जैन संत-आनंद ऋषी | Anand Rishi

भारत देशात महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच सध्याच्या आहिल्यानगर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. संतांची भूमी असलेल्या या अहिल्यानगरला साईबाबा, मेहेर बाबा, संत ज्ञानेश्वर अशा अनेक महान संतांनी आपल्या पावन पद स्पर्शाने पावन आणि समृद्ध बनवले आहे.अशाच एका मोठ्या महान संताचे नाव म्हणजे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज ( Anand Rishi ).

धर्म हे मानवता चे एक स्वरूप आहे असे मानणारे आनंद ऋषीजी महाराज हे जैन धर्माचे दुसरे आचार्य होते. संपूर्ण मानव जातीचे कल्याण हेच त्यांच्या जीवनाचे सार होते.त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानतात आणि पूजतात देखील. सर्वधर्मसमभाव त्यांच्यामध्ये भरलेला होता. विविध धर्मांच्या धर्मगुरूंचा ते नेहमी सन्मान करत असत. माणसाच्या जीवनातील वेदना,दुःख आणि पीडा घालवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते.

अशा या युगपुरुषाचा जन्म (श्रावण शुक्ल एकम, विक्रम संवत ) इ.स. 1900 मध्ये 27 जुलै या ब्रह्म मुहूर्तावर अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ गावात जैन धर्मातील श्वेतांबर संप्रदायातील गुगळे कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंद गुगळे आणि आईचे नाव हुलसादेवी गुगळे असे होते. आई-वडिलांनी त्यांचे नाव नेमीचंद असे ठेवले होते. त्यांचा जन्म अध्यात्मिक घरात झाल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार झाले होते. माता हुलसादेवीने त्यांना रोज देवाची प्रार्थना करण्याचे शिकवले होते. त्यांची आई त्यांना प्रभुस्मरण करण्यास शिकवून महात्म्यांच्या जीवन गाथा ऐकवत असे.

त्यांच्यावर मातेने दिलेल्या संस्काराचा कोवळ्या वयात चांगला परिणाम दिसून येत होता. पुढे काही दिवसांनी धर्मपरायण मध्ये ते सहभाग घेऊ लागले.पुढे तुलसादेवीला तरुण वयातच पतीच्या निधनामुळे दुःख झाले होते. आपल्या पतीच्या जाण्यानंतर सुद्धा हुलसादेवीने आपला मुलगा नेमीचंदाचे पालन पोषण फार जबाबदारीने केले. त्यानंतर काही दिवसांनी एक दिवस पूज्य श्री रत्न ऋषीजी महाराजांचे चिचोंडी शिराळ या गावात आगमन झाले. तेव्हा रत्न ऋषीजी महाराजांनी आपल्या रत्न नजर पारखेने या बालकाचे भविष्य सांगितले आणि माता हुलसादेवी कडून काही भिक्षा मागितली. गुरुच्या सांगण्यावरून हुलसादेवीने आपल्या मुलाला चिचोंडी शिराळ या गावापासून जवळच असलेल्या मिरी गावांमध्ये मार्गशीर्ष शुक्ल नवमीच्या दिवशी वयाच्या तेराव्या वर्षी दीक्षा दिली.

तसेच या दिक्षेनंतर नेमीकुमार यांचे नाव आनंद ऋषीजी असे ठेवण्यात आले. आनंद ऋषीजी यांनी सर्व शास्त्र,आगम ज्ञान,व्याकरण तसेच संस्कृत,प्राकृत भाषेबरोबरच इतरही अनेक भाषांचा अभ्यास केला होता. त्यांना सोळा भाषेचे ज्ञान होते तसेच नऊ भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ज्ञान प्राप्त केले होते.अनेक भाषा ते वाचू शकत होते.तसेच बोलू शकत होते. मिरी गावामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली ते वाचन करत असत. ते शंभर वर्षांपूर्वीचे लिंबाचे झाड आजही जसेच्या तसे आहे. आजही त्या झाडाला तेथे महाराजांनी स्वाध्याय केल्यामुळे फार महत्त्व आहे.

एकदा ही गुरु शिष्याची जोडी विदर्भ मध्ये तीर्थक्षेत्र भ्रमण करत असताना सण 1927 मध्ये अचानक सोमवारी अलीपुर गावामध्ये गुरुदेव रत्न ऋषीजी महाराजांचे देव गमन झाले. त्यानंतर आनंद ऋषीजी महाराज फार दुःखी झाले होते. परंतु गुरूंच्या आदेशाप्रमाणे कधीही दुःखी व्हायचे नाही आणि सतत मानवाच्या कल्याणासाठी काम करत राहायचे या आदेशाप्रमाणे त्यांनी गुरूंचे स्मरण करत पुढील भ्रमण सुरू ठेवले. आपल्या गुरु शिवाय त्यांनी हिंगणघाट येथे 1927 मध्ये पहिला चतुर्मास केला. नंतर 1931 मध्ये ते नेहमी जैन धर्माचे दिवाकर चुथमलजी महाराज यांच्याशी चर्चा करायचे. नंतर त्यांनी घोड नदी जवळ चतुर्मास कार्यक्रमासाठी धार्मिक केंद्र प्रस्थापित केले होते. इस 1949 आणि 1952 मध्ये साची मध्ये तसेच 1953 मध्ये जोधपुर मध्ये संमेलनामध्ये ते सामील झाले.

