पायी दिंडी ( Payi Dindi ) म्हणजे अनेक वारकरी एकत्र येऊन एखाद्या इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवतेच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी विशिष्ट तिथिला होणाऱ्या उत्सवास पालख्या घेऊन देवाच्या नावाचा गजर करत, भजन-कीर्तन करत पायी मुक्काम-दरमुक्काम करत जातात, या लोकांच्या समूहाला पायी दिंडी असे म्हणतात.
यामध्ये टाळकरी, विणकरी, ढोलकीवादक,शिपाई,दिंडी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या वारकऱ्यांना दिलेल्या असतात. असा हा वारकऱ्यांचा समूह गळ्यात तुळशीची माळ,कपाळी टिळा, काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ वाजवत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत आषाढी एकादशीला पंढरपुरास, कार्तिकी एकादशीला आळंदीला तसेच इतर देवांच्या विशिष्ट तिथीला होणाऱ्या यात्रेला पालख्या घेऊन जातात या सोहळ्याला पायी दिंडी असे म्हणतात.
महाराष्ट्रात सर्वात मोठ्या संख्येने दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरास आणि कार्तिकी एकादशीला आळंदीला जातात. कारण पंढरपूरच्या विठ्ठलाला लोक वारकऱ्यांचा कैवारी समजतात. या दिंड्या वेगवेगळ्या भागातून निघून वेगवेगळ्या मार्गाने जात असतात,त्यामुळे आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र भक्तीमय झालेला असतो. जसे की आषाढी एकादशीला आळंदीवरून संत ज्ञानेश्वरांची पालखी पुणे – दिवे घाट – सासवड- जेजुरी- फलटण-वाखरी या गावांमधून पंढरपूरकडे जाते.
अशा दिंड्यांमधून अंदाजे तीन-चार लाख भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व दिंड्यांमधील वारकरी स्वतःबरोबर जास्त काळ टिकणारे खाण्याचे पदार्थ घेतात. तसेच अंथरून-पांघरून, छत्री,औषधे असे काही साहित्य त्यांच्याबरोबर असते. सर्वांचे हे साहित्य ठेवण्यासाठी व बरोबर घेऊन जाण्यासाठी प्रत्येक दिंडीने एखाद्या टेम्पो, ट्रॅक्टर सारख्या वाहनांची व्यवस्था केलेली असते. या दिंडी मधील वारकऱ्यांचा चहा नाष्टा तसेच जेवणाचीही व्यवस्था त्यांच्या मार्गातील गावकऱ्यांनी स्वखर्चाने केलेली असते.
काही ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था सुद्धा लोकांनी केलेली असते. एवढेच नव्हे तर अनेक सेवाभावी डॉक्टर दिंडीतील वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात. अनेक भाविक दिंडीतील वारकऱ्यांना छत्री, टोपी, उपरणे तसेच पॅकिंगचे काही खाद्य वाटप करतात. अशी ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. दिंडीतील वारकऱ्यांचा समूह अंदाजे रोज वीस-पंचवीस किलोमीटर अंतर पायी चालतो. त्यामध्ये अधून-मधून आपले सर्व सहकारी बरोबर आहेत का नाही हे तपासले जाते.
दिंडीतील वारकऱ्यांच्या मनी जात- धर्म, गरीब-श्रीमंत असा कुठलाच भेदभाव नसतो. वारी केल्याने भेदभाव व अहंकाराचा नाश होतो असा समज आहे. विविध दिंड्यांच्या मार्गात भजन कीर्तनासह मेंढ्यांचे रिंगण, उभे रिंगण, अश्वरिंगण असे रिंगण प्रकार होतात जसे की अश्वरिंगण इंदापूर गावात होते.पूर्वी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत एकनाथ,संत नामदेव, संत कबीर,संत वामनभाऊ महाराज इत्यादी संत विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांबरोबर जात असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे या मिरवणुकीला दिंडी म्हणत असत.कालानुरूप या दिंडीचे स्वरूप बदलत गेले. सध्याच्या काळात पंढरपुरास जाणाऱ्या विविध पालख्यांपैकी वरील संतांच्या पालख्या प्रमुख आणि मानाच्या पालख्या मानल्या जातात. त्यांना मानाच्या दिंड्या असेही म्हणतात.
साधारणपणे जून महिन्यामध्ये पावसाच्या सुरुवातीला पेरणी उरकली कि पेरलेले उगवून येईपर्यंत काय करायचे तर पंढरपूरच्या वारीला दिंडीत जायचे असे अनेक शेतकऱ्यांनी ठरवलेलेच असते . महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय आषाढी एकादशीची वारी समजली जाते. अशा अनेक प्रकारच्या वारीला विशिष्ट तिथीला महाराष्ट्रातून वारकरी जात असतात. जसे की कोल्हापूरच्या महालक्ष्मीची वारी,जोतिबाची वारी, खंडोबाची वारी इत्यादी संत महात्म्यांच्या समाधीस्थळाला विशिष्ट तिथीला लोक वारी करतात. काही लोक आता गाणगापूरची वारी सुद्धा करतात.
वारीचे प्रमुख दोन प्रकार असतात देवाची वारी आणि संतांची वारी. देवाची वारी म्हणजे आषाढीला विठ्ठलाची वारी,अंबाबाईची वारी, खंडोबाची वारी आणि संतांची वारी म्हणजे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत चोखामेळा, संत गोरोबा आदि संतांच्या दर्शनासाठी नित्यनियमाने दरवर्षी विशिष्ट तिथीला जाऊन दर्शन घेणे अशी वारीची परंपरा ही संतांच्या अगोदरपासून आहे. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा वारी करत होते.तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचे आई-वडील, आजी-आजोबा सुद्धा वारी करत होते. त्यानंतर हैबतबाबांनी आळंदीहून दिंडीची प्रथा पाडली.
दिंडीमध्ये पंढरपूरला जाऊन काय मिळवले जाते हे कीर्तनकार महाराजांनी संतांच्या अभंगातून सांगितले. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केल्याने बऱ्याच प्रकारच्या मिळकती मिळतात असे कीर्तनकार सांगतात. दिंडीत पंढरपूरला जाऊन आलिंगन दिल्याने अंतकरणास समाधान लाभते, तुकाराम महाराज म्हणतात” निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव-शिवा “ अशा बऱ्याच प्रकारे दर्शन घेऊन पुण्य मिळते.आलिंगन देता आले नाही तर महाराज म्हणतात फक्त ओटीपूजा करा, नित्यपूजा करा किंवा पाद्यपूजा करा,मुखदर्शन घ्या नाहीतर रावळाला एक उजवी प्रदक्षिणा घाला.
पुढे महाराज म्हणतात “ पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली तिनशेसाठ”. म्हणेजे फक्त देवाळाची पाठ पाहून सुद्धा तीनशे साठ तीर्थे घडतात.तेही नाही जमले तर रावळाचा कळस पहा. प्रमाण -“ तुका म्हणे मोक्ष देखिला रावळाचा कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा” एवढेच नाहीतर महाराज म्हणतात फक्त देवळाची पताका पहा. प्रमाण -“पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा” तेही नाही जमले तर फक्त पंढरपूर गावाला एक प्रदक्षिणा घाला, नाहीतर पंढरपुरात एक मुक्काम करा. अशे अनेक संतांनी त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून सांगितले आहे.
अशी ही महाराष्ट्रातील पायी दिंडीची परंपरा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.
👌👌लिहले आहे. वाचून खूप छान वाटले