देव मामलेदार महाराज | Dev Mamledar

खानदेश मधील पूर्वीच्या बागलान प्रांतातलं महत्त्वाचं शहर म्हणजे आत्ताचे सटाणा. या सटाणा शहरात कोणी साधुसंत नव्हे तर एका शासकीय अधिकाऱ्याचे  म्हणजेच  देव मामलेदार ( Dev Mamledar ) श्री यशवंत महाराज यांचे आराम नदीच्या किनारी मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार ओलांडून आत मध्ये गेले की एक मोठा सभा मंडप आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये  देव मामलेदार श्री यशवंत महाराज यांची खुर्चीवर बसलेली संगमरवरी दगडाची सुबक मूर्ती दिसते. सकाळी पाच वाजल्यापासून मंदिर खुले असते. पहाटे काकड आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा सकाळी सामूहिक आरती होते.दिवस उगवला की सटाणा वासियांची पावले दर्शनासाठी मंदिराकडे वळतात.

देव मामलेदार महाराज हे मूळचे पंढरपूर जिल्ह्यातील करम भोसे गावचे होते.त्यांचे मूळ नाव श्री यशवंत महादेव भोसेकर असे होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1815 मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर जवळ भोसे गावामध्ये झाला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बदली कारकून म्हणून शासकीय सेवेमध्ये रुजू झाले होते. त्यांनी 1829 ते इ.स.1872 अशी एकूण 43 वर्षे शासकीय नोकरी केली. शासकीय सेवेमध्ये काम करत असताना अनेक गोरगरिबांची त्यांनी सेवा केली.

सन 1869 साली बागलान प्रांताचे मामलेदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती आणि पेशवे कालीन जुन्या वाड्यामध्ये पेशवेकालीन तहसील कचेरी मध्ये ते कामकाज पाहू लागले. अनेक वर्ष रखडलेले तंटे आणि वाद त्यांनी काही दिवसात सोडवले होते.आणि तेव्हापासूनच येथील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण होऊ लागला होता.अशा या देव अवतारी म्हणजे देव मामलेदार यांच्या विषयी एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते.

1870 ते1872 मध्ये मोठा दुष्काळ पडला असताना गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात उपासमार होऊ लागली होती. अशावेळी देव महाराजांनी आपल्या घरातील होते नव्हते हे सगळं जनतेच्या स्वाधीन केले होते. नेसत्या वस्त्रांशिवाय त्यांनी स्वतःकडे काहीही ठेवले नव्हते सर्व काही जनतेला वाटप केले होते. शिवाय त्यांनी सरकारी तिजोरीत असलेला पैसा भुकेल्या गरीब लोकांना वाटण्यासाठी अर्ज केला होता. परंतु ब्रिटिश सरकारने त्यावेळी या गोष्टीस विरोध केला होता. त्यांना गरीब जनतेची दया वाटत नव्हती. परंतु महाराजांना जनतेचे हाल पाहवत नव्हते. अखेर त्यांनी कशाचीही वाट न पाहता सरकारी तिजोरीतील एक लाख 27 हजार रुपये जनतेला वाटून टाकले. ब्रिटिश सरकारला या गोष्टीची खबर लागताच मोठी खळबळ उडाली. आणि चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी आले.

पंचनामासाठी देव मामलेदार यांच्या अनुपस्थितीत खजिना उघडण्यात आला. तर तो जसाची तसा भरलेला आढळला. जनतेला हे समजल्यानंतर लोकांचा त्यांच्या संत प्रवृत्तीवर आणखीनच विश्वास बसला. पुढे त्यांना त्यांच्या खात्यात बढती मिळाल्यानंतर यशवंत महाराजांनी येवला, चाळीसगाव, एरंडोल,अमळनेर, शहादा, धुळे,शिंदखेडा व शेवटी 1869 ते 1870  या कालावधीमध्ये ते बागलाण मध्ये तहसीलदार म्हणून आले होते. हा बागलाण च्या जनतेचा पहिलाच बहुमान होता.

