूमामा ( Sant Balumama ) . त्यांना सर्व जाती धर्मातील लोक संत मानत होते. अशा भगवान शिव शंकरांचा अवतार मानला जाणाऱ्या आणि पंचमहाभूतांवर सत्ता मिळवलेल्या संत बाळूमामाचा जन्म कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कडी तालुक्यात अकोट गावामध्ये सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ (3 ऑक्टोबर 1892) रोजी अक्कोळ या खेडेगावात गरीब धनगर कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईचे नाव सत्यवा आरभावे आणि वडिलांचे नाव मायप्पा आरभावे असे होते.
बाळुमामाची आई लहानपणी त्यांचा प्रचंड लाड करायची लहानपणी बाळूमामा फार हट्टी होते. पुढे त्यांच्या वडिलांनी बाळूमामांना कामाचे वळण लागावे म्हणून बाळूमामांच्या वडिलांनी त्यांना जैन धर्मीय चंदुलाल शेठ या त्याच गावातील सावकाराच्या घरी कामाला ठेवले होते. शेठजींच्या शेळ्या मेंढ्या चरायला नेण्याचे काम बाळूमामा वर त्यांनी सोपवले. शेळ्या मेंढ्या चरायला नेल्यानंतर बाळूमामा तेथे बाभळीच्या काट्यांची गादी करून त्यावर झोपत असत. तसेच बाभळीच्या जाड काटेदार कुंपणालाही ते पाठ टेकून बसत असत. घरी आल्यानंतर शेठजींनी दिलेल्या एका कोपऱ्यातील जागेत ते निवांत झोपत होते आणि दिलेल्या एका फुटक्या थाळीत देईल ते खात होते.
जेवण झाल्यानंतर थाळी स्वतः स्वच्छ धुऊन ठेवत होते. एक दिवस बाळूमामा जेवत असताना त्यांच्या ताटात प्रकाश दिसत होता. हे चंदुलाल शेठ यांच्या आईने पाहिले असता तिने बाळूमामांच्या ताटात वाकून पाहिले असता तिला जैन मंदिराचे दर्शन झाले. याच घटनेपासून बाळूमामाच्या पुढे अनेक लीला सुरू झाल्या. बाळूमामा लहानपणी काय बोलायचे आणि काय करायचे हे सर्व सामान्य माणसांच्या आकलना पलीकडचे होते. म्हणून लोक त्यांना खुळा, वेडा असे म्हणायचे. ते मध्येच कधी उंच झाडाच्या फांदीवर जाऊन बसायचे तर कधी बाभळीच्या काटेरी पिंजऱ्यावर ध्यान करत बसायचे.
परंतु बाळूमामाच्या कार्याची प्रचिती आलेले लोक बाळूमामाच्या चरणी डोके ठेवत असत आणि इतर लोक त्यांना वेड्यात काढत असत. लोकांचं तर जाऊद्या परंतु त्यांचे वडील सुद्धा त्यांना वेडाच समजत होते. तसे त्यांना बाळूमामाच्या वागण्याचा राग येत होता कारण बाळूमामाचे वागणे इतर सामान्य मुलांप्रमाणे नव्हते. परंतु बाळूमामांच्या आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. त्यांची आई नेहमी त्यांच्या बाजूने बोलायची. बाळूमामाला दोन भाऊ आणि एक बहीण होती. परंतु बाळूमामांना कुटुंबात अजिबात रस नव्हता.
त्यांना लोकांच्या समस्या सोडवायला आणि अध्यात्माचा मार्ग दाखवायला आवडत असे. त्यांना संसारात काही रस वाटत नसे. त्यामुळे त्यांचे वडील मायप्पा यांना त्यांची फार काळजी वाटत असे. आपल्या मुलाने इतर मुलांसारखे वागावे अशी त्यांची इच्छा असे. परंतु बाळूमामा स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे. पुढे वडिलांना असे वाटले की त्यांचे जर लग्न केले तर ते आपोआप बरे होतील.असा विचार त्यांच्या घरच्या सर्वांच्या मनात येऊ लागला. त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुली सोबत बाळूमामाच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न लावून दिले. पुढे बाळूमामा आपल्या सासरी राहायला गेले. सासरवाडीच्या पंधरा मेंढ्यांची काळजी घेत त्यांनी आपल्या स्वतःच्याही काही मेंढ्या पाळल्या. आपल्या मेंढ्यांच्या कळपाची काळजी घेत असताना त्यांनी काही चमत्कारही केले.
