पुणे मुंबई शहरांच्या मध्यभागी असलेल्या आणि निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरा पासून दहा किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात कार्ला गाव आहे आणि या कार्ला गावच्या डोंगरावर एकवीरा देवीचे ( Ekvira Devi ) मंदिर आहे. हे कार्ला गाव कार्ला लेण्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भारतातील या सर्वात प्राचीन लेण्या समजल्या जातात. या बौद्ध लेण्या ख्रिस्त काळापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून भारत सरकारकडून या लेण्या घोषित केल्या गेल्या आहेत. येथे एकूण 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह तर इतर विहार आहेत. इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पूर्व पाचवे शतक मध्ये या लेण्यांची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची तुळजा भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. एकविरा देवी ही रेणुका मातेचे एक दुसरे रूप आहे.
अमरत्व मिळवलेले ऋषी परशुराम यांची आई म्हणजे रेणुका माता आणि एकविरा देवी हे भगवान शिवशंकरांनी रेणुका मातेला हे दिलेले दुसरे नाव सांगितले जाते. कार्ल्याच्या या डोंगरावरील आई एकवीरा देवीचे मंदिर प्राचीन काळातील दोन हजार वर्षांपूर्वीचे असून येथील मोठमोठ्या गुफासुद्धा ऐतिहासिक आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोंगरावर 100 पायऱ्या आहेत. येथे डोंगरावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोरीचा मार्ग नाही.
मंदिराच्या पायथ्याशी पार्किंगची सुविधा असून प्रत्येक गाडीला येथे पार्किंग चार्ज आकारला जातो. डोंगराच्या पायथ्याला छोटी छोटी अनेक दुकाने आहेत तेथे आपल्याला देवीच्या पूजेस पूजा साहित्यासह बरीच खरेदी करता येते. तसेच येथे लेणी चा इतिहास असल्यामुळे लोणावळ्याला पर्यटनासाठी येणारे सर्व पर्यटक या ठिकाणी येतात. येथे हे सगळं पाहण्यासाठी रम्य आणि अद्भुत आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई पासून 100 किमी अंतरावर असलेल्या रम्य लोणावळा ठिकाणानजदीकच एकवीरा देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर येथील गुफांच्याही अगोदरपासून आहे अशी त्या मंदिराला मान्यता आहे.

तसेच मंदिराच्या समोर सभामंडप, वर्षा मंडप आणि गोपूर अशी बांधकामे भक्तांच्या सुविधांसाठी पूर्वीपासूनच आहेत.या परिसरातील आगरी,कोळी, देवज्ञ ब्राह्मण, कुणबी, सीकेपी तसेच सर्व जाती धर्मातील लोकांची एकवीरा देवी वर भयंकर श्रद्धा आहे. देवीच्या आश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, आणि शारदीय नवरात्र अश्या वर्षातून भरल्या जाणाऱ्या जत्रेला आगरी कोळी समाजातील लोक मोठ्या श्रद्धेने यात्रेचे काम करताना दिसतात. तसेच चैत्र नवरात्र उत्सवात भाविक मोठ्या संख्येने येथे येतात व देवीची मनोभावे पूजा पठण करतात.
एकवीरा देवी या डोंगरावर आल्याची एक कथाही सांगितली जाते. प्राचीन काळामध्ये महाभारतातील पांडवांना कौरवांनी वनवास दिला होता त्यावेळी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळामध्ये पांडव कार्ल्याच्या डोंगरावर आले होते. त्यावेळी रात्री त्यांना दृष्टांत झाला आणि एकवीरा देवीने दर्शन दिले होते. त्यावेळी पांडवांना देवीने असे विचारले की तुम्ही एका रात्रीत माझे मंदिर बांधू शकता का? ते तर पांडव होते! त्यावेळी त्यांनी देवीच्या सांगण्यावरून एका रात्रीत एकविरा देवीचे मंदिर तयार केले होते.