तेथे त्यांनी जनतेच्या हितासाठी सर्व कामे केली आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले. तसेच त्यांनी गरीब,पीडित, दलित आणि इतर अडचणीत असलेल्या सर्वांना मदत कार्य करत आपले जीवन व्यतीत केले आणि कायमच माणसात देव बघितला. म्हणूनच त्यांना हे देवत्व प्राप्त झाले होते. पुढे ते सटाणा येथेच नोकरीतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि संत प्रवृत्तीचा प्रचार अधिकच वाढला होता. आणि  तेथून पुढे बागलन करांना त्यांनी अनेक दैवी चमत्कार करून दाखवले.

तेव्हापासूनच लोक त्यांना देव अवतारी मानू लागले. या ठिकाणी पुढे गजानन महाराज स्वतः त्यांच्या भेटीला आले होते असे सांगण्यात येते. त्यांनी सुद्धा मामलेदार महाराजांकडून दीक्षा घेतली होती असेही सांगण्यात येते. पुढे 1872 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी ते सटाणा येथे नोकरीतून निवृत्त झाले आणि पुढे काही काळ त्यांनी तेथेच वास्तव्य केले. पुढे तेथेच त्यांना बागलाण वाशियांनीकडून देव मामलेदार असे गौरवविन्यात आले. पुढे इ. स.1887 मध्ये नाशिक येथे यशवंतराव महाराजांचा स्वर्गवास झाला.

नंतर इ. स.1888 मध्ये बागलाणच्या जनतेने जुन्या कचेरी जवळ आराम नदीच्या काठी छोटे लाकडी मंदिर बांधून तेथे त्यांच्या पादुकांची स्थापना केली होती आणि त्यांच्या मामलेदार पदाला देवत्व मानून त्यांना देव मामलेदार म्हटले जाऊ लागले.अशा एका सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर असलेले हे देशात एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सन 1887 मध्ये जेव्हा महाराजांचे निधन झाले त्यानंतर 1990 मध्ये त्यांचे मंदिर स्थापन करून त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सटाणा आणि आजूबाजूच्या परिसरातून लाखो लोकांची गर्दी होऊ लागली .

रोज त्यांच्या पादुकांची आणि मूर्तीची पुजा केली जाऊ लागली.आणि त्यांचा जन्मोत्सव आणि पुण्यतिथी या दिवशी येथे मोठी यात्रा भरू लागली. सन 1900 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात वद्य एकादशीला त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली होती.तेव्हापासून ते आज पर्यंत हा यात्रा उत्सव साजरा केला जातो. तसेच जवळजवळ पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. फक्त सटाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण बागलाणवाशी येथे दर्शनासाठी येत असतात.

पुढे त्यांच्या लाकडी मंदिराचे पक्क्या बांधकामात रूपांतर करण्यात आले. आणि त्यानंतर सन 2021 मध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंदिराच्या नूतनीकरणासाठी  शासकीय निधी मिळवला आणि संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मृती स्मारक, जुनी कचेरी या सर्व कामाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या शुभहस्ते 3 फेब्रुवारी 2019 रोजी या कामाची सुरुवात करण्यात आली होती. 

देव मामलेदार यांच्या आशीर्वादामुळे शहराची आणि सगळ्या कुटुंबांची प्रगती झाल्याचे तेथील भाविक सांगत आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने केलेले समाजसेवेचे काम आणि त्यातूनच त्यांना देवत्व मिळालेले  मंदिर हे आता सटाण्याचे ग्रामदैवत झाले आहे. येथील जनतेने पुढे त्यांना संत उपाधी दिली. अशा या महान दैवत मानल्या जाणाऱ्या यशवंत महाराजांचे मंदिर नाशिक मध्ये गोदावरी काठी रामकुंडा समोर दिमाखात उभे आहे.

यशवंत महाराजांनी केलेले काम येणाऱ्या पिढीला समजावे म्हणून महाराजांच्या स्मारका बरोबरच येथे देव महाराजांचे राहते घर, जुनी कचेरी, यशवंत महाराज काम करायचे ती खोली, गोड फागा आणि त्या काळातील कैदी ठेवले जाणारे जेल असे बरेच काही त्यांच्या स्मारकाजवळ उभारण्यात आलेले आहे. तसेच या परिसराला यशवंत महाराज पटांगण असे नाव देण्यात आले आहे.

1 thought on “देव मामलेदार महाराज | Dev Mamledar”

Leave a Comment