कार्तिकी एकादशी | Kartiki Ekadashi

सर्वसाधारण वर्षभरात 21 एकादशी येतात परंतु आषाढी आणि कार्तिकी ( Kartiki Ekadashi )या एकादशींना आपल्याकडे अतिशय महत्त्वाचे मानले जाते .आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि कार्तिकी एकादशीला जागे होऊन परत विश्वाच्या पालनपोषणाच्या कार्याचा स्वीकार करतात असे मानले जाते. कार्तिकी एकादशी हा पंढरीच्या विठ्ठलाचा उपवास करण्याचा आणि स्मरण करण्याचा मोठा दिवस मानला जातो. मोठी एकादशी म्हणून मानल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीला वैष्णव भक्त व वारकरी एक दिवसीय उपवास व्रत करतात.हा दिवस चातुर्मास व्रताचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो.

या कार्तिक शुद्ध एकादशीला बोधिनी एकादशी, प्रबोधिनी एकादशी तसेच देवोत्थनी किंवा देव उठी एकादशी असेही म्हणतात. श्री विष्णू यांना तुळस फार प्रिय आहे म्हणून तुळशीला हरिप्रिया म्हणून ओळखले जाते. तुळशी शिवाय केलेली विष्णूची पूजा ही व्यर्थ पूजा असते असा भक्तांचा विश्वास आहे आणि तसा उल्लेख पद्मपुराणात केलेला आढळतो. जेव्हा समुद्रमंथनातून अमृत तयार झाले तेव्हा त्यातील अमृताचा एक थेंब जमिनीवर पडला आणि त्यातून तुळस वृक्षाची निर्मिती झाली असे म्हटले जाते. म्हणून विष्णू पूजेला तुळशीला विशेष महत्त्व आहे. याच दिवसापासून दिवाळीनंतर तुळशी विवाहाची सुरुवात होते आणि कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते , त्यानंतर लग्न सराईचे मुहूर्त सुरू होतात.

भगवान पंढरीनाथ पांडुरंग स्वतःच्या मनाचे हितगुज नामदेव महाराजांना सांगतात की आषाढी कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका. मला भक्त “पतीत पावन” असे म्हणतात परंतु हे नाव तुमच्यामुळेच प्राप्त झालेले आहे. आषाढी वारीला आलेले वारकरी जेव्हा पंढरपूरहून आपापल्या गावी जातात तेव्हा तुम्ही कार्तिकीला मला कधी भेटायला येणार याची हुरहुर मला लागलेली असते. भगवंत पांडुरंग नामदेव महाराजांना म्हणतात या त्रिभुवनामध्ये तुम्हा भक्तांशिवाय मला कोण आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरपूर मध्ये मोठी यात्रा भरते. तसेच आळंदी मध्ये ही यात्रा भरते या एकादशीला उत्थान एकादशी अशी ही म्हणतात.

या दिवशी देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान पांडुरंग उठतात. भगवंताला उठवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमे पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भक्तगण प्रेमाने काकड आरती गात असतात. या कार्तिकी एकादशी पासून तुलसी महाराणी चा विवाह भगवान शालीग्राम यांच्याशी म्हणजेच श्री विष्णूशी लावला जातो. याच एकादशीला भीष्म पितामह सरपंजरी पडले होते म्हणून यापुढील पाच दिवस यांना भीष्म पंचक असे सुद्धा म्हटले जाते. भगवंताला प्रिय असलेल्या या कार्तिक महिन्याच्या एकादशी चा महिमा आणि व्रत विधी स्कंदपुराण मधील ब्रह्मदेव आणि नारदमुनी यांच्या संवादामध्ये झालेला आपणास आढळतो.

एकदा ब्रह्मदेव देवर्षी नारद मुनी यांना म्हणाले की, हे नारदा सर्वांना पुण्य आणि आनंदाने मोक्ष प्रदान करणाऱ्या या उत्थान एकादशी विषयी मी तुम्हाला सांगतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी आणि या एकादशीच्या पालनाने मिळणारे पुण्य हे 1000 अश्वमेध यज्ञ किंवा शंभर राजश्री यज्ञ याच्यामुळे मिळणारे यज्ञ यांपेक्षा अधिक पटीने आहे. हे ऐकल्यानंतर नारद मुनी म्हणाले हे पिताश्री या कार्तिकी एकादशीला एक वेळ खाल्ल्याने किंवा पूर्ण वेळ उपवास केल्याने जे काही पुण्य मिळते त्याविषयी मला तुम्ही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले जो या एकादशीला एकाच वेळी खातो त्याचे एका जन्माची पापे नष्ट होतात. तसेच जो रस्साहारावरती म्हणजे फक्त दूध,ताक, फळांचा रस घेऊन उपवास करतो त्याच्या दोन जन्माची पापे नष्ट होतात. परंतु जो पूर्ण वेळ उपवास करतो त्याच्या सात जन्मांची पापे नष्ट होतात.

