संत बगाजी | Sant Bagaji

संत बगाजी महाराज ( Sant Bagaji ) हे महाराष्ट्रातील विदर्भामध्ये देवगाव च्या बाजूला असलेले गाव तळेगाव दशासर या ठिकाणचे मूळचे राहणारे  होते. पुढे ते काही कारणास्तव महाराष्ट्रातील विदर्भामध्ये वरुड गावात राहण्यास आले होते. लोअर वर्धा नावाच्या धरणाकाठी असलेले हे गाव अप्रतिम नैसर्गिक असा नजारा असलेल्या गावी संत बगाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांचे कुटुंब हे अध्यात्मिक आवड असलेले परंतु एक सर्वसाधारण कुटुंब होते.

या गावी फार मोठे धरण झाल्यामुळे तेथे नवीन बगाजी  तीर्थक्षेत्र तयार झाले असून या ठिकाणी संत बगाजी महाराजांच्या मूर्ती मंदिरासह संत नामदेव महाराज समाधी मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, संत ज्ञानेश्वर पादुका स्थान, संत रामचंद्र महाराज यांचे पादुका स्थान या सर्वांचे दर्शन करण्यास मिळते. तसेच या ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर नायगाव येथे संत लखाजी महाराज मंदिर आहे. याच ठिकाणीसुद्धा संत बगाजी महाराजांचे एक छोटे अप्रतिम मंदिर आहे.

अनेक भक्त संत बगाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नायगावलाही जातात. संत बगाजी महाराज यांच्या नायगाव येथील मंदिरामध्ये बगाजी महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागे सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्तीही आहे.वरुड गावी संत बगाजी महाराज यांच्या दर्शनासाठी विदर्भातून तसेच महाराष्ट्रातून अनेक भक्त जात असतात. या गावी साडेतीनशे वर्षांपासून मोठी यात्रा भरते. बगाजी महाराजांच्या कालखंडापासूनच या यात्रेची प्रथा आहे. संत बगाजी महाराजांनी या यात्रेचे आयोजन संत एकनाथषष्ठी पासून सुरू केले होते. असे सांगितले जाते.

संत बगाजी महाराज हे संत एकनाथ महाराजांचे अशीम भक्त होते. ते दरवर्षी एकनाथ षष्ठीला वारीसाठी पैठणला जात होते.अध्यात्मिक वारसा लाभलेल्या पैठण शहरात त्यांना अनेक संतांची संगत लाभली. त्यांनी सर्व अध्यात्मिक धडे पैठणमधूनच घेतल्याचे सांगितले जाते. दरवर्षी विदर्भातून बगाजी महाराज एकनाथ षष्ठीला पैठणला मुक्कामी यायचे आणि तेथेच काही काळ रमायचे.

एकनाथ महाराजांच्या भक्तीत विलीन झालेल्या संत बगाजी महाराज यांना एक दिवस एकनाथ महाराजांनी दृष्टांत देऊन असे सांगितले की, तुम्ही आता दरवर्षी पैठणला येण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या हातातील हा झेंडा घेऊन अमरावती जिल्हा म्हणजे वऱ्हाड प्रांतातील वशिष्ठ तेरी या ठिकाणी जा आणि तेथेच धर्माचा प्रचार करत लोकांना संबोधन करा.त्यानंतर संत बगाजी महाराज एकनाथ महाराजांच्या दृष्टांतावरून तळेगाव वरून वरुड येथे राहण्यास आले आणि तेथे त्यांनी तो झेंडा रोवला. त्यांनी तेथे एकनाथषष्ठी पासून समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली.

संत बगाजी वरुड गावामध्ये आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे ही वार्ता पसरली. हळूहळू सर्व विदर्भात हे माहिती झाले. त्यानंतर त्यांच्याकडे वरुड गावी अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. वरुड गावात अध्यात्मिक कार्यक्रम होऊ लागले . गरीब,दलित, शेतकरी संत एकनाथ भक्त, आणि संत बगाजीचे भक्त मोठ्या संख्येने एकनाथ षष्ठीला वरुड गावात संत बगाजींचे दर्शन घेण्यासाठी येत असत. सर्वांना बगाजी महाराज मार्गदर्शन करायचे तसेच काही चमत्कारांतून भक्तांच्या अडचणी सोडवायचे.

