साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर मध्ये संतांची परंपरा ही तशी मोठीच आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ही येथेच लिहिली. शनिशिंगणापूर,शिर्डीचे साईबाबा, नेवासे, भगवानगड, मोहटादेवी इत्यादी तीर्थक्षेत्रामुळे इथल्या गावागावात अध्यात्मिक वारसा आहे. अशा या अहिल्यानगर मध्ये असे एक संताचे ठिकाण आहे की तेथे फॉरेनर लोक सुद्धा आपले डोके टेकवतात. येथे मेहराबाद ( Meherabad ) अवतार मेहेर बाबांची समाधी आहे.
या अवतार मेहेरबाद ( Avatar Meher Baba ) यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1894 रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे मूळ नाव मेरवान शेरियार ईरानी असे होते. त्यांचे वडील इराण वरून भारतात आले होते. ते सौराष्ट्रीय पारशी धर्माचे साधक होते. मेहरवान हा त्यांचा दुसरा मुलगा होता. घरातूनच त्यांच्यावर चांगले आध्यात्मिक संस्कार झाले होते. मेहरवान शाळेत फार हुशार होता. शाळेतूनच अनेक भाषेचे ज्ञान त्यांनी मिळवलेले होते. शेक्सपियर पासून ते शैली हापिस पर्यंत सर्व कविता त्यांच्या तोंडपाठ होत्या. त्यानंतर ते स्वतः सुद्धा सुंदर कविता तयार करू लागले होते.
19 वर्षांचा झालेला मेहरवान एकदा पुण्याच्या डेक्कन कॉलेजला क्लाससाठी सायकल वरून निघाला होता. त्यावेळी त्याला रस्त्यात एका झाडाखाली एक म्हातारी आजी दिसली. तिच्या भोवती अनेक लोकांची गर्दी झालेली होती. म्हणून उत्सुकतेने मेहरवानही तेथे थांबला. त्याला ती आजी नेहमी दिसायची परंतु त्याचे तिकडे कधी लक्ष गेले नव्हते. त्या आजीचे नाव होते हजरत बाबा जान त्या मूळच्या अफगाणिस्तानच्या असून त्या एक सुफी संत होत्या.
मेहेरवानचे वडील सुद्धा हजरत बाबा जान चा प्रचंड आदर करायचे. म्हणून त्या दिवसापासून मेहेरवान रोज त्या आजी जवळ जाऊन बसायचा. दोघांमध्ये कधी संवाद व्हायचा नाही परंतु तेथे बसूनच मेहेरवानला काहीतरी अध्यात्मिक अनुमती अनुभवायला यायची. एकदा तो संध्याकाळी घरी जायला निघताना त्याने बाबा जान यांच्या पायावर डोके टेकवले. त्यावेळी बाबाजान यांनी त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यावेळी मेहेरवानला त्यांच्या स्पर्शामध्ये काहीतरी दैवी शक्ती असल्याचे जाणवले. आणि तेथूनच त्यांचे आयुष्य बदलले.
हजरत बाबा जान यांनी त्यांच्यात आत्मज्ञान प्राप्तीची भूक जागी केली होती. तेथून मेहेरवान आपल्या गुरुच्या शोधात बाहेर पडला होता. या गुरूंच्या शोधात ताजुद्दिन बाबा, नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि उपासनी महाराज अशा चार सद्गुरूंशी त्यांची भेट झाली होती. यातील उपासनी बाबा यांच्यासोबत ते सात वर्ष राहिले आणि त्यांच्या शिकवणीनुसार त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य सुरू केले होते. पुढे लोक त्यांना मेहेरबाबा म्हणून ओळखू लागले होते.
पर्शियन भाषेत मेहरबाबा याचा अर्थ दयाळू पिता असा होतो.ज्या ठिकाणी हजरत बाबा जान यांचा स्पर्श त्यांना झाला होता त्या झाडाखाली त्यांनी एकदा दगड टाकून पाहिला. त्यातून त्यांना असे जाणवले की, आपल्याकडे काही अद्भुत शक्ती निर्माण झाली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःला अवतारी पुरुष असल्याचे जाहीर केले.1922 साली अवतार मेहरबाबा यांनी मुंबईत अवतार मेहेरबाबा बॉम्बे सेंटरची स्थापना केली होती. येथे मेहरबाबा आपल्या अनुयायांना आत्मसंयमासाठी कडक शिस्तीचे मार्गदर्शन करायचे.
त्यानंतर काही दिवसातच त्यांनी अहमदनगर ( अहिल्यानगर )जवळ अरणगाव येथे आपला आश्रम स्थापन केला होता आणि याला नाव देण्यात आले मेहराबाद. 1920 च्या दशकात बाबांचे हे आश्रम त्यांच्या कामाचे केंद्र बनले होते. पुढे मेहराबाद या ठिकाणी त्यांनी शाळा आणि दवाखाने उघडले. तसेच हे शाळा आणि दवाखाने त्यांनी सर्व जाती धर्मांसाठी खुले केले होते. पुढे 10 जुलै 1925 रोजी त्यांनी अवघ्या वयाच्या 29 व्या वर्षी मौन व्रत धारण केले होते. हे मौनव्रत पुढे 34 वर्ष त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकले. ते त्यांच्या शिष्यांशी संवाद साधताना मुळाक्षराच्या पाटीचा आधार घेत किंवा हातवारे करून त्यांना आपले म्हणणे सांगत होते.