नारद मुनींना ते म्हणाले उत्थान एकादशीच्या पालनामुळे मंदार पर्वत सारख्या पापराशी देखील या व्रताच्या पालनाने नष्ट होतात.या दिवशी जो कोणी रात्रीचे जागरण करतो त्याच्या भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील पिढ्यातील सर्वांना वैकुंठ प्राप्ती होते. पुढे ब्रह्मदेव सांगतात की, हे नारदा जो कोणी या कार्तिक महिन्यामध्ये श्री विष्णूची पूजा तसेच एकादशी व्रताचे पालन करत नाही त्याच्या सगळ्या पुण्याचा क्षय होतो. या कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी भगवान विष्णूंच्या गुणांचे, लीलांचे श्रवण करतो त्याला 100 गायी दान केल्याचे पुण्य मिळते.

तेव्हा नारद मुनी ब्रह्मदेवांना म्हणतात की, हे पिताश्री कृपया ही एकादशी कशी करावी याविषयी मला आपण सांगावे. तेव्हा पितामह ब्रह्मदेव म्हणाले प्रातःकाली ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठून स्नान करावे आणि भगवान पांडुरंगाची उपासना करावी. या एकादशीला मी अन्नग्रहण करणार नाही केवळ द्वादशीलाच अन्नग्रहण करेल अशी प्रार्थना करावी. तसेच हे पांडुरंगा आपण माझ्यावर या वृत्तावर रक्षण करावे या प्रकारे भगवंताला प्रार्थना करावी. दिवसभर भक्ती भावाने या व्रताचे पालन करावे. रात्री भगवान विष्णू जवळ बसून जागरण करावं.जागरण करताना भजन करावं,कीर्तन करावं, श्रीमद् भागवताचे वाचन करावं, भागवत लीलांचे श्रवण करावे.

या एकादशीच्या दिवशी जो कोणी भगवान पांडुरंगाला कदंबाची फुले अर्पण करतो त्याला कधीच यमलोक भोगावे लागत नाही. जो भगवान पांडुरंगाच्या गरुड ध्वजाला गुलाबाची फुले वाहतो त्याला निश्चित मुक्ती प्राप्त होते. जो कोणी बकुळाची आणि अशोकाची फुले भगवंताला अर्पण करतो त्याला सूर्य चंद्र असेपर्यंत दुःख भोगावे लागत नाही. शमी वृक्षाच्या पानांनी जो कोणी भगवंताची पूजा करतो त्याला भगवंत कधीही दंड देत नाही. जो पिवळ्या रंगाच्या केतकी फुलांनी भगवान विष्णूची पूजा करतो त्याच्या कोट्यावधी जन्मामध्ये झालेली सगळी पापे नष्ट होतात.तसेच जो कोणी सहस्त्र दलनाचे कमळ भगवान जगन्नाथाला अर्पण करतो त्याला श्वेत दीप नावाच्या धामाची प्राप्ती होते. या प्रकारे या एकादशीच्या दिवशी भगवंताच्या आवडीची फुले भगवंताला अर्पण करून तसेच भगवंताला प्रार्थना करून आणि अधिकाधिक हरी नामाचा जप करून अनेक भक्तगण लाभ घेतात.

कार्तिकी एकादशीला आवळी भोजनाची सुद्धा एक प्रथा आहे. या दिवशी अनेक जण आवळ्याच्या झाडाच्या बागेत फिरत फिरत जातात आणि आवळी झाडाची पूजा अर्चा करतात. तसेच दुपारी तेथे स्वयंपाक करून एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतात. लहान मुले तेथे झोका खेळतात तर काही मुले सागर गोटे खेळतात. आणि संध्याकाळी सर्वजण आपल्या घरी परततात. वैष्णव भक्तांसाठी विशेष मानल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीला पंढरपूर मध्ये मोठा सोहळा भरतो. विठ्ठल नामाचा जप करत ध्यानीमनी पांडुरंगाचे नामस्मरण करून विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात.

या दिवशी पंढरपूर मध्ये भक्तांच्या सोयीसाठी विठ्ठल देवस्थान ट्रस्ट आणि पंढरपूर पंचायत सज्ज झालेली असते.कार्तिकी एकादशीला पंढरपूर सजावटीने आणि भक्तांच्या महापुराने दुम दुमलेले असते. चातुर्मासाची सांगता म्हणून या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर वैष्णव भक्त आणि वारकरी संप्रदायातील सर्व लोक उत्पत्ती एकादशीला आळंदी यात्रेची वाट बघत असतात.

Leave a Comment