पुढे हळूहळू त्यांची ख्याती वाढतच गेली.तेथील धरणाला आणि गावाला सुरुवातीला षष्ठी वरूड नावाने संबोधले जायचे.परंतु नंतर या गावाला आणि धरणाला बगाजी वरूड नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे त्या धरणाला संत बगाजी सागर असे नाव दिले गेले.संत बगाजी महाराज मंदिराला सध्या शासनाने क दर्जा प्राप्त केलेला आहे. तेथील आमदार आणि राजकीय लोकांनी या परिसराची आणि वरुड गावाची चांगल्या प्रकारे सुधारणा करून आता हे मंदिर मोठे आणि प्रशस्त करण्यात आलेले आहे.

या गावाचे काही वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेले आहे. गावाचा काही भाग धरणामध्ये गेलेला असल्यामुळे गावाचा विस्तार तसा कमी आहे. परंतु संत बगाजी महाराजांच्या चरित्रामुळे या गावाला प्रति पैठण संबोधले जाते. विदर्भातील वारकऱ्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आणि शहरातून अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपली सेवा येथे रुजू करतात.अशीच एक चमत्कार आणि आशीर्वाद कथा येथील गावकरी सांगतात कि,येथील लिफ्ट इरिगेशन साठी दिलेले शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज नागपूर हायकोर्टाच्या आदेशाने माफ झाले.

एवढे मोठे कर्ज माफ झालेली ही घटना विदर्भातील एकमेव समजली जाते. समाजामध्ये हा एक बगाजी महाराजांचा आशीर्वाद किंवा चमत्कार समजला जातो. विदर्भात एकूण 72 लिफ्ट एरिगेशन असून त्या आजही कर्ज मुक्त नाहीत. केवळ येथील लोकांच्या श्रद्धेपोटी हे घडल्याचे सांगितले जाते. येथील यात्रा धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला भरते. त्यावेळी मंगळूर वरून बगाजी महाराज वरुड ला येतात असा भाविकांचा समज आहे. ती यात्रा अष्टमीपर्यंत चालू राहते आणि नवमीला संपते.

येथे एक साक्षात झालेला चमत्कार सांगितला जातो की, येथे एक डॉक्टर शरद काळे होते. ते आर्वी तालुक्याचे  आमदार होते आणि पूर्वी ते व्यवसायाने डॉक्टर होते. एक पेशंट होता त्याला अल्सर झालेला होता. त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले होते की, याला नागपूरला हालवा, याचा आजार बळावलेला आहे. परंतु त्यावेळी एवढ्या अर्जंट नागपूरला पेशंटला घेऊन जाणे शक्य नव्हते. म्हणून डॉक्टर शरद काळे यांनी कंपाउंडरला सांगितले की, आता हे पेशंट मरणार आहे.

म्हणून डॉक्टर शरद काळे यांनी हा जाणारच आहे तर याचे डेड सर्टिफिकेट तयार करून त्याच्या घरी द्या असे सांगितले होते.  परंतु कंपाउंडर त्याच्या घरी गेला असता पेशंट सकाळी आपल्या घरी तोंड धुवत होता. मग कंपाउंडरने डॉक्टर शरद काळे यांना हा निरोप सांगितला. हे समजल्यावर डॉक्टर शरद काळे स्वतः त्या पेशंटच्या घरी गेले आणि त्या पेशंटला त्यांनी विचारले की तू रात्री अशी कोणती औषध घेतले की तु बरा झाला. त्या पेशंटने  उत्तर दिले की काही नाही मी फक्त बगाजी महाराजांचे तीर्थ घेतले.

हे ऐकून डॉक्टर चक्रावून गेले. त्यानंतर डॉक्टर शरद काळे हे आर्वी वरून वरुड ला येऊन बगाजी महाराज यांचे नित्यनेमाने दरवर्षी दर्शन घेत होते आणि तेथे प्रवचनही देत होते. अशा अनेक चमत्कार कथा पूर्वजांकडून येथे बगाजी महाराजांबद्दल सांगितल्या जातात.
 येथे आलेल्या भक्तांसाठी विशेष करून वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील लोकांसाठी हे अतिशय जवळचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र बनले आहे.

Leave a Comment