आनंदनाथ महाराज | Anandnath Maharaj

श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकापेक्षा एक अनेक अलौकिक शिष्य होऊन गेले. राजाधिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावामुळे आपल्याला अनेक मौल्यवान रत्ने मिळाली आहेत. त्यापैकीच एक श्री स्वामी समर्थांचे अंतरंग शिष्य आनंदनाथ महाराज ( Anandnath Maharaj ) होते. ते मूळचे तळ कोकणातील वालावल गावचे होते होते म्हणून त्यांना वालावलकर असे नाव पडले होते.आनंदनाथ महाराजांचा जन्म सावंतवाडी तालुक्यातील बांद्याजवळच्या मधुरेवाडीत झाला होता.

परंतु व्यवसायानिमित्त ते मुंबईत आले होते. मुंबईमधील ठाण्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा ते व्यवसाय करत होते. पुढे ते मुंबई मधील स्वामीभक्त तात महाराज यांच्या संपर्कात आले होते. नंतर ते तात महाराजांचे खास मित्र झाले होते. त्यानंतर तात महाराजांच्या माध्यमातून त्यांचा अक्कलकोट ला जाण्याचा योग आला होता. ते अक्कलकोटला गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पहिल्या भेटीतच अक्कलकोट मध्ये एका विहिरीवर स्नान करत असताना त्यांच्या डोक्यात वटवृक्षाची एक डहाळी पडली होती.

त्यावेळी त्यांना फार वेदना होत असताना आणि त्यांचे शरीर थरथरत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी येथे येऊन त्यांच्या मस्तकी स्पर्श केला असता त्यांच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या. त्या क्षणापासून ते पूर्णपणे स्वामीमय झाले होते. पुढे आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात तब्बल सहा वर्षे काढले. एके दिवशी महाराजांनी त्यांना जवळ बोलावून मुखातून खाकरून एक बेडक काढून दिलं. तेच आत्मलिंग स्वरूप बेडक अत्यंत कोमल, स्पटिका प्रमाणे दिसणारं, पारदर्शी,मध्यभागी छोट्या आकाराच्या दोन पादुका असे होते.श्री स्वामी महाराजांनी श्री सरस्वती रूपातच आनंदनाथ महाराजांना धर्मकार्यात रवाना केले होते असा तो संकेत होता. पुढे आनंदनाथ महाराजांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भ्रमण केले.

आधी मुंबई, मग येवला, नंतर सावरगाव असे अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले.  सावरगाव ला श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करून ते शिर्डीला रवाना झाले. जे कार्य श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर सोपवले होते तसेच कार्य करत हिंडत होते. शिर्डीच्या साईबाबांना जगासमोर आणण्याचे कामही आनंदनाथ महाराजांनीच केले होते. काही काळानंतर शिर्डीहून ते सावंतवाडीला आले. तेथून त्यांनी भारत भूमीचे पश्चिम द्वार म्हणजे वेंगुर्ला येथे स्वामीं देवांची स्थापना करून देव, देश आणि धर्मासाठी भगवा ध्वज त्यांनी तेथे रोवला. आरंभी वेंगुर्ला समुद्रावर बंदर भागात त्यांनी त्यांचे कार्य सुरू केले होते. बंदरावर असलेल्या गिरी संप्रदायाच्या मारुतीकडे त्यांचा मुक्काम असायचा. वेंगुर्ल्याच्या सागराचे त्यांना एवढे वेड लागले होते की, त्याचे वर्णन करताना ते म्हणतात –

 काय हा सागर दिसे अनिवार,
परी मर्यादा थोर धरीतो की l
 अठरा कोटी जीव नित्य ही उत्पत्ती,
सांभाळी स्थिती नीज प्रेमी l
 लक्ष हे योजनं लांबरुंद जानं,
घोर तसे आहे क्षेत्र ज्याचे l 
 पाहुनी या डोळा वाटते हा आनंद,
जीवाशी अमोध घडोघडी l
 आनंद म्हणे सिंधूचा हा पती,
आघादे हे वसती ज्याशी पाहता l 

वेंगुर्ल्याचे जे बंदर आहे तेथे एकाच स्थानी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येईल अशी ही जागा आनंदनाथ महाराजांना फार अलोभनीय वाटली. काही काळातच वेंगुर्ल्यातील अनेक व्यापारी लोक आनंदनाथ महाराजांच्या संपर्कात आले. त्यांनी वेंगुर्ल्यात एक निवांत शांत जागा पाहून श्री स्वामी समर्थ मठाची उभारणी करण्याचा एक निर्णय झाला. त्यानुसार 26 मार्च 1888 मध्ये मारी फरणाडीस शिकेर या बंदरावर राहणाऱ्या बाईची जमीन रोख रुपये तीनशे चाळीस देऊन आनंदनाथ महाराजांनी विकत घेतली. साधू जीवन जगणाऱ्या आनंदनाथ महाराजांना या जागेचे कागदोपत्री  व्यवहार करण्यासाठी त्यांचे शिष्य जगन्नाथ सापळे यांचे सहकार्य लाभले होते. व पुढे पंधरा डिसेंबर 1892 मध्ये हीच जागा बक्षीस पत्र करून आनंदनाथ महाराजांना त्यांनी सुपूर्द केली.