मेंढ्या चारत असताना ऐन उन्हाळ्यात त्यांनी अनेक वेळा गरजूंना मदत केली. ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन जात असत. त्यांना कन्नड आणि मराठी या दोन भाषा उत्तम प्रकारे येत होत्या. खेड्यातील लोकांबरोबर ते खेडवळ भाषेत बोलत होते. माणसाने माणसासारखे वागावे अशी त्यांची शिकवण होती. महाराष्ट्र,कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये त्यांचे भक्त आपणास मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. बाळूमामांनी स्वतःच्या कुटुंबापेक्षा लोकांची सेवा करण्यावर जास्त भर दिला होता. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या अडचणी आणि दुःख घेऊन लोक येत असत.
परंतु बाळूमामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. आणि लहानपणापासूनच ते शाकाहारी होते. गारगोटीचे गोळे महाराज हे त्यांचे गुरु होते. ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे असे ते लोकांना सांगायचे. अतिशय साधेपणाचे जीवन जगणारे बाळूमामा फार उत्साही होते. तसेच त्यांना नेहमी टापटीप राहायला आवडायचे. डोक्यावर पटका, कमरेला धोतर, पिळदार मिशा आणि दाढी, हातात काठी, पायात कणखर चामडी चपला असा त्यांचा स्वच्छ कपड्यांमध्ये वेश असायचा. समाजाला त्यांनी आपले कुटुंब मानले न्होते म्हणूनच त्यांना जगद्गुरु असेही म्हटले जायचे.
सर्व इच्छा, आकांक्षा, आनंद, भीती,समाधान, शांती या सगळ्या भावना बाळूमामाच्या चरणी आहेत असे मानले जाते. पुढे लोक बाळूमामांची संत म्हणून पूजा करू लागले. एवढेच काय तर बाळूमामाच्या मेंढ्या सुद्धा पवित्र मानल्या जातात. बाळूमामाच्या कळपातील मेंढ्या मोठ्या प्रमाणात दूध देत असत अशी पूर्वीपासूनची मान्यता रूढ होती. एवढेच काय ज्या शेतात बाळूमामाच्या मेंढ्या बसत असायच्या तेथे चांगलं पीक येतं असा लोकांचा विश्वास असायचा. चाऱ्याअभावी बाळूमामा ची मेंढरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम तळ ठोकत असायची आणि त्या जागेला बाळूमामाचा तळ असे म्हटले जायचे.
शहराजवळ गेल्यानंतर असा जंगलात तळ ठोकणे साहजिक असायचे परंतु बाळूमामा आपल्या गावाजवळ असतानाही जंगलातच तळ ठोकायचे. बाळूमामा तळागाळातल्या गरीब गरजू लोकांच्या समस्या नेहमी सोडवत असायचे. त्यांच्या सहज वागण्यातून बोलण्यातून लीला घडत असायच्या. त्यांच्या हातून कळत नकळत घडलेल्या चमत्कारामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले होते. परंतु जे काही चमत्कार घडायचे त्या यशाचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही. श्री मुळे महाराजांना बाळूमामा आपले गुरु मानत त्याचवेळी बाळूमामाच्या अतर्क्य अवधूत वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लागली होती. बाळूमामांची गुरुपरंपरा श्री दत्त,श्री नृसिंह सरस्वती,स्वामीनारायण महाराज, श्री मौनी महाराज आणि श्री मुळे महाराज अशी होती.
तेथून पुढे ही गुरु शिष्याची जोडी सर्वत्र प्रख्यात आणि वंदनीय झाली. मात्र बाळूमामाचे सांसारिक जीवन संपुष्टात आलेले होते. तेव्हापासून बाळूमामा पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या भेटीला जाऊ लागले. अखंड नामस्मरण आणि राम कृष्ण हरी चा जप करत त्यांनी सर्व सामान्य लोकांमध्ये हाच मंत्र रुजवला. पुढे बाळूमामांनी वयाच्या 74 व्या वर्षी म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर ( Adamapur ) येथे समाधी घेतली. परंतु समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव आणि प्रत्येय देत असल्याच्या दंतकथा प्रचलित झाल्या आहेत. म्हणून येथे कायमच त्यांच्या भक्तांची गर्दी आपल्याला पहावयास मिळते.

आदमापुर हे दुसरे पंढरपूर झाले आहे असे अनेकांचे मत असते. या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा आणि आरती होते. नऊ वाजता नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान संध्याकाळची आरती झाल्यानंतर पुन्हा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय दर रविवारी आणि अमावस्येला नाचणीच्या आंबिलाचा प्रसाद दिला जातो. हे संत बाळूमामाचे समाधी मंदिर दक्षिणाभिमुख असून सुंदर,सुरेख,कोरीव दगडी बांधकाम केलेले आहे. येथे अनेक भक्त दर्शनासाठी जातात. तसेच येथे प्रशस्त सभा मंडप असून मंदिरात प्रसन्न बाळुमामाची मूर्ती बसवली आहे.