मुंबईची मुंबादेवी | Mumbadevi

फार पूर्वी मच्छीमारांची वस्ती असलेले हे ठिकाण म्हणजे सध्याचे मुंबई शहर . मुंबई ही आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. सन 1661 मध्ये पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन चा विवाह ब्रिटिश राजपूत्र चार्ल्स ( दुसरा ) याच्याशी झाल्यामुळे पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट त्याला हुंडा म्हणून दिले होते . 1668 मध्ये त्याने ते बेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिले आणि तेव्हापासून मुंबईत ब्रिटिश राज सुरु झाले. आज आपण जी मुंबई पाहतो ती तशी नव्हती.

पूर्वी तेथे सात बेटे होती .जशी गरज भासेल तशी ती बेटे एकमेकांना जोडली गेली, काही ठिकाणी जमिनीवर भराव टाकला गेला आणि जमीन वाढत गेली . ब्रिटिश काळात मुंबईच्या मूळ स्वरूपात खूप बदल घडवून आणले गेले आजच्या घडीला मुंबई हे भारतातील अत्यंत आधुनिक असलेले शहर आहे. तसेच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील या मुंबई शहरात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. येथेच मुंबईच्या भुलेश्वर येथे मुंबादेवीचे मंदिर ( Mumbadevi ) असून येथे हजारो लोक दररोज देवीच्या दर्शनासाठी येतात. समुद्राची मुलगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवीला पुढे मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुंबईकर मुंबादेवीला फार मानतात. येथील रहस्य म्हणजे दक्षिण मुंबईत भुलेश्वर ( काळबादेवी ) परिसरात असलेल्या मुंबईच्या मुंबादेवीच्या दर्शनाने आणि कृपेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. धन आणि ऐश्वर्य देणाऱ्या मुंबा देवीच्या नावावरून या शहराला मुंबई असे नाव पडले आहे असे सांगितले जाते. तसेच अनेक जण या देवीला लक्ष्मी देवीचा अवतार मानतात. तसेच मुंबईकर प्रत्येक शुभ कार्याला देवीची आराधना करतात. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरून तयार झाले त्या मुंबादेवी चा इतिहास फार रंजक आहे.

मुंबादेवी मंदिर 1737 मध्ये बोरीबंदर या भागात होते होते. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे रेल्वे स्टेशन आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली भव्य इमारत आहे. पूर्वी त्याला व्हिक्टोरिया टर्मिनल ( VT station ) असे नाव होते . इंग्रजांनी मरीन लाईन्स पूर्व येथील मंदिराचे बाजारपेठेच्या परिसरात स्थलांतर केले होते. ज्यावेळी मंदिराचे स्थलांतर झाले त्यावेळी मंदिराजवळ तीन मोठे तलाव होते. पुढे मुंबईची लोकसंख्या वाढली, बाजारातील गर्दी,वर्दळ वाढली त्यामुळे मुंबईमध्ये जागेची टंचाई निर्माण झाली.ही टंचाई दूर करण्यासाठी तेथील ते तीन मोठे तलाव बुजून तेथे जमीन तयार करण्यात आली.

या जमिनीचा वापर मुंबई शहरासाठी झाला. मुंबादेवीच्या या मंदिराचा इतिहास जवळपास 400 वर्षांपूर्वीचा आहे. असे सांगितले जाते की, या मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळचे मुंबईचे असलेल्या मच्छीमारांनी केली. मुंबादेवी समुद्रापासून आणि नैसर्गिक संकटापासून मुंबईचे आणि भक्तांचे रक्षण करते असा विश्वास त्या मच्छीमारांना वाटत होता. बाजारपेठेत मंदिर स्थलांतर झाल्यानंतर बाजारातील व्यवसायिक आणि तेथे नियमित येणारे ग्राहक देवीचे नियमित दर्शन घेऊ लागले.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर व्यवसायामध्ये उन्नती होते आर्थिक लाभ होतो आणि दिवसभर धंद्यामध्ये काहीही अडचण येत नाही असा विश्वास तेथील मच्छीमार,ग्रामस्थ,बाजारी लोक आणि सर्वच मुंबईकर यांच्या मध्ये वाढला होता. अनेक जण तेथे जाऊन देवीला नवस करू लागले. तसेच इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवसपूर्तिसाठी लोक मुंबादेवीच्या दर्शनासाठी येऊ लागले. यातूनच मंदिरात येणाऱ्यांची रोजची गर्दी हळूहळू वाढू लागली होती. याच मुंबादेवीच्या अवतारा विषयी एक दंत कथा सांगितली जाते.

असे सांगितले जाते की, देवी पार्वती तिच्या मच्छीमार रुपात समर्पित आहे. महाकाली चे रूप धारण करण्यासाठी देवी पार्वतीला चिकाटी आणि एकाग्रता प्राप्त करावी लागली.त्यावेळी भगवान शिव शंकरांनी चिकाटी आणि एकाग्रतेने काम करणाऱ्या मच्छीमारांसारखे देवी पार्वतीला मच्छीमाराच्या रूपात पुनर्जन्म घेण्यास सांगितले होते. कोळ्यांच्या अंगी एकाग्रता आणि चिकाटी हे दोन्ही गुण असल्यामुळे देवीला कोळ्याच्या रूपात जाण्यासाठी महादेवाने आज्ञा केली होती. महादेवांच्या आज्ञेनुसार देवी पार्वती मच्छीमार स्त्री च्या रूपात अवतरल्यानंतर सध्याच्या मुंबादेवीच्या ठिकाणी तिने आश्रय घेतला होता.