सध्याची श्री स्वामी समर्थ मठाची जागा जेवले कलावंतीन हिचा मुलगा महादेव यांच्याकडून आनंदनाथ महाराजांनी 24 फेब्रुवारी 1892 ला रीतसर घेतली होती. आणि तिथेच पुढे स्वामी मठाची स्थापना झाली. आनंदनाथ महाराज हे उत्तम दर्जाचे लेखक आणि कवी होते. सन 1894 पासून आनंदनाथ महाराज सतत श्री स्वामी नामाचे चिंतन, मनन,ध्यानधारणा,स्त्रोत्र रचना यात पूर्णता रमून गेले होते. गुरुस्तवन यासारख्या कामधेनु स्त्रोत्राच्या निर्मितीमुळे आनंदनाथ महाराजांनी सामान्य उपासकांच्या अडीअडचणीच्या वेळी उपयुक्त ठरेल असा आधारवडच उभा केला.

श्री स्वामी महाराजांनी केलेल्या कृपेच्या अमृत वर्षावात ते असे नाहून निघाले होते की त्यांना अनेकदा देहभान राहत नसे. वेंगुर्ल्याच्या ग्रामस्थांनी या काळात आनंदनाथ महाराजांमध्ये दैविक असे अनोखे सामर्थ्य अनुभवले होते. व्यवहारिक जगाच्या पलीकडे असलेल्या परमार्थाच्या सर्वोच्च सत्ता  दर्शनाने सारे जण थक्क होऊन गेले होते. परम सत्ताधीश श्री स्वामी समर्थांच्या भजन पूजनाचा अलोट महापूर या आसमंतात दुमदुमत होता. येथे येणाऱ्या अनेक गोरगरिबांच्या शारीरिक व्याधींच्या निरसनाने मठासमोरच चिमटा मारून आनंदनाथ महाराजांनी एक पाण्याचा झरा निर्माण केला होता. तेथे नंतर छोटी छोटी तळी बनवण्यात आली.

पुढे पंचक्रोशीतील अनेक भक्तजन या स्थळी येऊ लागले. आनंदनाथ महाराज मात्र दिवसेंदिवस श्री स्वामी समर्थांमध्ये मिसळून चालले होते. श्री स्वामी गुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस धरून ते त्या मूळ परब्रम्हाच्या अविष्कारात मिसळून राहू लागले. त्यानंतर देह असला काय आणि समाधीस्थ झाला काय असे त्यांच्या मनात येऊ लागले. अखेर त्यांनी समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतला. इ.स. 1903 ला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी लिलेला 25 वर्ष पूर्ण होताच त्यांनी आपले देह कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला.

आनंदराज महाराजांनी शके 1825 जेष्ठ शुद्ध षष्ठी सन 1903 मध्ये या दिवशी कधीही संपुष्टात न येणाऱ्या अशा आढळ चिरंजीव पदावर अधिष्ठित होण्याचा निर्धार केला. शिष्य भक्त आणि स्थानिक जणांना याची कल्पना देऊन ते समाधीत शिरले. आनंदनाथ महाराजांच्या या संजीवन समाधीचा सारे भक्तगण तिथे त्यांच्या प्रत्यक्ष असण्याचा आजही अनुभव घेत आहेत. श्री स्वामी समर्थ मठाचे पुजारी असणारे वासुदेव ताम्हणकर गुरुजी हे येथे 75 वर्षाहून अधिक काळ अगदी पाच वर्षांचे असल्यापासून येथे नित्य सेवेत आहेत.

तसेच आनंदनाथ महाराजांना बेडक्याच्या स्वरूपात दिलेले आत्मलिंग आणि पादुका आजही तेथे नित्यसेवक आहेत. या दिव्य मठाचे महात्म्य काहींनी कोकणी शैलीमध्ये वर्णिले आहे. तसेच आनंद नाथ महाराजांनी लिहिलेल्या गुरुस्तवनाचे आजही अनेक भक्तगण पठाण करतात. त्यांनी लिहिलेले स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन अत्यंत प्रभावशाली असून प्रासादिक आणि मधुर आहे. आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामी समर्थांचे अनेक अभंग रचनेतून भावपूर्ण आणि मार्मिक शब्दात वर्णन करून स्वामी लीला मांडलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतारा पासून ते समाधी पर्यंत महत्व पटवून देताना आनंदनाथ महाराजांनी जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त अभंग रचना केलेल्या आढळतात.

Leave a Comment