त्यामध्ये श्रवण संघाची स्थापना झाली. या संघाच्या आचार्य पदावर आत्मारामजी महाराज आणि प्रधानमंत्री आनंद ऋषीजी महाराज झाले. पुढे 30 जानेवारी 1962 मध्ये पूज्य श्री आत्माराम जी महाराजांचे देव गमन झाल्यानंतर कॉन्फरन्स चे प्रमुख श्रावक आणि श्रवण संघाच्या संतांच्या सहमतीने आनंद ऋषी महाराजांना आचार्य बनवले गेले.सर्व दिग्गज संतांच्या उपस्थितीमध्ये सन 1964 मध्ये आचार्य पदाचा सादर समारोह संपन्न झाला. पुढे त्यांनी राजस्थान, पंजाब, यूपी सहित अनेक प्रांतामध्ये प्रबोधन करताना सन 1974 मध्ये भगवान महावीर यांच्या 26 व्या निर्माण शताब्दी निमित्त आनंद ऋषीजी महाराज मुंबई मध्ये आले.

आचार्य आनंद ऋषी महाराजांनी अनेक मज्जिद, मंदिर, गुरुद्वार,चर्च इत्यादी धर्म स्थानावर जाऊन प्रवचन केले. ते नेहमी सर्व धर्मांचा आदर करत होते. पुढे सन 1975 मध्ये पुणे शहरांमध्ये आचार्य अमृत महोत्सव साजरा झाला.त्यामध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराजांना राष्ट्रसंत उपाधी देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी आनंद फाउंडेशन ची निर्मिती झाली. या आनंद फाउंडेशन मार्फत हजारो कुटुंबांना सहाय्यता पुरवण्यात येते. पुढे 87 वर्षांच्या वयामध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराजांना पुण्याच्या श्रवण संघ संमेलनामध्ये बोलावण्यात आले. या संमेलन ना मध्ये पूर्ण भारत देशातून शेकडो साधू आणि साधवी आले होते.

यावेळी आचार्य भगवान सद्गुरु श्री आनंद ऋषीजी महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून आचार्य श्री देवेंद्र महाराज तसेच युवाचार्य श्री शिव मुनीजी महाराज यांना करण्यात आले . पुण्याच्या या संमेलनानंतर काही दिवसातच आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांची अस्वस्थता वाढू लागली. त्यानंतर ते अहमदनगर म्हणजेच सध्याचे अहिल्यानगर मध्ये धार्मिक विशाल बोर्ड या विशाल परिवारामध्ये सामील झाले. त्यांच्या प्रवेशानंतर धार्मिक विशाल बोर्ड एक मोठे अध्यात्मिक आणि श्रद्धेचे केंद्र झाले. संत आचार्य आनंद ऋषी महाराज यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येऊ लागले.

त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या वयाच्या 91 व्या वर्षी 28 मार्च 1992 मध्ये शनिवारच्या दिवशी दुपारी चार वाजता च्या आसपास स्वाध्याय करत असताना आचार्य आनंद ऋषीजी महाराज आत्मानंदांमध्ये विलीन झाले. भक्तांच्या अंतिम दर्शनासाठी तीन दिवस आचार्य आनंद ऋषीजी महाराजांचा देह अहिल्यानगर मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशातून भक्त आपल्या सम्राटाच्या दर्शनासाठी अहिल्यानगर मध्ये आले होते. शेवटी तिसऱ्या दिवशी लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक परीक्षा बोर्डाच्या जागेमध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

आनंद ऋषीजी महाराजांनी जीवनभर आनंद या नावाचे सार्थक केले होते. त्यांच्यानंतर या पावन भूमीला त्यांच्या लाखो संतांनी पावन केले आहे. आजही हजारो भाविक दररोज या आनंद धामाला भेट देतात आणि मनोभावे दर्शन घेतात. आचार्य आनंद ऋषी महाराजांच्या या समाधीस्थळावर अनेक भाविकांकडून दररोज मंत्र जप केला जातो. त्यांच्या ऊर्जेला आजही भाविक जाणतात आणि आनंद मिळवतात. तसेच अनेक धर्माचे आणि पंतांचे धर्मगुरू येथे येतात आणि आनंद व्याख्यानमालेमध्ये त्यांचे विचार मांडतात.

त्याचप्रमाणे अहिल्यानगर मध्ये राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य आनंद ऋषीजी महाराजांचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने त्यांच्या नावाने जैन सोशल फेडरेशन संचलित असंख्य दानवीर लोकांच्या सहयोगाने आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे. मध्य महाराष्ट्रातील या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी अपूर्ण मेडिकल सुविधा उपलब्ध होत्या त्या काळात अद्यवत सुविधायुक्त असे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

येथे कुठल्याही जाती धर्मातील लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवली जाते. येथील आनंद ऋषी नेत्रालयमध्ये आज पर्यंत लाखो लोकांच्या डोळ्यांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अनेक हृदय शस्त्रक्रिया आणि इतरही मेडिकल सुविधा येथे मोफत आणि माफक दरात केल्या जातात. तसेच अहिल्यानगर मध्ये आनंद ऋषीजी ब्लड बँक, आनंद ऋषीजी एम आर आय सेंटर अशा अनेक सुविधा त्यांच्या ट्रस्टमार्फत उपलब्ध आहेत.

Leave a Comment