देवी पार्वती ला तिच्या लहान वयात मत्स्यमार म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर काही कालावधीने तिला मुंबा म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छीमार व्यवसायातील लोकांमध्ये देवीने तिच्या चिकाटीने मन जिंकल्यानंतर काही दिवसांनी ती जेथून आली तिथे परत गेली. मग भगवान शिवशंकर मच्छीमाराच्या रूपात येऊन मुंबाशी लग्न केले. नंतर मुंबईचे मच्छीमार तिला तिथे कायमचे राहण्याची विनंती करू लागले. आणि तिच्या मच्छीमार व्यवसायातील समाजकार्यामुळे पुढे तीला लोक मुंबा आई म्हणून ओळखू लागले. तसेच पुढे तिला लोक मुंबादेवी म्हणू लागले. आणि ती मुंबईची ग्रामदेवता बनली. त्यावरूनच शहराला मुंबई नाव पडले.

पुढे मुंबादेवी मंदिराचा स्थलांतर करण्याचा निर्णय झाल्यानंतर पांडूशेठ नावाच्या व्यापाऱ्याने मुंबादेवीच्या नवीन मंदिरासाठी जमीन दिली होती. त्यामुळे पांडूशेठ आणि पांडूशेठ चे पूर्वज अनेक वर्ष मुंबादेवीच्या मंदिरात पुजारी म्हणून आणि मंदिराची देखभाल करण्याचे काम करत होते. मात्र पुढे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार मुंबादेवी मंदिराची देखभाल एका ट्रस्ट द्वारे सुरू झाली. सध्या मंदिराची देखभाल आणि उत्सवाचे सर्व कार्यक्रम मुंबादेवी ट्रस्ट मार्फत केले जाते.

याच ट्रस्टने मुंबादेवीच्या शेजारी अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. मुंबादेवी चे सध्याचे मंदिर फार सुंदर असून मुंबादेवीची मूर्ती रोज वेगवेगळ्या चांदी पासून बनवलेल्या वाहनावर बसवली जाते. जसे की सोमवारी नंदी, मंगळवार ला हत्ती,बुधवारी कोंबडा, गुरुवारी गरुड, शुक्रवारी हंस, शनिवारी हत्ती आणि रविवारी सिंह. मुंबादेवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात मात्र मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी असते. मंगळवारी देवीचे दर्शन घेणे लाभकारक असल्याचा विश्वास भक्तामध्ये आढळतो. मुंबईकरांमध्ये मुंबादेवी ही नवसाला पावणारी देवी आहे असा विश्वास आहे.

येथे येणारे अनेक भक्त स्वतःची आठवण म्हणून मंदिरामध्ये एक नाणे लाकडी पट्टीवर ठोकून बसवतात. अशी अनेक नाणी मंदिरामध्ये लाकडी पट्टीवर खिळ्याने ठोकलेली आढळतात. येथील या मुंबादेवीच्या मंदिरात देवीची पूजा विधी करण्यासाठी एकूण 16 पुजारी आहेत. दिवसातून सहा वेळा देवीची आरती केली जाते. मुंबादेवी ला रोज भात,भाजी- पोळी आणि मिठाईचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. संध्याकाळच्या आरतीनंतर पुजाऱ्यांच्या देखरेखित मंदिराची साफसफाई करून मंदिर बंद केले जाते.

दररोज पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात.मंदिराच्या कळसावर एक झेंडा असतो तो दर महिन्याला बदलला जातो. मुंबा आणि आई या शब्दांमधून मुंबई या शब्दाचा जन्म झाला. पुढे इंग्रजांच्या काळात मुंबईला बम्बई आणि बॉम्बे म्हणून ओळखू लागले. पुढे इंग्रज गेल्यानंतर सुद्धा शहराला जुन्या नावाचीच ओळख राहिली. शिवसेनेच्या सत्ता काळात Bombay चे मुंबई असे नामकरण झाले आणि जगाच्या नकाशात मुंबई हे जुने नाव परत उदयास आले. या कार्यात त्या वेळचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

मुंबादेवीला जाण्यासाठी मुंबईमध्ये मुंबई चर्चगेट स्टेशन आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल ही सर्वात जवळची रेल्वे स्टेशन आहेत. तसेच मुंबईच्या जवळच्या बऱ्याच ठिकाणावरून येण्यासाठी येथे टॅक्सी मिळतात. मुंबई तसेच कोकणासह इतरही अनेक भागातून मुंबादेवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात. मरीन लाईन स्टेशन पासून हे मंदिर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. दादर स्टेशन पासून सुद्धा येथे येण्यासाठी सिटी बस आहेत. मुंबईला आल्यावर या मंदिराला आवश्यक भेट द्या.

Leave a Comment