विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र धोम्यगड म्हणजेच भगवान गडाचे चौथे मठाधिपती, महंत, न्यायाचार्य ह. भ. प.डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज (Dr Namdev Shastri Sanap) वारकरी संप्रदायाममधील प्रख्यात आणि प्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार तसेच ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत.
या गडावर जनार्दन स्वामी,भगवान बाबा आणि महंत भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत. भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर मठाधीपती म्हणून नियुक्त झालेले ह. भ. प. नामदेव शास्त्री महाराज यांचा जन्म वंजारी समाजाच्या कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच अध्यात्मिक वळण लागावे म्हणून त्यांना त्यांच्या घरच्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी आळंदी मध्ये वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे घातले. पुढे त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या न्याय शास्त्राचे शिक्षण मुंबईमधील आनंदवन आश्रम कांदिवली येथे श्री 1008 स्वामी काशीका नंदगिरीजी महाराज द्वादश दर्शनाचार्य येथे पूर्ण केले.
गुरुकुल पद्धतीप्रमाणे एकूण नऊ वर्षात शिक्षण पूर्ण करून त्यांनी वाराणसी विद्यापीठातून न्यायाचार्य ही पदवी मिळवली. त्याचबरोबर नामदेव शास्त्री यांनी पुणे विद्यापीठातून मराठी भाषेतून एम ए चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी मराठवाडा विद्यापीठामधून पीएचडी चा अभ्यासक्रम पूर्ण करून पीएचडी पदवी मिळवली आहे. भक्तीचा गड असलेल्या भगवान गडाचे ते सध्याचे महंत आहेत. भगवान गडाचा जास्तीत जास्त जीर्णोद्धार महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांच्या कार्य काळामध्ये झाला. ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज अजूनही ज्ञानेश्वरी आणि संस्कृत भाषेचे अध्ययन व अध्यापन करून ज्ञान मिळवत आहेत.
त्यांचा पारंपरिक आणि आधुनिकतेचा अभ्यास मोठा असल्यामुळे ते चांगल्या प्रकारचे लेखक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि समाजसेवक आहेत. महंत नामदेव शास्त्री यांनी ज्ञानेश्वरी विशेष चिंतन, ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन, ज्ञानेश्वरी पराग परामर्श, आणि हरिपाठ मंथन यांसारखे मोठमोठे चिंतन ग्रंथ अभ्यासले आहेत. त्यांच्या कीर्तनातील काही मार्मिक मोलाचे उपदेश अनेक भाविकांना पटतात. ज्ञानेश्वरीतील संत ज्ञानेश्वरांचे उपदेश जनसामान्यांना समजून सांगणारे महंत शास्त्रीजी यांचे काही उपदेश विशेष ठरतात.
डॉ. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री त्यांच्या प्रवचनात आणि कीर्तनात प्रयत्न म्हणजे देव आणि कर्म म्हणजे पूजा, ज्या संतांना पूर्वीच्या काळात कुठल्याही विद्यापीठाचे शिक्षण नसताना तसेच कोणतीच विश्वविद्यालये नसताना शब्दाचे वैभव मिळाले आहे ते ब्रह्मक कृपादृष्टी आहेत असे नामदेव शास्त्री सांगतात. कृष्णाने अर्जुनाचा उद्धार ज्ञानापेक्षा दृष्टीने जास्त केला आहे, आनंद झाल्यानंतर शिष्याने गुरुला सांगावे आणि मुलाने प्रथम आईला सांगावे. असे अनेक ज्ञानेश्वरीतील आणि संत महात्म्यांचे विचार समाजापर्यंत उदाहरणासहित ते पोहोचवतात. ज्ञानदेवाच्या जीवनाचे सार सांगताना ते म्हणतात जगात लोपलेले ज्ञान परत मिळवून ज्ञानाला
जीवन देण्यासाठी त्यांचा अवतार आहे, प्रपंचाची व्याख्या ते विस्तार असे सांगतात. लग्न जरी केले नाही तरी काहीतरी प्रगती करत राहणे म्हणजे प्रपंच असे महाराज सांगतात. नामदेव शास्त्री महाराजांच्या मते जे कळतं ते विज्ञान आणि ज्याची अनुभूती येते ते ज्ञान असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जाणीव, तर्क आणि विचार हे हत्यार आहेत तसेच या तिन्ही गोष्टी जिथे पोहोचत नाहीत ते ज्ञान आहे असे महाराज सांगतात. उपाशी राहा परंतु हलकट माणसाचे जेवन करू नका. पापी माणसाचे जेवण करू नका व चुकून जेवले तर ओकून टाका. डॉ.महंत ज्ञानाचार्य नामदेव शास्त्री सानप महाराज असे अनेक संतांचे अनमोल विचार भक्तांना समजावून सांगतात.
भगवान बाबा यांच्यानंतर भीमसिंह महाराज आणि त्यानंतर नामदेव शास्त्री महाराज अशी त्यांची गुरु शिष्य परंपरा आहे. मठाधिपती या पदावर नामदेव शास्त्री महाराज बसल्यानंतर भगवानगडाच्या विकासासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांच्या काळात साठ फूट उंचीचे गडाचे महाद्वार, भव्य दिव्य सभामंडप, प्रशस्त वाचनालय, निसर्गरम्य भक्तनिवास, ध्यान धारणा केंद्र, जॉगिंग आणि उद्यान, भगवान बाबांच्या वापरात असलेल्या वस्तूंचे संग्रहालय, महत्त्वाच्या लोकांना दर्शनाला येण्या साठी हेलिपॅड, गडाच्या पायथ्याशी इंग्लिश मीडियम शाळा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा मार्फत वीज निर्मिती करून गडावर विजेची सुविधा अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या.तसेच गडाच्या विकासासाठी वनविभागाच्या अधीन असलेली जमिन मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याच प्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आखाड्यात भगवानगडाचा समावेश होण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले.
नामदेव शास्त्री यांनी मठादीपती झाल्यानंतर भगवान गडाच्या विकासासाठी स्वयंपाक आणि महाप्रसाद गृहाची निर्मिती करून पारायण व कीर्तन मंडप, संत विद्यापीठ, टाळ मृदुंगासह प्रवचन कीर्तन प्रशिक्षण सुरू केले. तसेच सर्व धर्म समभाव भगवान गडाचा विस्तार राज्यभर करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाच्या काही तीर्थस्थळी भगवानगडाच्या धर्मशाळा बांधण्यात आल्या आहेत.
तसेच औरंगाबाद मध्ये ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. श्री नामदेव शास्त्री जी महाराज यांनी भगवान गडावर आपल्या कारकिर्दीत अनेक सुधारणा केल्या असून भगवान गडावरील सध्या ज्ञानेश्वरी मंदिरासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशस्त बांधकाम सुरू आहे. महाराजांच्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्यातील अनेक गाव आणि शहरांमधील लोकांच्या निधीतून या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या या भगवानगडावर सर्व जाती धर्मातील लोक भगवान बाबांच्या दर्शनासाठी येतात. येथे विजयादशमी, शुद्ध एकादशी उत्सव, पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम मठाधिपती डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात.
असे सांगितले जाते की ह.भ. प.नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 30 कोटी रुपयांची विकास कामे येथे करण्यात आली आहेत. नामदेव शास्त्री महाराज यांची प्रवचने कीर्तने आणि ज्ञानेश्वरी पाठ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगवानगडाच्या विकास कामांसाठी अजूनही कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होत आहे.