कुठल्याही जाती धर्माचा भेद न बाळगता त्यांनी गरीब,दलित, मानसिक आणि रोगी रुग्णांसाठी शाळा आणि दवाखाने विनामूल्य सुरू केले होते. पुढे सण 1931 मध्ये ते पहिल्यांदा भारताबाहेर गेले. त्यांच्या बोटीत खुद्द महात्मा गांधी सुद्धा होते. ते इंग्लंडला दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी निघाले होते. दोघांच्या या भेटीत अनेक चर्चा झाल्या होत्या. तेथून अवतार मेहरबाबा अमेरिकेला गेले होते. तेथे त्यांचे जोरदार स्वागतही झाले होते. कॅलिफोर्नियाच्या हॉलीवुड मध्ये त्यांच्यासाठी खास रिसेप्शनही ठेवण्यात आले होते.
अनेक मोठमोठे सेलिब्रेटी या रिसेप्शन साठी हजर होते. तिथल्या एका कार्यक्रमात बाबा आपले मौनव्रत सोडणार अशी चर्चा होती. मात्र तसे काही घडले नाही. बाबांनी हॉंगकॉंग ला जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु बाबांची हॉलीवुड मधली क्रेझ काही कमी झाली नव्हती. त्यांच्यावर तिथल्या टाईम मासिकात लेख छापून आला होता. तेथील त्यांचे अनेक भक्त त्यांच्या पाठोपाठ भारतात आले होते. त्यांच्या या भक्तांमध्ये महिला वर्गाचाही समावेश होता. त्या महिलांना आणण्यासाठी बाबांनी काही खास जहाजे पाठवली होती.
त्यांच्या भक्तांना बाबा लवर्स किंवा मंडळी असं म्हटले जायचे.अवतार मेहेर बाबांनी आपल्या अतिशय जवळच्या 20 भक्तांना त्यांचे सर्वस्व त्याग करून संसारातून मुक्त होण्याचे आदेश दिले होते. पुढे हे वीस भक्त बाबांबरोबर संपूर्ण देशाच्या दौऱ्यावर गेले होते. ते सर्वजण फक्त भिक्षा मागून खात होते आणि मिळेल तेथे राहत होते. या सर्वांनी देशातील मोठ मोठ्या संतांच्या भेटी घेतल्या. परदेशात ते द अवकेनर नावाने प्रसिद्ध होते. बाबांनी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे देखील मेहेर स्क्रीचल सेंटर( वैद्यकीय केंद्र) उभारले होते.
मात्र यांच्या उद्घाटनासाठी जाताना मध्येच त्यांचा अपघाता झाला होता आणि त्यामध्ये त्यांचा एक पाय निकामी झाला होता. त्यानंतर सातारा येथे जाताना एकदा त्यांचा दुसरा अपघात झाला होता. अपघातानंतर बाबांनी आपले लिखाणही पूर्णपणे बंद केले होते आणि फक्त हातवारे करून भक्तांशी संवाद सुरू ठेवला होता. त्या काळी जगभरातील लोक भारतीय अध्यात्माकडे झुकू लागले होते. काही ढोंगी त्यांना अध्यात्मिक समाधी मिळवून देण्यासाठी ड्रग्सचा वापर करण्यासाठी सांगत होते.
परंतु अवतार बाबा हे पहिले गुरु होते ज्यांनी नसिले पदार्थांचा वापर भारतीय अध्यात्मात वर्ज आहे हे पाश्चात्य देशातील लोकांना सांगितले होते. प्रेम हाच आत्मशोधाचा अंतिम मार्ग आहे असे त्यांचे मत होते. जन्माने पारशी असून सुद्धा त्यांनी कृष्णभक्तीचा प्रसार केला होता. मेहरा इराणी नावाची पंधरा वर्षाची तरुणी त्यांची शिष्या होती. बाबांच्या मते त्यांचे नाते राधाकृष्ण प्रमाणे होते. मेहरा आणि ते बऱ्याच वेळा राधा कृष्णाच्या वेशात असायचे. या मेहरा कधीच बाहेरच्या जगात प्रवेश करत नसत आणि कोणत्याही परपुरुषाची सावली त्यांच्यावर पडू देत नसायची.
जरी नामोल्लेख करायचा झाला तरी मीस गांधी, मिस हिटलर, असा उल्लेख मेहरांच्या समोर केला जायचा. त्यांचावर बाबांसोबत असण्यावरून काही टीका सुद्धा झाल्या होत्या. मात्र मेहरा अखेरपर्यंत बाबांसोबतच राहिल्या. जुलै 1925 मध्ये धारण केलेल्या मौनव्रतानुसार मेहेर बाबा आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत शांतच राहिले होते आणि 31 जानेवारी 1969 रोजी या महान ध्येयवादी आणि आध्यात्मिक गुरूंचे निधन झाले.
आजही अहमदनगर येथील मेहराबाद मध्ये त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रशिया ते अमेरिका सर्व देशांमधून लोक येतात. हिंदू,मुस्लिम,इराणी,पारशी सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्या समाधीवर डोके टेकवतात.
मेहेरबाबा यांची समाधी