त्यावेळी देवी आनंदीत होऊन देवीने पांडवांना वर दिला होता की, तुमचा जो एक वर्षाचा अज्ञातवासाचा काळ आहे त्यामध्ये तुम्ही कोणालाही ओळखू येणार नाहीत, समजणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तीर्थाटणे करू शकता.आणि तसंच झालं त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना कोणीही ओळखू शकले नाही. अनेक थोर व्यक्तींनी देवीच्या या मंदिराची देखभाल केल्याचे पुरावे आढळतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या काळापासून या मंदिराची देखभाल घेतली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
आई एकवीरा देवीचे महात्म्य राजे शिवाजी आणि राजे संभाजी यांनीही सांगितलेले आपण इतिहासात पाहतो. एकवीरा देवीचे मनापासून दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. या मंदिराजवळच अनेक छोटी छोटी देवांची मंदिरे आहेत. त्यातील एक शीतला देवीचे मंदिर भक्तांसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. शीतला देवीचे मनोभावे दर्शन घेतल्याने घरातील सर्वांच्या आरोग्य सुधारते असा भक्तांचा विश्वास आहे. तसेच येथे एक जोगेश्वरी मातेचे मंदिरही आहे तेथे अनेक भाविक जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतात. येथील शीतला देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या भरपूर असल्याचे आढळते. शितलादेवी आरोग्यासाठीच्या मनोकामना पूर्ण करते असा अनेक भक्तांचा विश्वास आहे.
चैत्र,आश्विन महिन्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या देवीच्या यात्रेला लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. आजूबाजूच्या परिसरातील देवीच्या भक्तांबरोबरच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून दर्शनासाठी भाविक येतात. आगरी आणि कोळी समाजाच्या लोकांची ही कुलदेवी समजली जाते म्हणून आगरी आणि कोळी समाजातील लोक लग्न झाल्यानंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय संसार थाटत नाहीत. तसेच या समाजातील सर्वच लोक वर्षातून एकदा आई एकविरा देवी आणि जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही.तसेच एकवीरा देवीच्या होमात नारळ टाकून इच्छा व्यक्त केल्याने त्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे. काही लोक देवीने वध केलेल्या राक्षसांना शांत करण्यासाठी या ठिकाणी कोंबड, बकरे कापतात.
महाराष्ट्रातच नव्हे तर नेपाळमध्येही एकवीरा देवीचा महिमा फार मोठा आहे. त्यामुळे एकविरा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. नवरात्री उत्सवाला येथे फार मोठी यात्रा भरते. वेहेरगाव कार्ला नावाने प्रसिद्ध असलेला हा एकविरा देवीचा गड यात्रेच्या वेळी नऊ दिवस विजेच्या दिव्यांनी लख्ख प्रकाशमय झालेला असतो. या मंदिरात एकवीरा देवी आणि जोगेश्वरी माता अशा दोन मूर्ती असून भक्त यांना ननंद भावजय अशा नात्याने ओळखतात.
काळभैरवनाथाची बायको जोगेश्वरी तर एकविरा आईचे भाऊ काळभैरवनाथ असं हे नातं आहे. या मंदिरात नित्यनेमाने पूजा पठण आणि आरती अभिषेक केले जाते. तसेच पौर्णिमेला आणि अमावस्याला आदल्या दिवशी देवीला पंचामृत स्नान घालून अभिषेक केला जातो. हे मंदिर भक्तांसाठी पहाटे पाच ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. एकवीरा देवीच्या मूळ मूर्तीची पहाटे साडेपाच वाजता काकड आरती केली जाते तसेच साडेसहा वाजता देवीचा अभिषेक केला जातो.
या ठिकाणी भक्तांच्या निवासासाठी धर्मशाळा आणि मुबलक पाणी उपलब्ध केलेले आहे. गडावर जाणाऱ्या पायऱ्यांना लोखंडी रॅलीन केलेले आहे. तसेच गडावर विजेची सोय आहे. या सर्व सुविधांमुळे पुणे मुंबई सह महाराष्ट्रातून अनेक भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात. तसेच येथे जाण्यासाठी हे ठिकाण पुणे मुंबई मध्यवर्ती असल्यामुळे आणि प्रशस्त रस्ते असल्यामुळे अनेक सुविधा आहेत. एसटी बसेस,खाजगी वाहने आणि रेल्वे मार्गानेही येथे जाता येते.
छान